प्रत्येक माणसाला विरंगुळा अथवा मनोरंजनाची गरज असते. दररोजच्या कामाचा ताण आजकाल दिवसेंदिवस वाढत चालला आहे.अशावेळी हा ताण कमी करण्यासाठी कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत पिकनिकच्या निमित्ताने एक छोटा ब्रेक घेणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं. कारण त्यामुळे तुम्ही भविष्यात अधिक जोमाने काम करण्यासाठी तुम्ही रिचार्ज होता. खरंतर वर्षातून एक आठवड्याचा ब्रेक घेऊन पर्यटन स्थळी फिरायला जायला हवं. मात्र जर तुम्हाला कामातून फार वेळ काढणं शक्य नसेल तर एखाद्या विकेंडला मुंबईतच पिकनिकला जाण्यासारखीदेखील अनेक ठिकाणं आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंब अथवा मित्रमंडळीसोबत तुमचा वेळ नक्कीच घालवू शकता.
खरंतर मुंबई हे सतत धावणारं शहर आहे. बाहेरगावाहून आलेले अनेक लोक मुंबईत कामानिमित्त वास्तव्य करतात. त्यामुळे कामाच्या निमित्ताने सतत गर्दी आणि वर्दळ मुंबईत पाहायला मिळते. मात्र असं असूनही मुंबईत अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला निवांतपणा आणि आनंद मिळू शकतो. मुंबईतील या ठिकाणी तुम्ही एक दिवस शांतपणे वेळ घालवू शकता. बोरीवलीच्या नॅशनल पार्क पासून ते अगदी खोपोलीच्या अॅड लॅब इमॅजिका पर्यंत अनेक ठिकाणी तुम्ही पिकनिकसाठी जाऊ शकता.
मुंबईत बोरीवलीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे. 104 क्षेत्रफळात पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानात अनेक पर्यंटक वर्षभर पिकनिकसाठी येत असतात. या ठिकाणी तुम्ही कान्हेरी लेण्या, सिंहविहार, वनराणी अशा विविध ठिकाणी फिरू शकता. कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत तुम्ही या ठिकाणी एक दिवस एकत्र फिरण्यासाठी जाऊ शकता. नॅशनल पार्कमधील वन्यजीव आणि वृक्षवेलींना कोणताही त्रास न देता तुम्ही या ठिकाणी तुमची पिकनिक नक्कीच एन्जॉंय करू शकता. या नॅशनल पार्कमध्ये जवळजवळ 40 ते 50 वन्यप्राणी, 250 प्रकारचे पक्षी आणि हजारो प्रकारचे वृक्ष आहेत.
भारतातील या नयनरम्य धबधब्यांना तुम्ही दिली आहेत का भेट
मुंबई पुणे महामार्गापासून जवळ आणि कर्जत-खोपोली रेल्वेस्थानकाजवळ पळसदरी रेल्वेस्थानक आहे. पळसदरीला पळसाची झाडं आणि खोल दरी यामुळे हे नाव मिळालं आहे. या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. पळसदरी डॅम आणि धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी लोक या ठिकाणी येतात. या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा मठदेखील आहे. या ठिकाणी डोंगर आणि दरीमध्ये ट्रेक करण्यासाठीदेखील पर्यटक येतात.
बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा आणि मंदिरदेखील पिकनिकसाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात एक दिवस पिकनिकसाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. या परिसरात शंकराचं मंदिर, गणेश मंदिर, कालिकामाता मंदिर, कोंडेश्वर धबधबा, तलाव असं बरंच काही तुम्हाला पाहता येतं. पावसाळ्यात धबधब्यात जाताना नीट काळजी घेतली तर कुटुंबासोबत सुरक्षित पिकनिकचा तुम्ही आनंद नक्कीच लुटू शकता.
पावसाळ्यात फिरण्यासाठी भिवपुरीचे अशाणे-कोशाणे धबधबेदेखील फारच प्रसिद्ध आहेत. हिरवागार डोंगर आणि त्यावरून कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा अतिशय रमणीय दिसतो. एक दिवस मौजमजा करण्यासाठी या दोन्ही धबधब्यांवर तुम्ही जाऊ शकता. मात्र कोणत्याही धबधब्यावर जाताना सुरक्षेची काळजी जरूर घ्या.
