Family

माफ करणे हे इतके कठीण का वाटते, एखाद्याला माफ कसे करायचे?

Vaidehi Raje  |  Feb 17, 2022
forgiveness

आपल्याबाबतीत जेव्हा काही चुकीचे घडते तेव्हा आपण दुःखी होतो. कुणी आपल्याशी चुकीचे किंवा वाईट वागते तेव्हाही आपल्याला दुःख होते आणि बऱ्याचदा राग येतो. ती व्यक्ती कुणी लांबची आणि तिऱ्हाईत असेल तर तो राग फारकाळ टिकत नाही पण जेव्हा आपल्या जवळच्याच व्यक्ती आपल्याशी वाईट वागतात, आपली फसवणूक करतात , आपल्यावर अन्याय होतो तेव्हा मात्र आपण ती गोष्ट विसरू शकत नाही. सोडून देऊ शकत नाही. त्या व्यक्तीला माफ करणे आपल्याला कठीण जाते. 

आपल्यापैकी काही जणांना क्षमा करणे सोपे जाते आणि ते ती गोष्ट मनातून काढून टाकू शकतात. पण बहुतांश लोकांना मात्र हे करणे पटकन जमत नाही.  यामुळे नातेसंबंध तर तुटतातच पण आपल्या मनात देखील ती जखम तशीच भळभळत राहते. त्यामुळे आपल्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. या गोष्टी आपल्याला आयुष्यात पुढे जाऊ देत नाहीत आणि खाली खेचतात. आपले वर्तमान व भविष्य देखील खराब करतात. तुम्‍ही भूतकाळात घडलेल्या गोष्टी सोडून देण्यासाठी संघर्ष करत असाल तर त्यामागे पुढील कारणे असू शकतात. 

नात्यापेक्षा भावनांना अधिक महत्व देणे 

“मला माहितेय की मी गोष्टी इतक्या ताणायला नकोत, मी माफ करायला हवे. पण मला तसे करावेसे वाटत नाहीये.” असे आपल्याला अनेकदा वाटते. पण जेव्हा आपले मन दुखावले गेले असते तेव्हा आपल्या वागण्या-बोलण्यावर , विचारांवर आपल्या नकारात्मक भावनांचा पगडा असतो. त्याचाही आपल्याला त्रासच होतो. आपण असे वागणे चुकीचे आहे असे नुसते वाटत राहून उपयोगाचे नाही तर ते नाते तुमच्यासाठी बाकी कशाही पेक्षा महत्वाचे असेल तर मुद्दाम चांगले वागायचा प्रयत्न करा. आपले प्राधान्य हे नाते टिकवून ठेवण्याला आहे असे मनाशी पक्के ठरवले तर समोरच्याशी चांगले वागणे सोपे जाते. आणि एकदा चांगले वागू लागलो की आपोआपच मनातला राग शांत होऊन आपण समोरच्याला माफ करून टाकतो.  पण जर त्या नात्याला काही अर्थ उरला नसेल तर टॉक्सिक नात्यापेक्षा आपला आत्मसन्मान जपण्याला प्राधान्य द्या. त्या व्यक्तीला माफ करून त्याचा विषय संपवून टाकून पुढे जा.

क्लोझर न मिळणे 

भूतकाळात घडलेल्या अशा काही घटना असतात ज्यांचा त्रास आपण अनेक वर्षे करून घेत असतो. कारण त्या मनाला खोलवर झालेल्या जखमा असतात. त्या जखमा जरी वरवर भरल्यासारख्या वाटत असल्या तरीही त्या आतून ताज्याच असतात. जरा खपली निघाली की ती जखम परत उघडी होऊन त्रास होतो. म्हणूनच तो विषय कायमचा संपवणे आवश्यक असते. निदान तुमच्यापुरता तरी तो विषय कायमचा संपला पाहिजे तर समोरच्याला माफ करणे सोपे जाते. विषय संपण्यासाठी समोरच्यांकडून प्रत्येक वेळेला माफी मिळेलच असे नाही. किंवा समोरचा तुमचे म्हणणे ऐकून घेईलच असे नाही. तरीही एकदा त्या व्यक्तीशी बोलून बघा आणि बोलून एकदाचा विषय संपवून टाका. 

कधी कधी तुम्हाला दुःख देणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यातूनच किंवा या जगातूनच निघून गेलेली असते. अशा वेळी क्लोझर मिळणार कसं? या परिस्थितीत तुम्हाला तुमचे क्लोझर स्वतः मिळवावे लागते. ज्या व्यक्तीने तुमच्या मनाला जखम दिली आहे त्या व्यक्तीला एक पत्र लिहून त्यात तुम्हाला वाटेल ते सगळं लिहून काढा. आणि नंतर ते पत्र एकतर फाडून टाका किंवा जाळून टाका. असे केल्याने तुमच्या मनातील भावनांचा निचरा होईल आणि तुमच्यापुरता तरी विषय संपेल आणि समोरच्याला माफ करणे तुम्हाला सोपे जाईल. 

आपण समोरच्याला माफ करू शकत नाही कारण आपला विश्वासघात झालेला असतो. पण आयुष्य पुढे सुरु ठेवण्यासाठी मागचे उकरून काढत बसण्यात काही हशील नाही. एखाद्याला माफ केल्याने आपण त्याचा त्रास कमी करण्यापेक्षा स्वतःचा मानसिक त्रास आणि मनस्ताप संपवत असतो. स्वतःच्या मानसिक शांततेसाठी त्या टॉक्सिक व्यक्तीला माफ करून आपल्यापुरता त्याचा विषय कायमचा संपवून टाकणे हेच शहाणपणाचे आहे.

अधिक वाचा – रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Family