कोणाशीही नातं जोडणं सहज शक्य आहे पण ते नातं निभावणं आणि टिकवून ठेवणं अत्यंत कठीण आहे. लोक नात्यात पटकन जोडले जातात पण ते नातं टिकवताना होणारी दमछाक कधी कधी त्यांना एकमेकांशी जोडून ठेवणं कठीण करते. बऱ्याचदा नात्यात आल्यानंतर आपण चुकीच्या नात्यात आल्याची जाणीव होते. तेव्हा भांडणं होतात आणि मग आपण नक्की या नात्यात का आहोत असेही प्रश्न पडू लागतात. आता देशभरात कोरोना प्रचंड पसरत चालला आहे. गेले चार महिने लॉकडाऊनच्या जाळ्यात सगळेच फसले आहेत. पण सर्वात जास्त त्रास होत आहे तो कपल्सना. बऱ्याच जोड्यांना एकमेकांबरोबर राहून वेळ झालाय तर काही जण गेल्या चार महिन्यांपासून एकमेकांना भेटलेही नाहीत. या लॉकडाऊनमुळे एकमेकांमधील गैरसमज वाढत आहेत आणि त्यामुळे बऱ्याच जणांचं नातं हे ब्रेकअप पर्यंत येऊन पोहचलं आहे. या लॉकडाऊनमध्ये तुमचंही ब्रेकअप झालं असेल अथवा तुम्ही अशा मानसिक तणवातून जात असाल तर तुम्हाला आमच्या या टिप्सची नक्की गरज भासेल. स्वतःला या काळात नक्की कसं सांभाळायचं ते जाणून घ्या.
आपल्यासाठी सर्वात जास्त आवश्यक आहे ते म्हणजे सध्या तुमच्याबरोबर जे काही घडत आहे त्याचा स्वीकार करणे. ब्रेकअपमुळे स्वभावामध्ये चिडचिडेपणा आणि उदासी येणं हे अगदी सामान्य आहे. तुम्ही तुमची स्वतःची परिस्थिती जितक्या लवकर स्वीकाराल तितक्या लवकर तुम्ही यातून बाहेर पडू शकाल हे मनाशी नीट ठरवा. जी परिस्थिती आहे त्याकडे पाठ न फिरवता ती स्वीकारण्याकडे जास्त कल असू द्या. तरच तुम्ही या ब्रेकअपमधून बाहेर पडू शकता.
या दुःखाच्या वेळी तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांची मदत घ्या. तुम्हाला नक्की काय वाटत आहे ते तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. त्यांना तुमची मानसिक स्थिती काय आहे ते सांगा. मनातल्या मनात जर तुमची घुसमट होत असेल आणि त्याने तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर या गोष्टी बोला. दुःख हे नेहमी मन मोकळं केल्यावर कमी होतं. त्यामुळे तुम्हाला होणारा त्रास तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना सांगा.
आपण नेहमी आपल्या कामात, करिअर आणि लव्ह लाईफमध्ये इतके गुंतलेले असतो की आपल्या इतर माणसांकडे लक्षच देत नाही. लॉकडाऊनमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह असाल तर अशी संधी गमावू नका. तुमचं ब्रेकअप झालं असलं तरीही तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना या काळात जास्तीत जास्त वेळ द्या. त्यांच्याशी गप्पा मारा. त्यांच्यामध्ये तुमचं मन रमवा. असं केल्याने तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल विश्वास ठेवा. ब्रेकअप हे अंतिम सत्य नाही. तुम्ही तुमच्या माणसात आनंद शोधू शकता.
लॉकडाऊनमध्ये ब्रेकअप झालं असेल तर बाहेर नक्कीच तुम्ही चित्रपट पाहायला जाऊ शकत नाही. पण तुम्ही तुमच्या मोबाईलवर अथवा टीव्हीवर रोमँटिक अथवा दुःखी चित्रपट पाहण्यापेक्षा काही प्रेरणादायी अथवा कॉमेडी चित्रपट पाहा. यामुळे तुमचं लक्षही वेगळ्या विषयात लागतं. तसंच तुम्ही स्वतःला इतर कामांमध्ये जितकं व्यस्त ठेऊ शकाल त्याकडे लक्ष द्या. मानसिक तणाव येणार नाही याकडे लक्ष द्या. जितकं जास्त आनंदी राहाता येईल तितका प्रयत्न करा.
ब्रेकअप झाल्यानंतर हमखास रडवतात ही ११ ब्रेकअप गाणी (Marathi Breakup Songs)
तुम्हाला ज्या अन्य क्षेत्रांविषयी आकर्षण आहे अथवा माहिती गोळा करायची आहे त्यासाठी या वेळेचा वापर करा. तुमचे लक्षही लागेल आणि तुमचा व्यवस्थित टाईमपासही होईल. त्याशिवाय तुमच्या ज्ञानात अधिक भर पडेल आणि तुम्हाला सतत आपल्या एक्सचा विचार करून त्रासही होणार नाही.
ब्रेकअपनंतर तुमच्या मनात खूप राग आणि त्रास असणार. पण त्यामुळे तुम्ही तुमच्या एक्सवर कोणत्याही प्रकारे राग अथवा सूड उगवण्याचा प्रयत्न करू नका अथवा तसा विचारही करू नका. नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका. कारण त्यामुळे तुम्ही चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता असते. त्याचा त्रास तुम्हालाच अधिक होऊ शकतो. त्यामुळे विचारपूर्वक सकारात्मक राहा.
तुमचं प्रेम जर खरं आहे आणि तुम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखत असाल किंवा तुम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नसाल तर तुमच्या नात्यासाठी हा एक छोटासा ब्रेक आहे असं समजा. तुम्ही एकमेकांना थोडा वेळ द्यायची गरज आहे. प्रत्येक नातं हे परफेक्ट नसतं. तुम्ही घालवलेले एकत्र छान क्षण आठवा आणि थोडा वेळ थांबा कदाचित तुमचं नातं पुन्हा जुळू शकते.
तुम्हाला जर वाटत असेल की ब्रेकअप होताना तुमच्या नात्यात अगदीच कडवटपणा आला आहे आणि आता तुम्ही या नात्यात अजिबातच पुढे जाऊ शकत नाही. तर तुम्ही ऑनलाईन डेटिंग करा. स्वतःला थोडा वेळ द्या. हवं तर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर ऑनलाईन जोडीदार शोधा आणि त्यात मन रमवा.