किचन ही घरातली एक अशी जागा आहे, जी तुमच्या चांगल्या आरोग्याशीच नाहीतर घरातल्या सुख-समृद्धीशी निगडीत आहे. यामुळे किचनशी निगडीत वास्तूच्या शुभ आणि अशुभ गोष्टींबाबत नक्कीच काळजी घ्यायला हवी. किचनकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमच्या चुकांमुळे किचनमध्ये निगेटीव्ह एनर्जी निर्माण होऊन घरातील सदस्यांना याचा त्रास होऊ शकतो. चला जाणून घेऊया किचनशी निगडीत काही खास वास्तू टीप्स ज्या तुमच्या घरात आणतील सुख आणि शांती.
बरेचदा असं होतं की, किचनमध्ये साठवून ठेवलेल्या एखाद्या धान्याला काळजी घेऊनसुद्धा किडे लागतात किंवा ओल लागते. तुम्ही किचन जरी वास्तूची दिशा लक्षात घेऊन बनवलंत तरी जर गॅस, फ्रिज, सिंक आणि अन्य सामान योग्य दिशेला नसल्यास वारंवार किडे लागण्याची समस्या जाणवू शकते. याशिवाय किचनमध्ये नैसर्गिक प्रकाश न येणं हे सुद्धा वास्तू दोषाचं कारण असू शकतं.
जर तुम्ही घर घेण्याच्या विचारात असाल किंवा घरात इंटरिअर चेंजेस करणार असाल तर लक्षात ठेवा की, किचन बनवताना ते नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला असावं. जर त्या दिशेला बनवणं शक्य नसल्यास उत्तर-पश्चिम दिशेला बनवून घ्या आणि किचनचा दरवाजा उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला बनवा. वास्तूशास्त्रानुसार या दिशांना किचन न केल्यास कुटुंबात कलह होण्याची शक्यता असते.
प्रत्येक गृहिणीच्या दैनंदिन वापरातली गोष्ट म्हणजे तवा. पण तुम्हाला माहीत आहे का, या तव्याबाबतही वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे. रात्री जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवून ठेवा. जेव्हा तव्याचा वापर करायचा नसेल तेव्हा तो अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यावर सहसा नजर पडणार नाही. तसंच तवा आणि कढई कधीही उलटी ठेवू नये. कारण तवा उलटा ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जैचा संचार होतो.
वास्तूनुसार, सिंकची जागा कधीही गॅसपासून लांब असली पाहिजे. किचनमध्ये गॅस नेहमी पूर्व दिशेला असावा. फ्रिज किंवा मायक्रोवेव्ह हे अग्नी कोनात असले पाहिजेत. या गोष्टी वास्तूनुसार शुभ मानल्या जातात.
जर तुमच्या किचनमधला एखादा नळ किंवा पाईप गळत असेल तर तो ताबडतोब रिपेअर करून घ्या किंवा बदलून घ्या. वास्तूशास्त्रानुसार, पाणी वाहणं हे पैशांची चणचण जाणवण्याचं कारण असू शकतं. याशिवाय किचनमधील कचराकुंडी ही नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला असावी. यामुळे घरात सुख शांती कायम राहते.
आपल्याकडे बऱ्याच जणांच्या घरात किचनमध्ये देव्हारा असतो. पण वास्तूशास्त्र नेमकं याच्या उलट सांगतं. वास्तूनुसार, किचनमध्ये किंवा किचनजवळ कधीही देव्हारा असू नये. यामुळे घरातील लोकांच्या रागात वाढ होते. तसंच आरोग्यनिगडीत समस्याही वाढतात. त्यामुळे शक्य असल्यास देव्हारा किचनपासून लांब असावा.
साधारणतः मुंबईतल्या प्रत्येक घरात किचन आणि बाथरूम हे लांबलांबच असतं. त्यामुळे ही समस्या जाणवणार नाही. पण वास्तूमध्येसुद्धा ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे की, बाथरुम आणि किचन कधीही जवळजवळ असू नये. यामुळे घरांमध्ये आरोग्यासंबंधी समस्या जाणवू शकतात. म्हणूनच किचन नेहमी बाथरूमपासून लांब असावं.
वास्तूनुसार किचनच्या बाहेर किंवा आसपास कधीही पाण्याचं पिंप ठेवू नये. यामुळे नात्यांवर वाईट परिणाम होतो. याशिवाय रेफ्रिजरेटर किंवा गॅससुद्धा कधी खिडकी किंवा दरवाज्याजवळ नसावा. यामुळे घरातली समृद्धी आणि आगीची पवित्रता प्रकृती दरवाज्याने बाहेर जाते.