कामाच्या ठिकाणी एखाद्याच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे त्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण अनेकांचे हे आकर्षण प्रेमातही बदलले आहे. आता हिरो-हिरोईन्सच्या बाबतीतही हे काही वेगळे नाही. काही सेलिब्रिटी शुटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आाणि देवाब्राम्हणाच्या साक्षीने त्यांनी लग्नदेखील केले. आज आपण अशाच काही बॉलीवूडच्या जोड्या जाणून घेणार आहोत ज्यांना त्यांचे प्रेम सेटवर सापडले आणि त्यांनी त्याला लग्नबंधनात बांधूनही घेतले. चला करुया सुरुवात
सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेले हे कलाकार,सध्या काय आहे त्यांचे स्टेटस
एक काळ होता ज्यावेळी काजोल नंबर 1ची अभिनेत्री होती. तिने केलेले सगळे चित्रपट सुपर डुपर हिट होते. काजोल आणि शाहरुख अशी चित्रपटांमधील जोडी लोकांना फारच आवडायची. त्यामुळे काजोल आणि शाहरुखचं लग्न व्हावं असं अनेकांना वाटायचं पण शाहरुख विवाहित होता. त्यामुळे पडद्यावर त्यांची जोडी कितीही चांगली दिसली तरी ते शक्य नव्हते. काजोलने शाहरुख वगळता अजय देवगणसोबतही अनेक चित्रपट केले होते. ‘इश्क’, ‘राजू चाचा’ हे ते काही चित्रपट. या चित्रपटादरम्यान त्यांच्यामध्ये प्रेम जुळले आणि मग काय त्यांनी लग्न केले. अजय देवगणच्या घराच्या टेरेसवरच त्यांचा हा लग्नसोहळा झाला.फेब्रुवारी 1999 रोजी त्यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आता 21 वर्ष पूर्ण झाली आहेत.
वयामध्ये अंतर असूनही एकमेकांवर भरपूर प्रेम करणारं असं कपल म्हणजे सैफ आणि करीना. या दोघांनी लग्न केलं त्यावेळी एकच चर्चा सुरु झाली. करीना कपूर हिच नाव या आधी ऋतिक रोशनसोबत जोडलं गेलं होतं. शिवाय तीचं काही वर्ष शाहीद कपूर याच्यासोबतसुद्धा अफेअर होतं. ऋतिक रोशन चित्रपटात येण्याआधीच विवाहित होता. त्यामुळे अर्थातच या सगळ्या अफवा होत्या. पण शाहीद कपूरसोबत तिच्या प्रेमाच्या चर्चा खूप होत्या. हे रिलेशन बिनसलेच. ‘तशन’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान करीना आणि सैफ यांच्या प्रेमाच्या चर्चा जोर धरु लागल्या. सैफचे आधीचे लग्नही मोडले होते. त्याला सारा आणि अब्राहिम नावाची मुलं होती. पण तरीही करीनाने त्याच्यासोबत लग्न केले आणि आता त्यांना तैमूर नावाचा मुलगा असून सगळे अगदी सुरळीत आहे.
दीपिकाने प्रेमात बरेच काही सोसले आहे. रणबीर कपूरसोबत तिचे रिलेशनशीप जगजाहीर होते. पण रणबीरने केलेला विश्वासघात ती सहन करु शकली नाही. ती बराच काळ तणावाखाली होती. पण त्याचा परिणाम तिने करिअरवर होऊ दिला नाही.तिने त्यानंतरही चित्रपटांमधून यशस्वीरित्या काम केले. ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान तिला एनर्जीने भरलेला, हसमुख आणि प्रेमळ अशा रणवीर सिंहसोबत तिचे प्रेम जुळले. 2018 साली त्यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला जास्त वर्ष झाली नसली तरी ते एक हॅपी कपल म्हणून ओळखले जाते.
बिपाशा- जॉन अब्राहम ही जोडी फारच प्रसिद्ध होती. ते लग्न करतील असे वाटले होते. पण त्यांचे ब्रेकअप झाले. दुसरीकडे करणसिंह ग्रोव्हर याने आतापर्यंत दोन लग्न केली. पण त्याने ते नाते जास्त काळ टिकवले नाही. बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोव्हर यांनी एकाच चित्रपटात काम केले. ‘अलोन’ या चित्रपटात त्यांनी अनेक इंटिमेट सीन केले. या सीनमुळेच ते एकमेकांच्या फार जवळ आले. त्यातूनच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिपाशा आणि करण ही जोडी कधी लग्न करेल असे कधीच कोणाला वाटले नव्हते. पण ते आता त्याच्या नात्यात खूश आहेत.
जोडी असावी तर अशी असे रितेश- जेनेलियाबाबत म्हणतात ते अगदीच खोटं नाही बरं का! ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनी डेब्यू केला.या पहिल्याच चित्रपटात त्यांना एकमेकांवर प्रेम झाले. त्यानंतर दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. दोघांचे करिअर अगदी छान सुरु होते. या दरम्यानच त्यांच्या लग्नाची बातमी आली. रितेश- जेनेलियाने छान शाही थाटात लग्न केले. 2012 साली त्यांनी लग्न केले. त्यांना राहिल आणि रिआन नावाची दोन गोंडस मुलं आहेत.
तर हे आहेत बॉलीवूडमधील 5 कपल ज्यांना शुटिंगदरम्यान त्यांचे प्रेम सापडले आणि त्यांनी लग्नसुद्धा केले.