मनोरंजन

सिंधुताई सपकाळांच्या कार्याला सलाम, चित्रपटातूनही उलगडला होता प्रवास

Dipali Naphade  |  Jan 6, 2022
sidhutai-sapkal

सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) आपल्यातून निघून गेल्या आहेत या गोष्टीवर विश्वास ठेवणं सर्वांनाच कठीण जातंय. अनाथांची आई म्हणून नाव कमावलेल्या आणि सर्वांच्या आई असणाऱ्या सिंधुताईंचं जाणं हे अजूनही मनाला पटत नाहीये. सिंधुताई का होत्या खास हे आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणूनच त्यांच्या खडतर आयुष्यावर चित्रपटातूनही प्रवास उलगडण्यात आला होता आणि ही अप्रतिम भूमिका वठवली होती ती तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit). सिंधुताई सपकाळ यांचे कार्य महान होते. याविषयीच आपण थोडे जाणून घेऊया. 

सिंधुताईंचं खडतर आयुष्य

वर्धा जिल्ह्यामधील पिंप्री मेघे गावातील अभिमन्यू साठे या गुरख्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. अत्यंत गरीबी, कौटुंबिक जबाबदारी यामुळे चौथीपर्यंतच त्यांना शिक्षण घेता आले. 26 वर्षांनी मोठे असणाऱ्या व्यक्तीबरोबर 9 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. प्रचंड सासुरवास आणि दुःख सोसून सिंधुताई उभ्या राहिल्या. वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत त्यांची तीन बाळतंपणं झाली. चौथ्यांदा गरोदर असताना त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांच्या नवऱ्याने त्यांना घराबाहेर बेदम मारुन काढून टाकले. आईनेही नाकारल्यामुळे त्यांना पोट भरण्यासाठी भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. परभणी- नांदेड- मननाड या रेल्वे स्टेशनवर त्या भीक मागायच्या.त्यांच्या मनात आत्महत्येचा विचारही आला. पण पोटच्या पोरीला मारण्याचा गुन्हा त्यांना करायचा नव्हता. स्वभावाने जिद्दी असलेल्या सिंधुताईंनी मनाशी निश्चय केला आणि आपल्यासारख्याच अनाथ झालेल्यांना भीक मागून आणलेल्या वस्तू देऊ लागल्या. 

अधिक वाचा – फरहान आणि शिबानीच्या लग्नाची तयारी सुरू, मार्चमध्ये अडकणार लग्नबंधनात

अनाथांना केलं आहे समर्पित 

सिंधुताई यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे अनाथांना समर्पित केलं म्हणूनच त्यांना अनाथांच्या माई (आई) असं नाव देण्यात आलं. 1050 अनाथ मुले त्यांनी दत्तक घेतली. तर आतापर्यंत त्यांच्या कुटुंबामध्ये 207 जावई आणि 36 सुना आल्या आहेत. इतकंच नाही तर 1000 पेक्षा अधिक नातवंडेही त्यांना आहेत. त्यांची पोटची मुलगी वकील असून ज्या अनाथांसाठी त्यांनी आयुष्य वेचले त्यापैकी अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर्स आणि वकील आहे. तर त्यापैकी काही अनाथाश्रमदेखील चालविण्यास मदत करतात.  ममता बाल सदन (Mamta Bal Sadan) ही संस्था त्यांनी 1994 मध्ये स्थापन केली आणि आपल्या समाजकार्याला सुरूवात केली. अनाथ बालकांच्या जीवनाला दिशा मिळावी म्हणूनच सिंधुताईंनी हे पाऊल उचलले. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या गावामध्ये ही संस्था सुरू करण्यात आली. या संस्थेत लहान मुलांना शिक्षण तर दिले जातेच. पण त्यासाह बेवासर मुलांना आधार देऊन त्यांच्या जेवण, कपडे आणि अन्य सुविधांकडेही लक्ष पुरविण्यात येते. तर शिक्षणानंतर ही मुले आपल्या पायावर उभे राहतील याचेही योग्य मार्गदर्शन करण्यात येते. याशिवाय त्यांना आयुष्याचा जोडीदार निवडून देण्याचे कार्यही इथून करण्यात येते.

अधिक वाचा – साऊथच्या ‘पुष्पा’चा महाराष्ट्रात धुमाकूळ 

चित्रपटातूनही उलगडला सुंदर प्रवास 

सिंधुताई सपकाळ नक्की कशा होत्या आणि अनाथांची माई का होत्या याचा संपूर्ण प्रवास हा ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून उलगडण्यात आला आहेत. स्वतः सिंधुताई यांनी या चित्रपटासाठी मदत केली होती. तेजस्विनी पंडीत या अभिनेत्रीने त्यांची ही भूमिका लिलया पेलली आहे. तर सिंधुताई यांना त्यांच्या कामासाठी आतापर्यंत 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ख्याती वेगळी सांगायची गरजच नाही. अशा सिंधुताई यांच्या कार्याला सलाम!

अधिक वाचा – अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’वर ओमिक्रॉनचं संकट, या महिन्यात नाही होणार प्रदर्शित

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन