नाते ही आयुष्यातील अशी गोष्ट आहे की एकदा बिघडली की पुन्हा त्याची घडी नीट बसवणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे नात्यात कोणत्याही गोष्टी करताना दहा विचार करावा लागतो. आपण कितीही समोरच्या माणसाला समजून घेत आहोत असं वाटलं तरी कोणत्या क्षणी आपला जोडीदार नक्की काय करेल हे कधीकधी सांगता येत नाही. त्यातही जर जोडीदार जर रागीट स्वभावाचा असेल तर हे फारच कठीण होतं. अशावेळी नक्की नातं कसं टिकवायचं असाही प्रश्न पडतो. कारण प्रेम तर असतं. पण स्वाभिमानही बाजूला ठेऊन चालत नाही. आपला स्वाभिमान आणि रागीट जोडीदाराचं मन हे दोन्ही सांभाळणं तसं जरा कठीणच आहे. पण तरीही जर आपल्या रागीट जोडीदाराचं मन तुम्हाला जपायचं असेल आणि नातं टिकवायचं असेल तर तुम्ही काही गोष्टी नक्की लक्षात ठेऊ शकता. यामुळे तुम्हाला नातं टिकवणं आणि जपणं अत्यंत सोपं होईल. कारण नातं ही सहज तोडून टाकता येणारी गोष्ट नाही. त्यामुळे तुम्हालाही जर प्रश्न असेल की रागीट जोडीदाराला कसं जपायचं तर तुम्हीदेखील काही टिप्स नक्की लक्षात ठेवा.
बऱ्याचदा रागात आपलाही आपल्या शब्दांवर आणि बोलण्यावर ताबा राहात नाही. अशावेळी जर आपण दोघेही वाद घालत राहिलो तर वाद विकोपाला जातात आणि त्याचा परिणाम नात्यावर होतो. आपल्याला आपल्या जोडीदाराचा स्वभाव मुळातच माहीत असल्यामुळे आपण कधी कधी दोन पावलं मागे जाणं फायदेशीर ठरते. त्यामुळे नाते टिकून राहण्यास मदत मिळते. कारण रागाच्या भरात काय बोलत आहोत हे जोडीदारालाही कळत नाही आणि आपल्याही. मग अशावेळी शांत राहण्यातच शहाणपण आहे.
तुमच्या नात्यात तुम्हाला नक्की काय हवं सांगते तुमची रास (Zodiac)!
कोणत्याही गोष्टीत जोडीदार अति रागावला असेल तर त्या क्षणी चूक कोणाची आहे हा विचार न करता सॉरी म्हणून विषय संपवा. आपल्यालाही माहीत असतं की चूक कोणाची आहे. पण शांत झाल्यानंतर अशावेळी समजावणं जास्त योग्य आहे. नातं टिकवायचं असेल तर सॉरी म्हटल्याने आपण नक्कीच लहान अथवा चूक ठरत नाही. कारण आपल्या जोडीदाराची चूक राग शांत झाल्यानंतर आपल्याला प्रेमाने नक्कीच समजावता येते. भांडण होत नाही असं एकही जोडपे नाही. पण रागीट जोडीदार असल्याने त्या क्षणी सॉरी म्हणणं नक्कीच योग्य ठरतं.
नातं टिकवायचं म्हणजे सतत स्वतः कमीपणा घ्यायचा असं होत नाही. तुमचा जोडीदार कितीही रागीट असला तरीही त्याच्या चुका त्याला कळू देणंही अत्यंत गरजेचं असतं. फक्त त्याला अधिक राग येणार नाही अशा पद्धतीने शब्दांची गुंफण करत त्याला त्याच्या चुका दाखवून द्यायल्या हव्यात. आपण नक्की काय वागत आहोत हे त्यांनाही कळणं तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्हाला एकट्याला नातं जपायचं नसतं तर समोरची व्यक्तीही त्या नात्यामध्ये तितकीच जबाबदार असते. त्यामुळे त्या चुका त्यांना दाखवणंही गरजेचं आहे.
तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा स्वभाव सर्वात जास्त जवळून माहीत असतो. मग अशावेळी तुम्हीच शांत राहून जास्तीत जास्त प्रेमाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे कदाचित त्यांचा राग अधिक उफाळूही शकतो. पण तुम्ही तरीही त्यांना प्रेमाने हाताळण्याचाच प्रयत्न करा. यामुळे एका क्षणी अचानक राग शांत होऊन त्यांनाही त्यांची चूक कळते. त्यामुळे नाते व्यवस्थित राहण्यास नक्कीच मदत मिळते.
देखील वाचा -
स्वाभिमान जपणारे मराठीतील उत्कृष्ट कोट्स
Sign Of A Healthy Relationship In Marathi - जाणून घ्या हेल्दी रिलेशनशिपचे हे संकेत