Best Treks In India In Marathi
माथेरान हे रायगड जिल्हातील एक थंड हवेचं ठिकाण आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरातून अनेक पर्यटक उन्हाळ्याच्या सुट्टीत या ठिकाणी गर्दी करतात. निसर्गसौदर्यांने नटलेल्या माथेरानवर अनेक पॉईंट्स प्रसिद्ध आहेत. ज्या ठिकाdणावरून निसर्गाचा अद्भूत नजारा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी अनेक हॉटेल्स असल्यामुळे तुम्ही दोन ते चार दिवस राहू शकता. माथेरानवर जाण्यासाठी मिनी ट्रेनची व्यवस्था आहे.
नेरळ रेल्वेस्थानकावरून तुम्ही सगुणाबागेत जाऊ शकता. कर्जत जिल्हातील सगुणा बाग हे खास कृषीप्रेमी आणि गावाकडचा अनुभव हव्या असलेल्या पर्यटकांसाठी केलेले आहे. या ठिकाणी तुमची राहण्यासाठी आणि खाण्याची व्यवस्था केली जाते. ज्यामुळे एक ते दोन दिवस तुम्ही सगुणाबागेत पिकनिकसाठी जाऊ शकता. सगुणाबाग हे एक कृषी पर्यटन केंद्र आहे. बैलगाडी सफर, झोपाळे, मातीची घरे, स्नेक शो, बोटिंग, फिशिंग, शेतातून केलेली भटंकती, विविध प्रकारचे पक्षी, प्राणी अशा अनेक गोष्टींचा आनंद तुम्ही सगुणाबागेत जाऊ शकता.
कर्जत तालुक्यात अनेक फार्म हाऊस आहेत. ज्या ठिकाणी कुटुंबासोबत तुम्ही एक ते दोन दिवस पिकनिकसाठी जाऊ शकता. या फार्म हाऊसवर राहण्यासाठी आणि खाण्याची उत्तम सोय करण्यात येते. त्यामुळे अनेकजण कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत विकऐंडला या फार्म हाऊसवर जातात. स्वतंत्र स्विमिंग पूल आणि कृत्रिम धबधबे असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पिकनिकचा आनंद लुटू शकता.
Also Read About Top 15 Cafes In Mumbai In Marathi
गेट वे ऑफ इंडिया हे ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं भारताचं प्रवेशद्वार आहे. बेसॉल्ट दगडाचे बांधकाम केलेली ही गेट वे ऑफ इंडियाची भिंत जवळजवळ 85 फूट उंच आहे. मुंबई दर्शन करण्यासाठी या ठिकाणी जरूर जा. मुंबईचा अथांग समुद्रकिनारा आणि गेट वे ऑफ इंडियाची ही भिंत पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात.
वसई जिल्हात निसर्गाच्या कुशीत वसलेलं तुंगारेश्वर धबधब्यावर पिकनिसाठी अनेक पर्यटक जातात. या ठिकाणी उंचावर असलेलं शंकराचं मंदिर, धबधबा, वन्यजीव, पशु, पक्षी पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. तुंगारारेश्वर हा संजय गांधी नॅशनल पार्कचाच एक भाग असल्यामुळे या घनदाट जंगलात तुम्हाला मनसोक्त भटकंतीचा आनंद लुटू शकता.
भिवंडीमधील वज्रेश्वरी एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. एक दिवसाच्या पिकनिकसाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. वज्रेश्वरीला गरम पाण्याची कुंड असल्याने याला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशविदेशातून पर्यटक या ठिकाणी येतात. वज्रेश्वरी, गरम पाण्याची कुंड, गणेशपूरी अशा अनेक ठिकाणं तुम्हाला पाहता येतात.
विश्व विपश्यना पॅगोडा हे मुंबईतील गोराई येथील सर्वात मोठा खांब नसलेला पॅगोडा आहे. 2000 साली हा पॅगोडा बांधण्यात आला. या ठिकाणी विपश्यना करण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक हे स्थळ आहे. या भव्यदिव्य पॅगोडामध्ये एकाच वेळी दहा हजार लोक एकत्र बसण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी मानसिक शांतता मिळवण्यासाठी, मेडिटेशन, वास्तूसौंदर्य पाहण्यासाठी,फोटोग्राफी, फिरण्यासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता.
