नवरात्र म्हटलं की उत्साह. आजूबाजूला नऊ दिवस अगदी आनंदी वातावरणाचे दिवस आपल्याला प्रत्येकालाच अनुभवायला मिळतात. मुळात नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्त्व असते. आपण नेहमी पाहतो की आपल्या आजूबाजूला अगदी पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत ठराविक रंगांना महत्त्व असते. पण नवरात्रीच्या वेळी हे वेगवेगळे 9 रंग नक्की का घातले जातात? त्यांचे काय महत्त्व आहे याची तुम्हाला माहिती आहे का? दुर्गाची नऊ वेगवेगळी रूपं आणि त्याप्रमाणे त्याचे रंग या दिवशी घालायची प्रथा आहे. भारतामध्ये दुर्गा अर्थात देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक आख्यायिकादेखील आहेत. नवरात्रीच्या या उत्सवात नवरात्रीचे नऊ रंग आणि रंगांची उधळण कशाप्रकारे असते आणि कोणते रंग वापरण्यात येतात, त्याचे काय महत्त्व आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. दुर्गेची नऊ रूपं अर्थात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि सिद्धीत्री यांची या दिवसात पूजाअर्चा करण्यात येते. या देवींना आवडणाऱ्या रंगांवरून नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांचे महत्त्व ठरलेले आहे. जाणून घेऊया कोणत्या देवीसाठी कोणता रंग महत्त्वाचा आहे आणि त्याचे माणासच्या आयुष्यात काय स्थान आहे. पण बरेचदा वारानुसारही रंगाची निवड करण्यात येते. उदाहरणार्थ पहिला दिवस शनिवार आला तर यादिवशी ग्रे अर्थात करड्या रंगाची निवड केली जाते. पण मूळ रंग आणि त्याचे महत्त्व हे देवीच्या आवडीनुसार असल्याचे म्हटले जाते. गेल्या दशकापासून ही प्रथा जास्त प्रचलित झाली आहे. एकाच रंगाची वस्त्र परिधान केल्याने एकोपाचा संदेश देण्यात येतो अशी यामागची भावना आहे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा!
दिवस | तारीख | देवी | रंग |
पहिला | 17 ऑक्टोबर 2020 | शैलपुत्री | नारिंगी |
दुसरा | 18 ऑक्टोबर 2020 | ब्रम्हचारिणी | पांढरा |
तिसरा | 19 ऑक्टोबर 2020 | चंद्रघंटा | लाल |
चौथा | 20 ऑक्टोबर 2020 | कुष्मांडा | गडद निळा |
पाचवा | 21 ऑक्टोबर 2020 | स्कंदमाता | पिवळा |
सहावा | 22 ऑक्टोबर 2020 | कात्यायिनी | हिरवा |
आठवा | 23 ऑक्टोबर 2020 | काळरात्री | करडा |
नववा | 24 ऑक्टोबर 2020 | सिद्धीत्री | मोरपिशी |
नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीचा मानण्यात येतो. शैलपुत्री देवी दुर्गाचे पहिले रूप आहे. नवदुर्गेतील ही पहिली दुर्गा असल्याने या देवीची पूजा पहिल्या दिवशी करण्यात येते. पर्वतराज हिमालयच्या पोटी जन्म घेतल्यामुळे हिचे नाव शैलपुत्री असे ठेवण्यात आले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची उपासना करण्यात येते. या देवीचा आवडता रंग नारिंगी असून तिला जास्वंदीचे फूल प्रिय असल्याचे समजण्यात येते. त्यामुळे या दिवशी नारिंगी रंगाच्या कपड्यांचे परिधान करण्यात येते. या दिवशी भगव्या रंगाचे परिधान केल्यास, शैलपुत्री प्रसन्न होते असा समज आहे. शैलपुत्री देवी भाग्य उजळवते असं म्हटलं जातं. त्यामुळे या पहिल्या दिवशी तिची पूजाअर्चा करून तिला तिचे भक्त प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.
नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. या दिवशी देवीची भक्ती आणि उपासना करण्यात येते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. तपस्या आचरणात आणणारी ही देवी असल्याने या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्या करावी लागते. या देवीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असते असे सांगण्यात येते. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते असं म्हटलं जातं. तप, त्याग, संयम यासाठी ही देवी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच या देवीचा आवडता रंग हा पांढरा आहे. पांढरा रंग हा आयुष्यात संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. त्यामुळे या देवीची उपासना करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे महत्त्व आहे. तसंच ही ज्ञानदेवता असल्याचेही समजण्यात येते.
दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तींचं नाव आहे चंद्रघंटा आणि तिसऱ्या दिवशी या देवीच्या पूजेला अत्याधिक महत्त्व आहे. या दिवशी विग्रह पूजन आणि आराधना करण्यात येते. मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होण्यासाठी भक्त या देवीची आराधना करतात. देवी चंद्रघंटेच्या कृपेने अलौलिक शक्तीचे दर्शन मिळते, तसेच दिव्यदृष्टींचा अनुभव घेता येतो असे सांगण्यात येते. या देवीची पूजाअर्चा करताना दिव्य ध्वनी ऐकायला येतात असंही सांगितलं जातं. या देवीचा आवडता रंग आहे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तीरसात राहण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व जाणलं जातं. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या तिसऱ्या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं. या देवीच्या कपाळाचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे असल्यामुळेच या देवीला चंद्रघंटा देवी नावाने ओळखलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या देवीला हा रंग प्रिय असल्याचे समजण्यात येते.
दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा. या देवीला गडद निळा रंग जवळचा आहे म्हणून चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्र परिधान करावीत. दुष्कर्म करणाऱ्या आणि राक्षसी शक्तीचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं तेव्हा या देवीनेच ब्रम्हांडाची रचना केली अशी आख्यायिका आहेत. त्यामुळे दुर्गेचे हे आदिशक्ति रूप मानण्यात येते. सूर्यमंडळात या देवीचे वास्तव्य असून आठ हात असल्याने ही देवी अष्टभुजा नावानेही प्रचलित आहे. कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा अशी आयुध प्रत्येक हातात असून एका हाताने आशिर्वाद देणारी ही देवी सिद्धी प्राप्त करण्यास प्रोत्साहन देते असा समज आहे. त्यामुळेच सुखकारक गडद निळा रंग या देवीचा आवडता रंग असल्याचेही सांगण्यात येते. यामुळेच या दिवशी गडद निळ्या रंगाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. चांगले आरोग्य, संपत्ती आणि बळकटी येण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते.
पिवळा रंग हा दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता देवीचा सर्वात आवडता रंग आहे. भक्ताच्या समस्त बाह्यक्रिया लोप पावून चैतन्य आणण्याचे काम ही देवी करते असे समजण्यात येते. पिवळा रंग हा अग्रेसर असून उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा हा आवडता रंग असून याला पाचव्या दिवशी परिधान करण्याचे महत्त्व आहे. लौकिक, सांसारिक बंधनातून मुक्त होऊन उपासना करण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते. या देवीच्या पूजेसाठीदेखील पिवळ्या फुलांचा वापर करण्यात येतो. पंचमी पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते. घरात सुखशांती, समाधान आणि धनलाभ व्हावा यासाठी या देवीची आराधना आणि पूजा केली जाते. सतत प्रसन्न वाटण्यासाठी या पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व या दिवशी प्राप्त झाले आहे. स्कंद अर्थात कुमार कार्तिकेय यांचं दुसरं नाव आहे. प्रसिद्ध देवासुर युद्धात देवांचे सेनापती म्हणून कार्तिकेय यांनी काम पाहिले होते. पुराणात सांगितल्यानुसार कुमार आणि शक्ती अशी यांची महिमा आहे. या स्कंदाची आई म्हणून दुर्गेचे पाचवे स्वरूप स्कंदमाता म्हटले जाते अशी आख्यायिका सांगण्यात येते.
परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायिनी. लाल रंगाशी जोडलेली असली तरीही या देवीचा आवडता रंग हिरवा समजण्यात येतो. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध या देवीने केला होता त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही नाव आहे. कालिका पुराणात ओडिसामध्ये कात्यायनी आणि भगवान जगन्नाथ यांचे स्थान सांगण्यात आले आहे. आज्ञा चक्र या दिवशी स्थित होत असून योगसाधनेत याचे महत्त्व आहे. अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती, समाधान मिळवून देण्यासाठी या देवीची महिला पूजाअर्चा करतात. त्यामुळेच हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाशी जास्त संबंधित मानला जातो.
नवरात्रीतील सप्तमीच्या दिवशी काळरात्री देवीची आराधना करण्यात येते. याची पूजाअर्चा पापांपासून सुटका मिळावी आणि आपल्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी करण्यात येते. सातव्या दिवशी या देवीचा जप करण्यात येतो. या दिवशीचा रंग करडा आहे. या देवीला करडा रंग प्रिय असून ही देवी दिसायला भयानक असली तरीही नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. दुष्टांचे विनाश करणारी ही देवी असून हिच्या स्मरणाने दानव, दैत्य, राक्षस, भूत, पिशाच भयभीत होतात असा समज आहे. ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठीही या देवीची आराधना केली जाते. म्हणूनच यासंबंधित करडा रंग या देवीला प्रिय आणि महत्त्वाचा मानण्यात येतो. आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी या देवीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे काळरात्रीची पूजा ही सप्तमीला करण्यात येते.
महागौरी हे दुर्गेचे आठवे रूप असून तिचा आवडता रंग जांभळा अथवा वांगी कलर समजण्यात येतो. आयुष्यात सुंदर आणि अधिक चांगले होण्यासाठी या रंगाची निवड करण्यात येते. शांती आणि समाधानाचा हा रंग प्रतीक समजण्यात येतो. पूर्वसंचित पाप नष्ट करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. महागौरीने भगवान शिव पती मिळावे म्हणून कठोर तपस्या केली होती. या तपस्येने पार्वतीचे रूप हे सावळे होते मात्र त्यानंतर भगवान शिव पार्वतीला वरदान देऊन तिला गौर वर्ण देतात अशी आख्यायिका आहे म्हणूनच तिला महागौरी असंही नाव देण्यात आलं आहे. आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून अष्टमीच्या दिवशी या देवीची महिला आराधना आणि पूजा करतात. तसंच या दिवशी लहान मुलींचीही पूजा करण्यात येतात. त्यामुळेच प्रसन्न वातावरणासाठी हा जांभळा रंग निवडण्यात आला आहे.
नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व तर आपण जाणून घेतले. मात्र गेल्या काही वर्षात हा एक ट्रेंड सुरू झाला असून याआधी कुठेही त्याचा उल्लेख नाही असं जाणकार खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. मात्र या देवींचे आवडते रंग आणि उल्लेख हे पुराणात देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. या नवरात्रीलाही तुम्ही हे रंग निवडा आणि तुमची नवरात्र करा खास. या देवींच्या आराधनेसाठी हे रंग वापरण्यात येतात आणि त्याचे महत्त्व अशाप्रकारे आहे. मात्र हल्लीच्या ट्रेंडनुसार हे रंग बदलत असतात. त्यामुळे तुम्ही ट्रेंडनुसार फॉलो करायचं की देवीच्या रंगांनुसार महत्त्व द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण तरीही या नवरात्रीतही तुम्ही मस्तपैकी नवरात्रीचे नऊ रंग उधळण करत नवरात्र साजरी करा.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा