home / Travel in India
अष्टविनायकाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

अष्टविनायकाची संपूर्ण माहिती जाणून घ्या

गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे एकच धूम असते. बाप्पाचं रूप, बाप्पाचा महिमा हा सर्वांना नेहमी जाणून घ्यावासा वाटत असतो. गणपती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर नेहमीच अष्टविनायकाचं रूप येतं. पण तुम्हाला अष्टविनायकाची संपूर्ण माहिती आहे का? या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अष्टविनायकाची माहिती देणार आहोत. गणपतीचं कोणतंही रूप हे सर्वांनाच भावतं. मग ते कोणत्याही स्वरुपात असो. बाप्पा आपल्या घरी येत आहे आणि त्याचं हे मनमोहक आणि मनभावक रूप आपल्याला नेहमीच हवहवंसं वाटतं. अष्टविनायक नक्की कुठे आहेत आणि कोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती जाणून घेऊया.

अष्टविनायक महाराष्ट्रातील आठ मानाची आणि प्रतिष्ठेची देवळं

अष्टविनायक म्हटलं की, सर्वांनाच माहीत आहे, ही महाराष्ट्रातील आठ मानाची आणि अतिशय प्रतिष्ठेची देवळं समजली जातात. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये असणाऱ्या या देवळांना स्वतंत्र असा इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांच्या काळामध्ये आश्रय मिळाल्यामुळे पेशवाईच्या काळामध्ये याला महत्त्व प्राप्त झालं. तर पुराणातही या ठिकाणांचं वर्णन आढळतं. गणपती मंदिराच्या प्रतिमा तयार करण्यात आलेल्या पण दगडावर कोरीवकाम केलेल्या प्राचीन मूर्तींचा अनेक ठिकाणी शोध लागला. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने एकमेकांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांमध्ये ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) आणि अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक’ आहेत. या गणपतींपैकी महडचा आणि रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे सर्व गपणती हे डाव्या सोंडेचे आहेत. या सर्व गणपतींची माहिती पुढीलप्रमाणे –

‘गणेश चतुर्थी’ बद्दलची संपूर्ण माहिती

मोरगांव

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीला श्री मयुरेश्वर असंही म्हटलं जातं. गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. तसंच मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात सुचली असंही सांगितलं जातं. या मंदिराच्या जवळच कऱ्हा नदी आहे. मोरेश्वराच्या डोळ्यात आणि बेंबीमध्ये हिरे सजवलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये मोरगांव हे ठिकाण असून महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायापासून 17 किमी अंतरावर हे आहे.

थेऊर

थेऊरचा श्री चिंतामणी हा अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून लयाला चिंतामणी म्हणतात. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे 30 कि. मी. अंतरावर आहे. थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.

सिद्धटेक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी

रांजणगाव

रांजणगावच्या गणपतीला महागणपती म्हटलं जातं. अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. हे स्थान स्वयंभू असून पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या ठिकाणाबाबत नेहमी एक दंतकथा सांगितली जाते. त्रिपुरासुर या दैत्याला भगवान शंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक आणि पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘महागणपती’ असंही म्हटलं जातं. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. हा महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. महागणपतीचे हे स्थान इ.स. दहाव्या शतकातील आहे असंही म्हटलं जातं.

ओझर

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. ही गणपतीची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून याची ओळख आहे. या बाप्पाच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे.

DIY: या गणेशोत्सवाला घरच्या घरी स्वतःच तयार करा अशी इकोफ्रेन्डली सजावट

लेण्याद्री

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. ही मूर्ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा गिरिजात्मज हा जुन्नरपासून 7 कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे 97 कि. मी. अंतरावर आहे.

महड

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे आणि सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला आणि मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे आणि उजव्या सोंडेची आहे. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

पाली

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणेशाचे कपाळ विशाल आहे आणि त्याच्या डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत या आठही गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे. भारतातून अनेक यात्रेकरू अष्टविनायकाच्या दर्शनासाठी सतत येत असतात. येत्या दसऱ्याला हार्दिक शुभेच्छा (dussehra wishes in marathi) आणि आशिर्वाद घेण्यासाठी तुम्ही अष्टविनायकाला जाऊ शकता.

26 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this