पावसाळ्यात एखाद्या वीकेंड आऊटिंगचा प्लॅन अगदी हमखास केला जातो. पण जर तुम्ही थोडा लांब जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. म्हणजे ऑगस्ट महिन्यात तुम्ही देशातील नेमकी कोणती राज्य ठिकाणं फिरु शकता याची आम्ही एक यादी तयार केली आहे. साधारण ऑगस्ट- सप्टेंबर या काळात येथील वातावरण छान प्रसन्न असतं. पाहूया भारतातील अशीच काही ठिकाणं
जर तुम्हाला वरील पट्टा फिरायचा असेल आणि थोडं अॅडव्हेंचर्स काहीतरी करायचे असेल तर तुम्ही लडाखचा प्लॅन करु शकता. इतरवेळी कडाक्याची थंडी असलेल्या या भागात साधारण मे महिन्यापासून थोडं बरं वाटायला लागतं. ऑगस्ट महिना हा तेथील लोकांसाठी उन्हाळ्याचा काळ आहे. थोडा पाऊस आणि ऊन असं वातावरण या ठिकाणी या काळात असतं. त्यामुळे जर तुम्हाला थोडा मोठा आणि वेगळा प्लॅन करायचा असेल तर तुम्ही लडाखला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुम्हाला या दरम्यान स्पिटी व्हॅली, पँगकाँग लेक, नुबरा व्हॅली, लेह ते कारगिल असे बरेच काही या काळामध्ये करता येऊ शकते.
निसर्गाने नटलेल्या केरळला देखील तुम्ही या कालावधीत जाऊ शकता. साधारण जुलै महिना संपल्यानंतर वातावरणात एक प्रकारचा तजेला आलेला असतो. सगळीकडे हिरवळ आणि थंडावा असल्यामुळे या दिवसात तुम्ही केरळला सुद्धा जाऊ शकता. जर तुम्हाला हिरवागार निसर्ग, चहाचे मळे आणि प्रसन्न वातावरण अनुभवायचे असेल तर तुम्ही केरळला जायला हवे. केरळमध्ये गेल्यानंतर मुन्नार, पेरियार, एरव्हीकुलम नॅशनल पार्क, टेकडी, कोच्ची अशा काही ठिकाणांना हमखास भेट देऊ शकता.
मुंबईत आलात आणि इथे गेला नाहीत तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ
देवभूमी हिमालयाचा भाग असलेला उत्तराखंडदेखील या काळात फिरण्यासाठी उत्तम आहे. हा भागही निसर्गाने नटलेला असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हिरवळ पाहायला मिळेल. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी की, उत्तराखंडमध्ये या दिवसात अनेक नवी फुलं फुलतात. या फुलांचा मंद सुगंध हवेत दरवळत असतो. ही वेगवेगळी फुलं पाहण्याचा हा योग्य कालावधी आहे. म्हणूनच या दिवसात लोक जास्त करुन उत्तराखंडला पसंती देतात. उत्तराखंड हृषिकेश, जीम कॉरबेट, नैनिताल, हरिद्वावर, येथील नॅशनल पार्क या ठिकाणांना तुम्ही या दिवसात भेट देऊ शकता.
सगळ्यात जास्त पाऊस पडणारे भारतातील ठिकाण म्हणजे मेघालयमधील चेरापुंजी.. कायम ओला असणारा प्रदेश म्हणून याची ओळख आहे. जर तुम्हाला पाऊस आणि निसर्ग पाहायचा असेल तर तुम्ही मेघालयला नक्कीच भेट द्यायला हवी. या ठिकाणी विशिष्ट केशरी रंगाची फुले या दिवसात पाहायला मिळतात. मेघालयमधील चेरापुंजी, शिलाँग, गुवाहाटी, मावलिंयाँग ही येथील काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत.
राजस्थानला जाण्यासाठी दिवाळी हा कालावधी चांगला मानला जातो. पण ऑगस्ट हा काळही येथे जाण्यासाठी चांगला आहे. इतरवेळी या ठिकाणी तुम्हाला चांगले उकडेल. पण राजस्थानमध्ये थोडा पाऊस पडून गेला तरी आल्हाददायक वाटते. येथील बिकानेर, उदयपूर,जुना गड, लालगड अशी काही ठिकाणं तुम्हाला या दिवसात फिरता येतील. राजस्थान फिरण्यासोबत तेथील गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचा आस्वादही तुम्हाला या दिवसांमध्ये नक्कीच घेता येईल. या शिवाय शॉपिंगसाठीही राजस्थान फारच प्रसिद्ध आहे.
या 5 ठिकाणांव्यतिरिक्त आणखीही काही ठिकाणं आहेत जी तुम्ही ऑगस्ट महिन्यात फिरु शकता. पण वरील ठिकाणं ही बेस्ट आहेत. तुम्ही या ठिकाणांची अधिक माहिती घेऊन तुमची आयटनरी स्वत:च बनवू शकता आणि ऑगस्ट महिना आठवणींचा बनवू शकता.