आरोग्य ही खरंतर आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची बाब आहे. पण बरेच जण ही बाब कधीही गंभीरपणे घेत नाहीत. नवं वर्ष सुरु झालं आहे आणि यावर्षी तरी निदान आपणच आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यायला हवी असा संकल्प करायला हवा आणि तो संकल्प पूर्णही करायला हवा. उपचारापेक्षाही प्रतिबंध जास्त चांगला असतो असं म्हटलं जातं. या गोष्टीची आपण गंभीरपणाने दखल घ्यायला हवी. आपल्या कुटुंबाला इतर गोष्टींबरोबरच आरोग्याचं संरक्षण देणंही तितकंच गरजेचं आहे. आपल्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्यालाच योग्य आणि ठोस पावलं उचलायला हवी आहेत हे कुठेतरी आपणच निश्चित करायला हवं आणि त्याप्रमाणे पावलं उचलायला हवीत. कारण कुटुंब निरोगी राहिलं तर घरातील वातावरणही चांगलं राहू शकतं. कुटुंबाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी नक्की काय करायला हवं आणि काय टीप्स असतील यासाठी आम्ही तुम्हाला काही सल्ले देणार आहोत. डॉक्सअॅप मेडिकल अॅपच्या वैद्यकीय ऑपरेशन्सच्या प्रमुख डॉ. गौरी कुलकर्णी यांनी यासाठी काही टीप्स दिल्या आहेत. त्या तुम्ही नियमित फॉलो केल्यास, तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य नक्कीच चांगलं राहू शकेल यात शंका नाही. पाहूया तर मग काय आहेत कुटुंबाच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायला हवी याच्या टीप्स -
तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी शेवटची संपूर्ण आरोग्य तपासणी कधी करून घेतली होती? असा प्रश्न जर एखाद्या कुटुंबातील प्रमुखाला विचारला तर याचे उत्तर बऱ्याच अंशी लोकांकडे नसते. बऱ्याच घरांमध्ये वर्षानुवर्षे संपूर्ण आरोग्य तपासणी केलेलीच नसते. त्याचं महत्त्व त्यांना माहीतच नसतं. पण खरं तर सहा महिन्यातून एकदा आरोग्याची तपासणी करून घेणं हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ जर तुम्ही तपासणी केली नसेल, तर आता पुन्हा डॉक्टरांकडे जाण्याची वेळ आली आहे. यातील महत्वाचा भाग असा की, एखाद्या व्यक्तीला कितीही निरोगी वाटत असले, तरी कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन, रक्तातील साखरेची पातळी आणि पांढऱ्या पेशींची संख्या अशा नियमित आरोग्यविषयक निदानात्मक चाचण्या केल्या तर त्यातून चिंताजनक बाबी लवकर लक्षात येऊ शकतात. या लक्षणांचे रूपांतर प्रत्यक्ष आजारात होण्यापूर्वीच तुम्हाला त्यांच्याबद्दल कळू शकते. त्यामुळे नियमित संपूर्ण आरोग्य तपासणी करायला हवी. जर तुमच्या घरामध्ये मधुमेह, कॉलेस्ट्रॉल असे आजार अनुवंशिक असतील तर तुम्ही वेळेवर अशा तपासणी करायला सुरुवात केलीच पाहिजे.
वाचा - Green Tea : मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या 'ग्रीन टी'चे फायदे
तुम्हाला थायरॉइडची कमतरता, उच्च/कमी रक्तदाब किंवा कॅल्शिअम/लोहाची कमतरता असे काही असेल, तर तुम्हाला त्यांची पूरके नियमित घ्यावी लागतात. घेतलेल्या औषधांची नोंद ठेवणे, डोस घेण्यास न विसरणे आणि ही औषधे नियमितपणे दुकानातून न चुकता घेऊन येणे हेही खूप त्रासदायक होऊ शकते. यात तंत्रज्ञान तुमच्या मदतीला येऊ शकते. तुमचा व किंवा तुमच्या घरातील कोणाचा औषधाचा डोस चुकू नये यासाठी स्मार्टफोनवर दररोज रिमाइंडर लावून ठेवा. औषधे संपण्याची वेळ येईल त्या दरम्यान कॅलेंडर रिमाइंडर लावून ठेवा. तुम्ही औषधे घरपोच देणाऱ्या सेवाही वापरू शकता. ते खूप सोयीस्कर ठरू शकते. कदाचित ही अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता असते. पण असे केल्यामुळे तुम्ही नक्कीच तुमची औषधंही वेळेवर घेऊ शकता आणि तुमच्या आजारापासूनदेखील दूर राहू शकता.
