बॉलीवूड

‘भारत’मध्ये होळी-दिवाळीच्या गाण्यावर दिसणार सलमान-कतरिनाची रोमँटिक केमिस्ट्री

Dipali Naphade  |  Jan 30, 2019
‘भारत’मध्ये होळी-दिवाळीच्या गाण्यावर दिसणार सलमान-कतरिनाची रोमँटिक केमिस्ट्री

नुकताच प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी ‘भारत’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. हा टीझर प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याची सलमान आणि कतरिनाचे चाहते वाट पाहात आहेत. टीझरमधूनच सलमानच्या तगड्या संवादाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. पण सलमान आणि कतरिना ज्या चित्रपटात आहेत, त्या चित्रपटात एक रोमँटिक गाणं नाही असं कधीच होत नाही. यासाठी चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जाफर याने एक मस्त प्लॅनिंग केले आहे. त्याने ‘भारत’ या चित्रपटामधील काही गाणी भारतातील मुख्य सण होळी – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करण्याचं ठरवलं आहे. भारतामध्ये सणांना खूपच जास्त महत्त्व असते आणि यावेळी सर्वजण एकत्र येतात. हीच गोष्ट लक्षात ठेवून अलीने हा निर्णय घेतला असावा.

सलमान आणि कतरिना करत आहेत वेडिंग ट्रॅक

‘भारत’ मधील हे गाणं सलमान आणि कतरिनावर चित्रीत करण्यात येत आहे. कारण ‘भारत’ चित्रपटामध्ये हिंदुस्तानचा सत्तर वर्षांचा इतिहास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे यामध्ये भारतामधील सण चित्रीत करणंदेखील गरजेचं असल्याचं निर्माता आणि दिग्दर्शकाला वाटत असावं. या गाण्यासाठी दिवाळी, होळी आणि लग्नाचा बॅकग्राऊंड तयार करण्यात आला आहे. सध्या सलमान आणि कतरिना मुंबईच्या एका उपनगरातील स्टुडिओमध्ये या गाण्याचं चित्रीकरण करण्यात व्यस्त असल्याचं सांगण्यात येत आहे. या गाण्यामध्ये सुनील ग्रोव्हर आणि आसिफ शेखदेखील असण्याची शक्यता आहे. दोघांचीही या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.

सलमान – कतरिनाचा सहावा चित्रपट

सलमान आणि कतरिनाची जोडी नेहमीच प्रेक्षकांना आवडली आहे. त्यामुळेच त्यांचे चित्रपट नेहमी हिट ठरतात. त्यांची केमिस्ट्री नेहमीच मोठ्या पडद्यावर दिसून येते. यापूर्वी सलमान आणि कतरिनाने पाच चित्रपट एकत्र केले असून दोघांची जोडी नेहमीच प्रेक्षकांना भावली आहे. मैंने प्यार क्यू किया, पार्टनर, टायगर, टायगर जिंदा है, युवराज या पाचही चित्रपटांमध्ये या जोडीने अप्रतिम काम केलं असून त्यापैकी दोन चित्रपट दोघांनी अली अब्बास जाफरबरोबर केले आहेत. 


कोणत्याही जुन्या गाण्याचं रिक्रिएशन नाही

सध्या जुन्या गाण्याचं रिक्रिएशन करण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे बरेचदा अशा चित्रपटातदेखील जुनं गाणं वापरलं जाणार का असा प्रश्न चाहत्यांना पडतो. पण या चित्रपटामध्ये कोणत्याही जुन्या गाण्याचं रिक्रिएशन करण्यात आलेलं नाही. सध्या या चित्रपटासाठी गोरेगावमधील फिल्म सिटी स्टुडिओमध्ये चाळीस दिवसांचं शूट शेड्युल करण्यात आलं असून एक वेगळंच युग इथे तयार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार विशाल – शेखर आणि गीतकार इर्शाद कामिल यांनी खूपच मेहनत घेतली आहे असंही सांगण्यात आलं आहे. शिवाय या गाण्यामधील दिवाळीचं शूट आधीच करण्यात आलं असून मिळालेल्या माहितीनुसार हे शूट माल्टामध्ये करण्यात आलं आहे. हे गाणं रोमँंटिक असून यामध्ये पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. याआधी सलमान, कतरिना आणि अली अब्बास जाफर या त्रिकूटाने हिट चित्रपट दिले आहेत. हा चित्रपट अतुल अग्निहोत्री, सलमान खान फिल्म्स आणि टी – सिरीजची निर्मिती आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर 5 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा 

भोजपुरी स्टारची मुलगी करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण

21 व्या मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण नवी चेअरपर्सन

लव आज कल 2 मध्ये करणार सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रोमान्स

 

Read More From बॉलीवूड