तुमच्या रोजच्या आहारात एक तरी फळ नक्कीच असलं पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे. पण निरोगी आरोग्यासाठी चांगल्या फळांची ओळख आणि निवडही तितकीच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला केमिकल फ्री आणि चांगली फळ ओळखण्याच्या काही सोप्या टीप्स सांगणार आहोत.
फळ सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी आजकाल अपायकारक विषारी पदार्थांच्या वापर केला जातो. बाहेरून ही फळं जरी दिसायला सुंदर असली तरी आरोग्यासाठी नुकसानदायक सिद्ध होत आहेत. फूड पॉयझनिंग ते कॅन्सर अशा अनेक आजारांमागील कारण ही केमिकलचा वापर करून पिकवलेली फळं कारणीभूत ठरत आहेत.
फळांची चव गोड लागावी आणि ती लवकर पिकावी म्हणून इथेनॉल-39, काबाईड आणि अॅथलिन गॅसचा वापर केला जातो. काबाईडचा वापर फळांना लवकर पिकवण्यासाठी त्यांच्यावर शिंपडून केला जातो. तर इथेनॉल पाण्यात विरघळवून त्यात फळ बुडवून ठेवली जातात. ज्यामुळे ती जास्त वेळासाठी ताजी दिसतात.
केमिकलयुक्त फळं ओळखण्यासाठीच्या काही टीप्स आम्ही खाली देत आहोत.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या फळांचा वास हा लांबूनही ओळखता येतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही फळं किंवा भाज्याही खरेदी करायला जाल तेव्हा त्यांचा वास नक्की घेऊन पाहा. उन्हाळ्यात जास्तकरून आंबा, कलिंगड, टरबूज आणि खरबूज यासारख्या फळांमध्ये भेसळीची संभावना जास्त असते. जर या फळांचा सुगंध येत नसेल तर ती खरेदी करू नका. कारण ही फळं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात.
नैसर्गिकरित्या उगवलेली फळं ही वजनाला जड असतात. त्यामुळे नेहमी फळं खरेदी करताना फळं हातात धरून त्याच्या वजनाचा अंदाज नक्की घ्या. तसंच लक्षात ठेवा की, नैसर्गिकरित्या पिकवलेली फळंही लवकर खराब होत नाहीत. त्यांच्यावर डागही कमी असतात. तसंच त्यांचा रंगही एकसारखा असतो.
सकाळी उठल्यावर सफरचंद खाण्याने तुम्ही अनेक आजारांना टाळू शकता. म्हणतात ना 'An apple a day keeps the doctor away.' सफरचंद घेताना ते नेहमी कडक आहे की नाही हे पाहून घ्या. तसंच त्याचा रंग गडद असावा. खराब सफरचंद हे नेहमी कोरडं आणि फिकट रंगाचं असतं. तसंच ते थोडं नखाने कोरूनही पाहा. कारण आजकाल बरेचदा सफरचंद चमकदार दिसण्यासाठी त्यावर मेणही लावलं जातं.
केळं हे एक फिलिंग फ्रूट आहे. जे सकाळी खाणं चांगलं असतं आणि त्यामुळे भूकही कमी लागते. पिकलेली केळीही नेहमी पिवळ्या रंगाची असतात. पण पिकलेल्या केळ्याचं देठही तसंच असावं हे नक्की पाहा. कारण कृत्रिमरित्या पिकवलेल्या केळ्याचं देठ हे हिरव्या रंगाच असतं.
खरबूज घेताना त्याचा वास नक्की घ्या. पातळ साल आणि गोड वासाचं खरबूज विकत घ्या. जास्त पिवळ्या रंगाचं खरबूज घेणं टाळा. कारण ती जास्त पिकलेलं किंवा आतून सडलेलं असू शकतं.
मोसंबीचा ज्यूस प्यायचा सल्ला नेहमीच दिला जातो. कारण हा ज्यूस पिणं हे खूप फायदेशीर असतं. रसदार पिवळं मोसंब हे वजनाला भारी असतं. डाग पडलेली मोसंबी कधीच घेऊ नका.
पपई खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यामुळे पपई घेताना ती नीट परखून घेणंही आवश्यक आहे. हलक्या हिरव्या आणि पिवळ्या रंगाची पपई ही चवीला गोड असते. दाबताच दबणारी पपई घेऊ नका. जर पपईवर पांढरे डाग असतील तर ती आतून खराब असू शकते.
उन्हाळा असो वा हिवाळा संत्र्याला नेहमीच पसंती असते. कारण डाएट किंवा आजारी माणसालाही संत्र खूपच गुणकारी आहे. गडद रंगाचं संत्र गोड आणि रसाळ असतं. चांगलं संत्र हे थोडं चमकदार आणि साल थोडं कडक असतं. खराब संत्र नेहमी बाहेरून सुकलेलं आणि जाड सालीचं असतं. अशी संत्री खरेदी करू नका. कारण ती कडू असू शकतात.
त्यामुळे पुढच्या वेळी मार्केटमध्ये फळ खरेदी करायला जाताना या छोट्या छोट्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
हेही वाचा -
उन्हाळ्यात ही 5 फळं ठेवतील तुम्हाला 'हायड्रेट'
वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेवर ग्लो येण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश