लग्नानंतर ज्या घरी राहायला जाणार ते जर मोठं कुटुंब असेल किंवा एकत्र कुटुंबपद्धतीतील असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे हे फारच गरजेचे असते. मोठ्या कुटुंबातील खूप जास्त माणसं आणि जबाबदाऱ्या पाहून खूप जणींना टेन्शन येते. घरातील सगळ्यांचा मान ठेवण्यापासून ते काही जबाबदाऱ्या घेण्यापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्हीही जोडीदाराची निवड केली आहे त्याचे घर जर एकत्र कुटुंब पद्धतीतील असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. म्हणजे कुटुंबात जाताना तुम्हाला कोणालाही कोणताही त्रास होणार नाही.
कुटुंब नियोजन करताय मग उशीरा गर्भधारणा करणे योग्य की अयोग्य हे जाणून घ्या
मोठ्या कुटुंबाचे फायदे
मोठ्या कुटुंबातील लोकांची संख्या ऐकल्यानंतर थोडा धक्का बसतो. पण घरात जास्त लोकं असली की काम सुद्धा पटपट होतात. मोठ्या कुटुंबाचे अन्यही काही फायदे आहेत ते जाणून घ्यायला हवेत.
- कामाचा ताण एकावर पडत नाही.
- घरात आर्थिक चणचण असेल तरी देखील त्याचा भार एकावर पडत नाही.
- एकत्र कुटुंबात निर्णय घेण्यासाठी खूप जणांची मत असतात. त्यामुळे चुकीचा निर्णय घेण्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी खूप जण असतात.
- लहान मुलांची काळजी मोठ्या कुटुंबात अगदी सहज घेतली जाते. त्यामुळे कोणावरही तसा ताण येत नाही.
- लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्या मुलांवर घरातील प्रत्येकाचे लक्ष राहते.
- आजी-आजोबा, काका-काकी यांच्या सानिध्यात राहायला मिळाल्यामुळे संस्कारही चांगले मिळतात.
मोठ्या कुटुंबातील जबाबदारी
मोठ्या कुटुंबाचे फायदे जाणून घेतल्यानंतर या कुटुंबात राहताना तुम्हाला काही जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. तुमच्याशी निगडीत सगळी नाती तुम्हाला छान निभवावी लागतात. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात
- एकत्र कुटुंबात प्रत्येक नात्याचा मान ठेवणे फार गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या सख्य्या लोकांपुरते हे नाते मर्यादित राहात नाही. तुम्हाला सगळ्यांचे ऐकणे भागच आहे.
- घरात एखादा कार्यक्रम असेल तर तुम्हाला त्याची जबाबदारी घ्यावी लागते. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला झटकून चालत नाही. त्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात.
- घरातील प्रत्येक व्यक्तिंना समान मान देणे गरजेचे आहे. घरात आवडीची व्यक्ती असली तरी देखील सगळ्यांशी सौख्य ठेवणेच गरजेचे असते.
- मोठ्या कुटुंबात राहताना बरेचदा आपलासा वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही चिडचिड न करता तुम्हाला त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी हवा असलेला वेळ हा मिळतो. पण एखाद्यावेळी तुम्हाला हा वेळ कदाचित मिळू शकत नाही. त्यामुळे थोडा समजूतदारपणा वाढवावा लागतो.
- घर म्हटले की, थोडी भांडणं आणि राजकारण आलेच. या राजकारणात पडण्यापेक्षा तुम्ही त्यातून मार्ग काढणे गरजेचे असते. कोणत्याही गप्पांमध्ये न पडता तुम्ही जर आहे ती परिस्थिती निभावून नेली की, तुमच्यावर विश्वासही अधिक बसतो.
आता मोठे कुटुंब असेल तर तुम्ही या काही गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे तुमच्यावर मुळीच ताण येणार नाही.
उशीरा लग्न करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, नात्यात नाही येणार दुरावा