बॉलीवूड

जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी

Aaditi Datar  |  Feb 13, 2019
जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी

80 आणि 90 च्या दशकात बॉलीवूडमध्ये दोन अभिनेत्रींना सुपरस्टारचा दर्जा मिळाला होता, त्या अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित. दोघींनी आपापल्या करियरमध्ये एक खास जागा प्राप्त केली होती. चांदनी श्रीदेवीला जाऊन आता वर्ष पूर्ण होईल पण आजही बॉलीवूड आणि तिचे चाहते या दुःखातून बाहेर पडले नाहीत. माधुरीनेही नुकत्याच एका मुलाखतीत श्रीदेवीसोबतच्या तिच्या आठवणी शेअर केल्या.   

माधुरी आणि श्रीदेवी यांची शेवटची भेट मनीष मल्होत्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत झाली होती. जिथे श्रीदेवी आपल्या दोन्ही मुली जान्हवी आणि खूशी कपूरबरोबर आली होती. तेव्हा ती फारच खूष होती. मात्र तिच्या अचानक झालेल्या निधनाने आयुष्य किती क्षणभंगूर आहे, अशी भावना माधुरीने व्यक्त केली. कदाचित म्हणूनच असं म्हणतात की, आयुष्यातील प्रत्येक दिवस भरभरून जगा. आपल्याला कुटुंबाला वेळ द्या. कारण उद्या काय होईल, याची शाश्वती नाही.

माधुरीच्या करिअरबाबत बोलायचं झाल्यास धकधक गर्ल करण जोहरच्या ‘कलंक’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटासाठी पहिली चॉईस श्रीदेवी होती मात्र तिच्या निधनानंतर हा चित्रपट माधुरीला ऑफर करण्यात आला. याबाबत जेव्हा माधुरीला कळलं तेव्हा तिच्यासाठी हा रोल स्वीकारणं सोप्प नव्हतं. एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला भूमिका आणि स्क्रिप्ट माहीत असते. पण ही गोष्ट वेगळी होती. त्यामुळे सत्य स्वीकारणं कठीण होतं. तिने हा चित्रपट स्वीकारल्यानंतर श्रीदेवीच्या मुली जान्हवी आणि खूशीने माधुरीला थँक्यू म्हटलं होतं.

या पोस्टमध्ये जान्हवीने म्हटलं होतं की, अभिषेक वर्मनचा हा चित्रपट माझ्या आईच्या हृदयाच्या फार जवळ होता. माझे बाबा, खूशी आणि मी माधुरीजी या चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल आभारी आहोत.   

या चित्रपटात बऱ्याच वर्षानंतर माधुरी आणि संजय दत्तची जोडी आपल्याला पाहता येणार आहे. तसंच वरूण धवन, आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हा अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. हा चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होणार आहे.

तसंच तिचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपटही याच महिन्यात रिलीज होणार आहे. या चित्रपटात माधुरीसोबत अनिल कपूर, अर्शद वारसी, अजय देवगण आणि रितेश देशमुख अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Read More From बॉलीवूड