ADVERTISEMENT
home / Mythology
अनंत चतुर्दशी मुहूर्त, पूजा विधी आणि व्रत कथा

अनंत चतुर्दशी मुहूर्त, पूजा विधी आणि व्रत कथा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन केले जाते. या निमित्ताने गणपती विसर्जन इन्स्टा कॅप्शन्स शेअर केले जातात. त्यामुळे बहुतेक हा दिवस आपल्याला विसर्जनाचा दिवस म्हणूनच माहीत आहे. पण हा दिवस फक्त विसर्जनासाठी नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची आराधना केली जाते. या दिवशी 14 गाठी बांधून एक अनंत धागा बनवला जातो. ज्याची पूजा केल्यानंतर तो हातावर बांधला जातो.

14 गाठींचा अनंत धागा

यंदा अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबरला येत आहे. मान्यता आहे की, देवाने भौतिक जगामध्ये 14 लोक बनवले होते. ज्यामध्ये भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, ब्रम्हलोक, अतल, वितल, सतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल यांचा समावेश होतो. मान्यतेनुसार अनंतसूत्रामध्ये 14 गाठी 14 लोकांचं प्रतीक म्हणून बांधल्या जातात. अशी मान्यता आहे की, जो 14 वर्षांपर्यंत सतत अनंत चतुर्दशीचं व्रत करतो, त्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते. अनंत सूत्र हे पुरूषांच्या उजव्या आणि महिलांच्या डाव्या हातात बांधले जाते.

अनंत चतुर्दशीची कथा

या व्रताचा उल्लेख हा पुराणातही आढळतो. जेव्हा पांडव जुगारात आपलं सर्व राज्य हरून वनामध्ये कष्ट सोसत होते तेव्हा त्यांना भगवान श्रीकृष्णाने अनंत व्रत करण्याचा सल्ला दिला होता. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला म्हटले की, जर त्याने विधीपूर्वक अनंत देवाचं व्रत केलं तर त्याच्यावरची सारी संकट दूर होतील आणि गेलेलं राज्यही परत मिळेल.

श्रीकृष्णाने या व्रताचं महत्त्व सांगण्याबाबत एक कथा ऐकवली जी खालीलप्रमाणे आहे –
प्राचीन काळी सुमंत नामक एक तपस्वी ब्राम्हण होता. ज्याच्या बायकोचं नाव दीक्षा होतं. दोघांची एक अत्यंत सुंदर धर्मपरायण तसेच ज्योतिर्मयी कन्या होती. जिचं नाव सुशीला होतं. सुशीला जेव्हा मोठी झाली तेव्हा तिच्या आईचं म्हणजेच दीक्षाचं निधन झालं. पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतने कर्कशी नावाच्या स्त्रीशी दुसरा विवाह केला आणि सुशीलाचा विवाह सुमंतने कौंडिण्य ऋषींसोबत लावून दिला. पाठवणीच्या वेळी कर्कशाने जावयाला काही वीटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले. कौंडिण्य आपल्या बायकोसोबत त्यांच्या आश्रमाकडे निघाले. रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदी किनारी संध्यापूजा करू लागले. यादरम्यान सुशीलाने पाहिलं की, खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करत आहेत. सुशीलाने त्या महिलांना विचारले की, त्या कोणाची प्रार्थना करत आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्या भगवान अनंताची पूजा करत असून या दिवशी त्यांचं व्रत करण्याचं फार महत्त्व असतं. व्रताच्या महत्त्वाबाबत ऐकल्यानंतर सुशीलाने या व्रताचं अनुष्ठान केलं आणि चौदा गाठींचा धागा आपल्या हातात बांधला आणि ऋषींजवळ आली. कौंडिण्य यांनी तिच्या हातातील धाग्याबाबत विचारलं असता तिने सर्व सांगितलं. पण ऋषींनी हे मानण्यास साफ नकार दिला आणि तो पवित्र धागा काढून अग्नीत टाकला. यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दुःखी राहू लागले. या दारिद्र्याचं कारण त्यांनी आपल्या पत्नी सुशीला हिला विचारलं असता तिने अनंत देवाचा धागा जाळण्याची बाब सांगितली. पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचं ठरवलं. जंगलामध्ये अनेक दिवस भटकून ते निराश होऊन जमीनीवर कोसळले.