मुंबईतील प्रसिद्ध मलबार हिलच्या समोर असलेलं कमला नेहरू पार्क मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हॅंगिग गार्डनदेखील कमला नेहरू पार्कचा एक भाग आहे. या ठिकाणी असलेला म्हातारीचा बुट पाहताना तुमच्या घरातील बच्चेकंपनी नक्कीच खूश होईल.
वाळकेश्वर येथील बाणगंगा मंदिर फारच प्रसिद्ध आहे. या परिसरात तुम्हाला प्राचीन, सांस्कृतिक कलाकृतीचं दर्शन घडेल. त्यामुळे पर्यटक आणि वास्तू अभ्यासक या ठिकाणी आवर्जून येतात. येथील प्राचीन शिव मंदिरासमोर पाण्याचा तलाव आहे. या तलावात उतरण्यासाठी दगडी पायऱ्या असून त्या ठिकाणी बसून तुम्ही निवांतपणाचा अनुभव घेऊ शकता.
वाचा - मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
मुंबईच्या भुलाबाई मार्गावर वसलेलं महालक्ष्मी मंदिर हे एक मुंबईतील प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा तीन देवींची मंदिरं आहेत. नवरात्रीमध्ये या ठिकाणी नऊ दिवस मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव साजरा केला जातो. उत्सवादरम्यान असणारी गर्दी वगळता तुम्ही या मंदिरात कधीही मन प्रसन्न आणि निवांत करण्यासाठी जाऊ शकता. मंदिराच्या मागच्या बाजूला समुद्र पाहता येतो. ज्या ठिकाणी तुम्ही बराच वेळ घालवू शकता.
नवी मुंबईतील खारघरमधील पांडवकडा धबधबा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हिरव्यागार उंच डोंगरावरून वाहणारा हा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचं आकर्षण केंद्र असतं. अनेक पर्यटक पावसात भिजण्यासाठी या ठिकाणी पिकनिकला येतात. हा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला असल्याने आणि हे ठिकाण मुंबईपासून जवळ असल्याने या ठिकाणी येणं अतिशय सोयीचं आहे. त्यामुळे एक दिवसाच्या पिकनिकसाठी तुम्ही खारघरला पांडवकड्यावर जाऊ शकता.
वाळकेश्वर हे मुंबईतील एक लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. मलबार हिलच्या जवळ असलेल्या वाळकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवारी भक्तांची प्रचंड गर्दी असते. शिवाय येथून बाळगंगादेखील जवळ आहे. पिकनिकसाठी जाण्याचा विचार करत असाल तर इतर दिवसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक प्रकारचा शांत आणि निवांतपणा नक्कीच मिळू शकतो. ज्यामुळे मित्रमंडळी अथवा कुटुंबासोबत एक दिवस या ठिकाणी तुम्ही वेळ घालवू शकता.
मुंबई ही जुहू किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या आसपास अनेक कलाकारांचे बंगले असल्यामुळेही ही जागा लोकप्रिय आहे. अनेक पर्यटक रात्री उशीरापर्यंत या ठिकाणी फिरत असतात. शिवाय आजूबाजूला खाण्यापिण्याचे अनेक स्टॉल्स आणि हॉटेल्स असल्यामुळे काळजीची करण्याचं काहीच कारण नाही.
वर्सोवाचा समुद्रकिनारा हा खरंतर मुंबईतील उपनगरातील एक भाग आहे. या ठिकाणी बऱ्याचदा फिश फेस्टिव्हल भरवला जातो. त्यामुळे मासेप्रेमींसाठी हा समुद्रकिनारा प्रसिद्ध आहे. इथे बऱ्याच चित्रपटांचं चित्रीकरणही करण्यात येतं. त्यामुळे यापैकी कोणताही बेस्ट काळ शोधून तुम्ही वर्सोवाला पिकनिकसाठी जाऊ शकता.
अक्सा बीचला लागून असणारा दानापानी समुद्रकिनारा हा मुंबईत राहणाऱ्या लोकांनाही जास्त माहीत नाही. हा अतिशय स्वच्छ असून मालाडजवळ असणारे कोळी या समुद्रकिनाऱ्याची व्यवस्था राखतात. त्यामुळे हा किनारा अतिशय स्वच्छ आहे. तुम्हाला शांतता हवी असल्यास तुम्ही या समुद्रकिनाऱ्याची निवड करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणत्याही प्रकारच्या बोटिंग, हॉर्स रायडिंग अशा अॅक्टिव्हिटी होत नसल्यामुळे तुम्हाला खूपच शांतता इथे मिळते. या ठिकाणी संधाकाळी फिरणं एक मस्त अनुभव असू शकतो.
मुंबईतील मालाडमधील मालवणीमध्ये असणारा अक्सा बीच हा फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईतील स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी हा एक आहे. अक्सावर नेहमी माणसांची वर्दळ असते. इथे बऱ्याचदा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि निवांत वेळ घालवण्यासाठी पर्यटक येत असतात. इथे राहण्यासाठी अनेक कॉटेजेसचीही व्यवस्था आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सूरज वॉटर पार्क हे ठाणे शहराचा अभिमान आहे. आतापर्यंत या पार्कला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 11 एकर्स जमिनीमध्ये हे वॉटर पार्क बांधण्यात आलं आहे. तुम्हाला जर साहस आवडत असेल तर तुम्ही नक्कीच या वॉटर पार्कला भेट द्यायला हवी. मुंबईतील सर्वोत्कृष्ट वॉटर पार्कपैकी हे एक आहे.
बोरीवलीजवळ असणारा गोराई हा समुद्रकिनारा स्वच्छ असून तुम्ही नेहमीच्या धावपळीत वेळ काढून इथे जाऊ शकता. मुंबईत अगदी एका दिवसात जाऊन येणारा हा समुद्रकिनारा असल्यामुळे सुट्टी घेण्याची वेगळी गरजही भासत नाही. तुम्ही एक दिवसाच्या पिकनिकसाठीदेखील याठिकाणी जाऊन येऊ शकता. इथे राहण्याचीही सोय आहे. त्यामुळे तुम्हाला जर तिथल्या तिथे दिवस वाढवावेसे वाटले तर तुम्ही या ठिकाणी राहू शकता.
खोपोली शहरात अनेक रिसॉर्ट, फार्म हाऊस आहेत जिथे तुम्ही पिकनिकसाठी जाऊ शकता. निसर्गाच्या कुशीत, डोंगरनद्याचा आनंद लुटण्यासाठी, धबधबे पाहण्यासाठी तुम्ही अगदी मित्रमंडळी अथवा कुटुंबासोबत एक ते दोन दिवसाच्या पिकनिकचा बेत आखू शकता. फार्म हाऊसवर बार्बेक्यूची मजा घेत, चांदण्यात फिरण्यासाठी, रात्रीच्या गप्पांचा प्लॅन करण्यासाठी हे फार्म हाऊस अगदी उत्तम आहेत. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार या फार्म हाऊसची निवड करून तुम्ही खोपोलीत एक दिवसाची पिकनिक करू शकता.
खोपोलीतील अॅडलॅब इमॅजिका थीम पार्क मुंबईतील एक आकर्षणाचं केंद्र आहे. अडलॅब्स इमॅजिका वॉटर पार्क, थीम पार्क आणि स्नो पार्क पिकनिकसाठी अगदी बेस्ट आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा राईड्स आहेत ज्या पर्यटकांच्या आकर्षणाचं कारण आहेत. नवी मुंबईपासून 68 किलोमीटर अंतरावर असणारं हे वॉटर पार्क म्हणजे अमर्यादित मजेचं भांडारच आहे. मुंबई आणि पुण्याजवळ असल्याने तुम्ही एक ते दोन दिवस या ठिकाणी मस्त मजा करू शकता.
आशिया खंडातील सर्वात मोठं थीम पार्क म्हणून ओळख असणारं एस्सेल वर्ल्ड, वॉटर किंगडम, बर्ड पार्क हे मुंबईची शान आहे. शहरातील केंद्रस्थानी वसलेलं हे थीम पार्क साधारण 47 किलोमीटर मुंंबईपासून दूर आहे. वॉटर किंगडममध्ये अतिशय थरारक आणि मजा आणणाऱ्या असा राईड्स आहेत. एस्सेल ग्रुपचा भाग असणारं हे पार्क कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी एक आकर्षक ठिकाण आहे. एक दिवसात तुम्ही संपूर्ण मजामस्ती करून येऊ शकता.
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -
कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी '25' पर्यटन स्थळं
मुंबईची शान असलेला वडापाव खायचाय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या
मुंबईतील ही '10' संग्रहालये तुम्हाला माहीत आहेत का (Top 10 Museums In Mumbai)