DIY लाईफ हॅक्स

एखाद्यावरील राग करु शकतो आयुष्याचे नुकसान

Leenal Gawade  |  Jul 27, 2022
राग करतो नुकसान

 राग (Anger) येणे ही अगदी स्वाभाविक क्रिया आहे. एखाद्याने आपल्या मनाविरुद्ध किंवा चुकीचे वागले की आपल्याला नेहमीच राग येतो. राग येणे यामध्ये काहीही वाईट नाही. पण हाच राग तुम्ही जर मनाशी सतत बाळगून असाल तर त्यामुळे मात्र तुमच्या आयुष्याचे मोठे नुकसान होऊ शकते. आतापर्यंत राग, मत्सर, द्वेष हे मनात ठेवून कोणीही मोठे झालेले नाही. शिवाय यामुळे कोणाला फायदा झाला असेल असेही नाही. तुम्ही थोडं शांतब बसा आणि आठवा तुम्हाला कोणाचा राग सगळ्यात जास्त येतो. का येतो? त्या रागाचे रुपांतर कशात झाले आहे वगैरे वगैरे…. त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला आहे? म्हणूनच या रागावर नियंत्रण मिळवणे फार गरजेचे आहे. काही उदाहरणासह आपण या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

उचलली जीभ लावली टाळ्याला

खूप जणांना बोलण्याचे भान नसते. प्रसंग काय, परिस्थिती काय ते समजून न घेता अगदी एखाद्यावर वसकन बोलणे किंवा टीका करणे हा एखाद्याचा स्वभाव असतो. 

उदा. अरे थोडं थोडं जेवा कारण अजून तो आला नाही. त्याला जेवायचे आहे. भरलेल्या ताटावर तुम्ही काही घेत असताना जर असे कोणी पटकन बोलले तर मनाला खूप वाईट वाटते. कधी कधी राग ही येतो अशी व्यक्ती समोर आली की, तिला टोमणा मारावा का असे वाटू लागते. पण लक्षात घ्या खूप जणांना खरंच बोलण्याची शिस्त नसते. उचलली जीभ लावली टाळ्याला असे करायची सवय असल्यामुळे तुम्ही मनात राग ठेवून काहीही होणार नाही. अशा व्यक्तींना आयुष्यात इतकी किंमत द्यायचीच कशाला? असे मनात ठरवा.

नाच ना जाने आंगन तेढा

आयुष्यात अशी लोकं असतात ज्यांना स्वत:ला काहीही येत नसतं. पण त्यांना इतरांसमोर बढाया मारायची सवय असते. ही सवय आपण खरंतरं ओळखलेली असते. आपल्याला ती व्यक्ती खोटं बोलतेय हे कळतही असतं. त्याचा रागही तितकाच येत असतो. पण हा राग मनाशी बाळगून काय होणार? प्रत्येकाची एक खरी बाजू असते. ती कधी ना कधी समोर येत असते. त्यामुळे तुम्ही अशा व्यक्तिंच्या सगळ्या गोष्टी रागारागाने उघडकीस आणण्याची काहीही गरज नाही. त्या आपोआप समोर येतात. तुम्ही यात वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचे आहे ते बघा

उदा. एखादी व्यक्ती कधी कधी सगळ्या गोष्टीचे क्रेडिट मिळवण्यासाठी पुढे पुढे करत असते. पण ती प्रत्यक्षात काहीही नाही हे जेव्हा लोकांना कळते तेव्हा आपोआपच खऱ्या गोष्टी समोर येतात. त्यामुळे तुम्ही चिंता करु नका.

बदले की आग

चित्रपटात बदले की, आग नावाने जे काही दाखवले जाते ते खऱ्या आयुष्यात तितके कामी येत नाही. खूप जणांना एखाद्या व्यक्तीवर राग ठेवायची सवय असते. पण खऱ्या आयुष्यात बदले की आग खूप नुकसान करते. कारण त्याचा काहीही उपयोग होत नाही. याचे कारण असे की, समजा एका घरात राहून तुम्ही कोणाशी वैर घेतले असेल तर ते तुम्हाला लपवता येत नाही. ते कधी ना कधी समोर दिसतेच. त्याचा फायदा हा इतर घेतात. कारण ती आग विझवणारा जवळचा वाटत नाही. पण जो तुम्हाला त्या विरोधात भडकवतो ती व्यक्ती तुम्हाला अधिक जवळची वाटू लागते. 

आता या रागाचे रुपांतर चांगल्या गोष्टीत करायचे की वाईट हे आपल्या हातात असते. प्रत्येक जण कधी ना कधी चुकतो. त्यामुळे राग हा वेळीच गिळायला शिका. 

Read More From DIY लाईफ हॅक्स