ADVERTISEMENT

तेव्हा अनंत भगवान प्रकट झाले आणि म्हणाले की, हे कौंडिण्य , तू माझा तिरस्कार केलास त्यामुळे तुला हे कष्ट भोगावे लागले. तू दुःखी झालास. पण आता तुला पश्चाताप झाला आहे. त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तू घरी जाऊन विधीपूर्वक अनंत व्रत कर. 14 वर्षांपर्यंत हे व्रत केल्यास तुझं दुःख दूर होईल. तुला धन-धान्ययुक्त संपत्ती प्राप्त होईल. कौंडिण्य यांनी तसंच केलं आणि त्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळाली.

श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठिराने अनंत देवाचं 14 वर्ष विधीवत व्रत केलं आणि त्या प्रभावाने पांडव महाभारताच्या युद्धात विजयी झाले आणि चिरकाल त्यांनी राज्य केलं. यानंतर अनंत चतुर्दशीचं व्रत प्रचलनात आलं.

अनंत पूजेचा शुभ मुहूर्त

हे व्रत भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला केलं जातं. यासाठी चतुर्दशी तिथी सूर्य उदयानंतर दोन मुहूर्तात व्याप्ती होते. जर चतुर्दशी तिथी सूर्योदयानंतर असल्यास दोन मुहूर्त आधीच समाप्त होतात. तेव्हा अनंत चतुर्दशी आदल्या दिवशी करण्याचं विधान असतं. या व्रताची पूजा आणि मुख्य कर्मकाळ दिवसाच्या प्रथम भागात करणं शुभ मानलं जातं. जर प्रथम भागात पूजा करायचं राहिल्यास दुपारच्या सुरूवातीला करावी. मध्यान्हाच्या सुरूवातीचं चरण दिवसाच्या सप्तम ते नवम मुहूर्तापर्यंत असतं.

अनंत चतुर्दशीच्या पूजनासाठी यंदाचा मुहूर्त आहे खालीलप्रमाणे –
सकाळी 6.07 मिनिटांनी सुरू होत असून पुढच्या दिवशी सकाळी 5.30 पर्यंत आहे.

ADVERTISEMENT

अनंत चतुर्दशी पूजा विधी

अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी सकाळी स्नान आणि इतर नित्यकर्म करून निराहार राहून कलशाची स्थापना करावी आणि भगवान विष्णूचा फोटो समोर ठेवावा. कलशावर कुशपासून निर्मित अनंत देवाची स्थापना केली जाते. त्यासमोर कुंकू, केसर किंवा हळद वापरून कच्च्या धाग्याचा चौदा गाठींचा अनंत धागाही ठेवला जातो. जर तुम्हाला स्वतःला अनंत धागा बनवणं शक्य नसेल तर बाजारातून विकत आणा.

यानंतर अनंत देवाची कथा ऐकावी. असं मानलं जातं की, हे व्रत करण्यासोबत जर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पूजेच्या शेवटी एका भांड्यात दूध, सुपारी आणि अनंत धागा टाकून क्षीर मंथन केलं जातं. यानंतर आरती केली जाते आणि अनंत देवाचं ध्यान करून अनंत सूत्र पुरूषांच्या उजव्या आणि स्त्रीयांच्या डाव्या हातात बांधले जाते.

अनंत सूत्र बांधण्याचा मंत्र असा आहे –

अनंत संसार महासमुद्रे
मग्नं समभ्युद्धर वासुदेव।
अनंतरूपे विनियोजयस्व
ह्यनंतसूत्राय नमो नमस्ते।।

ADVERTISEMENT

यानंतर ब्राम्हणांना जेवू घालावं आणि स्वतः प्रसाद ग्रहण करावा.

18 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT