कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाला नष्ट करायचं असेल तर घरातील एअर कंडिश्नरदेखील बंद ठेवण्याच्या सूचना वारंवार देण्यात येत आहेत. ज्यामुळे लोकांची खूप मोठी पंचाईत झाली आहे. कारण घरात अडकून पडलेल्या लोकांना आता भर एप्रिलमध्ये बिना एसीचे दिवस काढावे लागत आहेत. एप्रिल म्हणजे ‘उन्हाळा’ ऋतू सुरू होण्याचे दिवस. सहाजिकच वातावरणातील उष्णता आता वाढू लागली आहे. प्रखर सुर्यप्रकाश पडण्यास सुरूवात झाली आहे. ज्यामुळे घरात राहणं आता दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं आहे. मात्र या उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपण काही उपाय नक्कीच करू शकतो. ज्यामुळे उकाडाही जाणवणार नाही आणि सुरक्षेसाठी एसीही बंद ठेवता येईल.
दिवसभर घरात राहायचं म्हणजे बेडवर लोळत पडण्याशिवाय पर्यायच नाही. मात्र अशावेळी जर तुम्ही तुमच्या बेडवर कॉटन अथवा हलक्या रंगाच्या बेडशीट वापरल्या तर तुम्हाला उष्णतेचा त्रास कमी जाणवेल. रात्रीच्यावेळी अंथरूण आणि पांघरूणदेखील सुती कापडापासून तयार केलेले घ्या . कारण सुती कापडामध्येहवा सतत खेळती राहते.
जर तुम्ही इमारतीत उंचावर राहत असाल तर बेडरूमच्या खिडक्या उघड्या ठेवण्यास काहीच हरकत नाही. ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिक थंड हवा मिळू शकेल. खिडक्या उघड्या असल्यामुळे घरातील हवा खेळती राहील आणि तुम्हाला उष्णतेचा त्रास जाणवणार नाही.
मुंबईतील घरांची रचना ही दाटीवाटीची असते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात एकझॉस्ट फॅन असतोच. दिवसा आणि रात्री हे फॅन सुरू ठेवा. ज्यामुळे घरातील गरम हवा बाहेर टाकली जाईल आणि बाहेरील थंड हवा घरात येईल. नैसर्गिक पद्धतीने घर थंड ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
सध्या दिवसभर घरीच असल्यामुळे कोणतेही कपडे घरात घातले तर काय हरकत आहे असं तुम्हाला नक्कीच वाटेल. मात्र जर एसी बंद ठेवायचा असेल तर घरात शक्य असल्यास सुती,सैल आणि आरामदायक कपडे घाला. ज्यामुळे तुम्हाला जास्त घाम येणार नाही आणि हवेशीर वाटेल.
काही दिवस एसी बंद असेपर्यंत जाड गाद्या आणि उंच पलंगावर झोपण्यापेक्षा जमिनीवर झोपा. झोपण्यासाठी सटई अथवा साधी बेटशीट घ्या. ज्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगली झोप लागेल. कारण बेडवर तुम्हाला बिना एसीचं जास्त गरम होऊ शकतं.
पाण्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहील आणि तुम्हाला फार गरम होणार नाही. त्यामुळे दिवसभरात सतत पाणी प्या. तुमच्या घरातील प्रत्येक खोलीत अथवा तुम्ही काम करत असलेल्या टेबलावर, सोफ्याजवळ पाण्याची बाटली ठेवा. ज्यामुळे तुम्हाला सतत पाणी पिण्याची आठवण होईल. शक्य असल्यास माठाचे, वाळा घातलेले पाणी प्या. ज्यामुळे नैसर्गिक पद्धतीने तुमच्या शरीराला थंडावा मिळेल.
काही दिवस घरात असे पर्यंत नेहमीपेक्षा हलका आहार घ्या. कारण जड जेवण केल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो. जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. ज्यामुळे शरीरातील पित्त, जळजळ या गोष्टींना चालना मिळेल. मात्र हलका आहार घेतल्यास शरीराला थंडावा मिळेल आणि घरात बिना एसीचे दिवस सुसद्य होतील.