गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शैक्षणिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही गुरूंचे पूजन केले जाते. या दिवशी आवर्जून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपले आदरणीय गुरू किंवा शिक्षक ज्यांचा आपलं आयुष्य घडवण्यात सिंहाचा वाटा असतो. या दिवसाला व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखलं जातं. हिंदू कॅलेंडरप्रमाणे हा दिवस आषाढ पौर्णिमेला येतो. हा दिवस अगदी सणासारखा भारत आणि नेपाळमध्ये साजरा केला जातो.
गुरूपौर्णिमा हा खरंतर आध्यात्मिक गुरूंचं आपल्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे गुरूपौर्णिमेची माहिती आपल्या सगळ्यांना असतेच. गुरू म्हणजे ती व्यक्ती जी आपल्या आयुष्यातील अंधःकार दूर करून आपल्या आत्म्याला योग्य मार्गावर आणतात. या दिवसाच्या धार्मिक माहात्म्यासोबतच भारतातील शाळा, कॉलेज आणि विद्यापीठांमध्येही हा दिवस आपल्या शिक्षकांपोटी असलेल्या आदरासाठी साजरा केला जातो. कारण आत्ताच्या जगात आपले शिक्षक हेच आपल्याला घडवत असतात. नकळत्या वयापासून ते तारूण्यपर्यंत शिक्षक हे मुलांना शिक्षणांसोबतच मानसिक आणि भावनिक प्रगतीसाठीही घडवत असतात.
मानसिक सबलता (Mental Ablities)
शिक्षक हे मुलांना नेहमी प्रोत्साहनही देतात आणि योग्य वेळी त्यांच्या भावना, मूड, सकारात्मक बोलणे आणि जीवनाचा आनंद घेणे हेही शिकवतात. या विचार प्रक्रियेचा परिणाम हा मुलांच्या निरोगी आयुष्यावर, मित्रपरिवार आणि कुटुंबासोबतच्या नात्यावरही होताना दिसतो. यामुळे मुलाना दुसऱ्यांसोबत वागणे आणि त्यांना कसे समजून घ्यायचे हेही कळते.
सकारात्मकता (Optimistic Behavior)
अनेक मुल आपल्या स्वभावाने सकारात्मक असतात. पण काहीवेळा परिस्थिती किंवा कौटुंबिक समस्यांमुळे त्यांच्यावर परिणाम होताना दिसतो. अशावेळी मदतीला येतात ते शिक्षक. जे मुलांना आजच्या स्पर्धेच्या युगातही प्रोत्साहन देतात आणि कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक राहण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे मुलांना कोणत्याही संकटावर मात करणे सहज शक्य होते आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळते.
कृतज्ञतेची भावना (Gratitude Feeling)
आपल्या आयुष्यात जे चांगलं आहे त्याबद्दल कृतज्ञता असणे फार महत्त्वाचे आहे. शाळेतील प्रत्येक घडामोडीतून शिक्षक हे मुलांच्या मनावर बिंबवताना दिसतात. यामुळे मुलांमध्ये आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत सजगता आणि कौतुकाची भावना निर्माण होते. तसंच कोणतीही गोष्ट जपून वापरली पाहिजे यासारख्या मूल्यांची त्यांच्या मनात भावना निर्माण होते.
शेअरिंगचा आनंद (Sharing is must)
आजच्या काळात प्रत्येक घरात एकुलतं एक मुल असल्याने त्यांना शेअरिंग म्हणजे काय हे माहीतच नाही. पण अनेक अभ्यासक्रम आणि प्रोजेक्टच्या माध्यमातून शिक्षक हे मुलांना शिकवतात. यामुळे मुलांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो.
शारीरिक सबलता (Physical Ability)
आजकाल शाळांमध्ये आणि शिक्षकांतर्फे मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही फिटनेसला महत्त्व दिलं जातं. एखाद्या गोष्टीसाठी केलेलं थोडंस कौतुकही मुलांमध्ये आनंद निर्माण करतं. जसं आरोग्यदायी खाणे, स्वच्छतेचे पालन आणि शारीरिक फिटनेस इ. संशोधक मानतात की, 5 ते 10 या वयोगटातील मुलं ही आपल्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या सुचनांचे पालन व्यवस्थित करतात. त्यामुळे या कोवळ्या वयात त्यांची योग्य जडणघडण करणे फार महत्त्वाचे आहे.
अशाप्रकारे आपल्या मुलांच्या दैनंदिन आयुष्यात गुरू म्हणजेच शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं दिसून येतं.