Family

#MyStory त्याने मला अचानक पाठवली घटस्फोटाची नोटीस

Leenal Gawade  |  Jun 20, 2019
#MyStory त्याने मला अचानक पाठवली घटस्फोटाची नोटीस

सुखी संसाराची स्वप्न प्रत्येक स्त्री पाहात असते. ही स्वप्न पाहण्याचा आणि सत्यात उतरवण्याचा प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे.पण कधी कधी आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की, आपल्या आयुष्यात आलेलं सुखं अचानक निघून जातं. त्यावेळी आपण काहीच करु शकत नाही. नेहाच्या आयुष्यात अगदी तसंच झालं. हसतखेळत सुरु असलेला संसार अचानक कसा मोडला हे तिला कळले नाही. पण या घटनेनंतर तिच्या आयुष्यात अनेक बदल झाले. या बदलांनी तिला खूप काही शिकवलं आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जायला ही… आज #MyStory मध्ये जाणून घेऊया नेहाची ही कहाणी

shutterstock

नेहा साधारण 25 वर्षांची असताना तिच्या लग्नाच्या तयारी घरातल्यांनी सुरु केली. यंदा लग्नाचा बार उडवायचाच असे घरातल्यांनी ठरवल्यामुळे तिचा तसा नाईलाज होता. प्रेमविवाह करण्याचा काहीच प्रश्न नव्हता. तिच्यासाठी आलेली स्थळं तिने पाहायला घेतली. घरी अगदी मोकळे वातावरण होते. त्यामुळे अगदी तसाच नवरा मिळावा अशी अपेक्षा नेहाला होती. नेहाला राजीव नावाच्या मुलाचे स्थळ आले. एकमेकांना पाहताच या दोघांनी होकारार्थी मान डोलावली. आता मुलीला मुलगा आणि मुलाला मुलगी अगदी पहिल्याच भेटीत पसंद पडली म्हटल्यावर घरातल्यांना आनंद तर असणारच ना.. घरात लग्नाची तयारी सुरु झाली.

लग्नाची बोलणी सुरु झाली.काय करायचं काय नाही. मानपान या सगळ्या गोष्टींची बोलणी होत असताना कुठे तरी माशी शिंकली आणि राजीवच्या आईने या मुलीशी लग्न करु नकोस असं त्याला बजावून सांगितलं. पण नेहाचं आणि राजीवचं मन जुळलं होतं. आता त्यांना एकमेकांपासून कोणीच लांब करु शकणार नव्हत. आईच्या मताशी सहमत नसलेल्या राजीवने आईच्या विरुद्ध जाऊन नेहाच्या कुटुंबाची परवानगी घेत नेहाशी लग्न केलं. पण राजीवला या लग्नाची शिक्षा त्याच्या कुटुंबाने दिली. त्याच्या आईने त्याला  प्रॉपर्टीमधून बेदखल केले.

#MyStory.. जर मी त्याला थांबवू शकले असते तर..

shutterstock

राजीवचे नेहावर प्रेम होते. त्यामुळे त्याला या कोणत्याही गोष्टीची पर्वा नव्हती. स्वत:च्या मेहनतीने त्याने घर घेतले आणि या दोघांनी आपला संसार सुरु केला. दोघांच्या संसारात कसलीच कमतरता नव्हती. सगळे अगदी सुरळीत सुरु होते. राजीवला त्याच्या कुटुंबाची नक्कीच आठवण येत असेल आणि राजीवच्या आईलासुद्धा म्हणूनच सामंजस्य दाखवत नेहाने झालेले सगळे विसरुन राजीवच्या आईला भेटायचे ठरवले. आईच्या भेटीमुळे राजीव सुखावला. त्याचे आणि आईचे पुन्हा एकदा बोलणे सुरु झाले. पण त्याच्या आईचा नेहावरील राग मात्र गेला नव्हता. पण त्याची आईसोबतची घडी बसली याचा आनंद नेहाला होता. आपल्यासोबत सासू नीट वागत नाही हे तिने कधीच दाखवून दिले नाही.

दिवस जात होते. दिवसामागून वर्ष आता त्यांच्या लग्नाला 3 ते 4 वर्ष झाली होती. इतक्या वर्षात त्यांच्यात अनेक बदल झाले असतील. पण त्यांचे एकमेकांवरील प्रेम कमी झाले नव्हते. एकमेकांच्या मदतीने त्यांचा संसार खुलत होता. पण लग्नाला इतकी वर्ष होऊनही त्यांना अद्याप बाळ नव्हतं. बाळासाठी त्यांनी प्रयत्न केला असे नाही. पण उपचारपद्धतींचा नेहावर होणारा विपरित परीणाम पाहून राजीवने या उपचारपद्धती थांबवल्या. आयुष्य एकमेकांसाठी जगू असे त्यांनी ठरवून टाकले.

सगळं काही ठिक सुरु असताना अचानक राजीव काही कामानिमित्त आईकडे राहू लागला. आधी आठवड्यातून दोनदा मग पाच दिवस आणि कालांतराने तो महिना महिना तिथे राहू लागला. त्याचे तिथे राहणे नेहाला खटकत नव्हते. पण असे काय काम आहे की, बायकोला पाहण्यासाठी तो घरी येत नाही असे तिला सारखे वाटू लागले. तिने एकदा राजीवला हे बोलूनही दाखवले. त्यानंतर पुढील 2 वर्ष अशीच निघून गेली. आता राजीव नेहाकडे फारच कमी वेळा येत होता. नेहाला आता सवय झाली होती. नवऱ्याला कामही तितकचं असतं. सासू राहतात .त्या घरापासून त्याचे कामाचे ठिकाण जवळ होते. त्यामुळे दगदगही नव्हती.

#MyStory आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती

shutterstock

पण एक दिवस असं काय झालं की, नेहा हक्कबक्क झाली. कामावरुन घरी परतल्यानंतर तिला सोसायटीच्या वॉचमनने थांबवून एक लिफाफा दिला. राजीवने हा लिफाफा नेहाला पाठवला होता. तिला आश्चर्यच वाटले. तिने तोच लिफाफा हातात घेऊन राजीवला फोन केला. राजीव फोन उचलत नव्हता. ती घरी आली. सगळं आवरुन घेतलं आणि लिफाफा उघडला तोच ती गार पडली. राजीवने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

घटस्फोट माझा आणि राजीवचा यावर नेहाला विश्वास बसत नव्हता. आता काय करु असे झाले होते. तिने राजीवला पुन्हा फोन लावला. यावेळी मात्र राजीवने फोन उचलला आणि म्हणाला ,‘लिफाफा मिळाला??? मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं हे तुला कळलं असेलचं’ नेहाला काहीच बोलता आले नाही.  तिने फोन ठेवला आणि तिचा बांध फुटला. राजीववर असलेला तिचा विश्वास आता पूर्णत: उडाला होता.

लग्न वाचवण्याचा तिने प्रयत्न केला. पण लग्न मोडण्यासाठी राजीवने दिलेली कारणं तिला पटली नव्हती. पण राजीवला घटस्फोट हवा होता आणि तिने त्याला या बंधनातून मुक्त करायचे ठरवले होते. राजीव आणि नेहाचा अखेर घटस्फोट झाला. मूलं होत नाही म्हणून समजूतदारपणा दाखवणारा राजीवला अचानक मूलं हवे झाले होते. नेहा चांगली पत्नी होण्यासाठी किती असमर्थ आहे. हे त्याने कोर्टापुढे सांगितलं होतं. नेहाला हा आपला राजीव आहे यावर विश्वासच बसत नव्हता.

पण तिने त्याला हवा असलेला घटस्फोट दिला. कोर्टाने तिला राजीवच्या घरी राहण्यास सांगितले.घर दोघांनी घेतल्यामुळे घर विकून त्याचा समान हिस्सा घेण्याचा सल्ला दिला. घर विकण्यासाठी दोघांनी प्रयत्न सुरु केले. पण घर विकण्यास अनेक अडचणी येत होत्या. शेवटी कंटाळून राजीवने काही दिवसांसाठी प्रयत्न सोडून दिले. तो नेहाला भेटला ते थेट दुसरं लग्न केल्यानंतर

नेहासाठी हा दुसरा आघात होता. आईच्या सांगण्यावरुन त्याने दुसरे लग्न केले होते. त्याच्या आईने हे लग्न लावण्यासाठीच माझ्यासोबत घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला होता. ज्या प्रॉपर्टीला त्याने माझ्यासाठी सोडले होते. त्याच प्रॉपर्टीचा मोह त्याला आज होता. आज त्याला त्याच्या प्रॉपर्टीची किंमत प्रेमापेक्षा अधिक वाटू लागली होती.त्याने दुसरे लग्न केले होते. यावर मला विश्वासच बसत नव्हता.

तुम्हालाही व्हायचे आहे का परफेक्ट सून,मग वाचाच

shutterstock

माझा इतक्या वर्षांचा संसार आज मोडला होता. मला त्याच्या आयुष्यात आलेल्या नव्या स्त्रीवर अजिबात राग नव्हता कारण तिची काहीच चुकी नव्हती. आज स्त्री असूनही त्याच्या आईला माझी अवस्था कळू शकली नाही याचा राग मला होता. दिवसामागून दिवस जात होते. राजीवशिवाय न राहण्याची सवय मला झाली होती. घरातून लग्नाच्या संसाराशी निगडीत असलेल्या सगळ्या आठवणी मी काढून टाकल्या.नोकरी सोडली होती. ती नोकरी पुन्हा मिळवली. आता रडून नाही तर आत्मसन्मानाने जगायचे असे ठरवले.

पण म्हणतात ना याच आयुष्यात सगळे भोगून जायचे असते. एक दिवस अचानक राजीव घरी आला. त्याचा चेहरा रडवेला झाला होता. आत येऊ का? असे विचारुन तो थेट आत आला. मी चुकलो नेहा मी असं करायला नको होतं?  नेहा आता या सगळ्या इमोशनल ड्राम्याला भुलणारी नव्हती. त्यामुळे तिने दीर्घ श्वास घेऊन ‘आता फार उशीर झाला राजीव’ असे म्हणून त्याने त्याला चहा घेणार का विचारले.

होकारार्थी मान डोलावून राजीवने होकार दिला. तिने चहा टाकला. त्याला आणून दिला. राजीव अजूनही तसाच रडवेला होता. त्याने बोलायला सुरुवात केली. ‘तुला मूलं होत नाही म्हणून आईने दुसरं लग्न लावून दिलं. तिचं ऐकून मी दुसरं लग्न करायला तयार झालो. तुझा विचार केला नाही. पण आता त्याची फळ भोगतोय. मला कुठेच काम मिळत नाही. जिच्याशी आता लग्न केलं तिला मूलं होणार नाही. तिला माझ्या आईसोबत राहायचे नाही. तिला घरं हवे आहे आणि तिला नवे घरं घेऊन द्यायला माझ्याकडे पैसा नाही.’ नेहाने विचारले, मगं….????  मला आपल्या या घराजवळच काम मिळाले आहे. मी इथे येऊन तुझ्यासोबत राहू शकतो का? हा प्रश्न विचारल्याबरोबर नेहाला राग आला पण तिने तो चेहऱ्यावर दाखवला नाही. शांतपणे आत जाऊन तिने कोर्टाची नोटीस आणून दाखवली.

‘कोर्टाने मला या घरात राहण्याची परवानगी दिली आहे. तुला नाही. तू तुझ्या मनाने नवा संसार थाटलास. इतक्या वर्षांच्या संसारात मी फक्त मूल द्यायला कमी पडले प्रेम द्यायला नाही. ज्या राजीवने आईची लग्न करु नकोस ही आज्ञा पाळली त्या राजीवला दुसरे लग्न करायला आई कशी काय भाग पाडू शकते. आता तुझा आणि माझा रितसर घटस्फोट झाला आहे. या खोलीतील हिस्सा हवा असेल तर ही खोली विकूया. पण तुझ्यावर पुन्हा विश्वास मी कधीच ठेवू शकणार नाही’

 

राजीवला नेहाचे म्हणणे कळले होते. तो तिथून उठला. तो पुन्हा कधीही नेहाच्या आयुष्यात आला नाही.

काहीही चुकी नसताना नेहाच्या आयुष्यात इतके सगळे झाले होते. पण तरीही तिने भावनिक न होता. काही निर्णय योग्यच घेतले. आयुष्यात असे कठीण काळ अनेकदा येतात.अशावेळी काही निर्णय कठोरपणे घेणे गरजेचे असते.

Read More From Family