वाचा - जाणून घ्या तुळशीच्या रोपाविषयी या '7' गोष्टी
व्यक्तीच्या शरीर आणि स्वास्थ्याबद्दल जागरूकता वाढत असतानाच, मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल समाजात अजूनही खूप गैरसमज आहेत, जागरूकतेच्या अभावामुळे या विकारांचे निदानच होत नाही आणि याबद्दल समाजात अवघडलेपण आहे. अजूनही लोक याला आजार न मानता एक वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. पण अशावेळी डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे हे समजून घ्यायला हवं. आता हळूहळू या गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या आहेत. मानसिक विकारांना तोंड देणाऱ्या व्यक्तींसाठी मनोविकारतज्ज्ञांना भेटणे अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला वा तुमच्या कुटुंबीयांना मनोविकारतज्ज्ञ किंवा थेरपिस्टशी जोडून देणारे तंत्रज्ञानाधारित मार्ग म्हणजे फोन किंवा कम्प्युटर हे जरी खरं असलं तरीही तुम्ही योग्य पावलं अशावेळी उचलायला हवीत. तुमच्या कुटुंबाला आवश्यक असे मानसिक आरोग्यविषयक सहाय्य या मार्गांनी मिळू शकते. फक्त यासाठी तुमची मानसिकता चांगली हवी आणि अशा गोष्टी आपलं कुटुंब निरोगी ठेवण्यासाठी हाताळण्याची हातोटीदेखील हवी.
मानसिक आरोग्याप्रमाणेच लैंगिक बाबी हा विषयदेखील समाजामध्ये फारच कमी प्रमाणात बोलला जातो. लैंगिक बाबी आणि त्यांतून निर्माण निगडित आरोग्याच्या समस्यांबद्दलची संभाषणे नेहमीच दडपून टाकली जातात. लैंगिक आरोग्याशी निगडित समस्यांबद्दल आणि त्या कशा हाताळाव्या याबद्दल तुमच्या कुटुंबीयांना जागरूक करणे अत्यावश्यक आहे. मात्र, या विषयांचे स्वरूप संवेदनशील असल्याने यासंदर्भात तज्ज्ञांना दाखवणे लोकांना अवघड वाटते. अॅप्स, अनेक आरोग्यविषयक नेटवर्क्स आणि तंत्रज्ञानांच्या माध्यमातून लोक आता गाजावाजा न होता सोयीस्करपणे त्यांच्या लैंगिक आरोग्य व स्वच्छता (हायजिन) यांबद्दलच्या अत्यंत व्यक्तिगत आणि खासगी प्रश्नांची उत्तरे भारतातील सर्वोत्तम तज्ज्ञांकडून मिळवू शकतात. पण त्याहीपेक्षा जास्त चांगलं असे विषय तज्ज्ञांशी जाऊन बोलणं. कारण योग्य माणसाकडून मार्गदर्शन मिळवल्यास, पुढे कोणत्याही प्रकारचा त्रास उद्भवल्यास पुन्हा एकदा व्यवस्थित मार्गदर्शन घेता येते. शिवाय कोणत्याही प्रकारचा धोका होण्याचा संभवही नसतो.
वाचा - गुळवेल म्हणजे जणू अमृतच
काही समजुती अत्यंत ठोकळेबाज असल्या तरी सत्य असतात. तुम्हा खाता तसे होता ही त्यातलीच एक. आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊन आणि आरोग्यविषयक परिस्थिती आणि गरजा लक्षात घेऊन अन्नाची निवड करणे त्यानुसार किराणा सामान खरेदी करणे हे तुमच्या कुटुंबासाठी योग्य आहार निश्चित करण्यात आणि प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती आणि आरोग्य सुधारण्यात उपयुक्त ठरू शकते. सर्वात महत्त्वाचा हा तुमच्यासाठी तुमचा आहार असतो. सध्या फास्ट फूड खाणं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी जास्तीत जास्त सकस आहारा आणि योग्य आहार देणं हेदेखील कुटुंबप्रमुख म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्याप्रमाणेच या सर्व बाबींसाठी आपण वेळ आणि लक्ष द्यायला हवं.
तुम्हाला तुमचे कुटुंब वाढवायची इच्छा आहे की नाही हा मुद्दा वेगळा पण पूर्वनियोजन असेल तर तुम्हाला हवे तसे परिणाम मिळतील आणि या प्रक्रियेत तुम्ही निरोगी राहाल याची खातरजमा होते. तसंच कुटुंब नियोजन हा प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे न लाजता आणि अशा गोष्टी न लपवता एकमेकांसह बोलायला हवं. दुर्दैवाने सामाजिक दबाव आणि काही प्रसूतीतज्ज्ञ/स्त्रीरोगतज्ज्ञांच्या (ऑब/गाइन्स) टीकात्मक भूमिकेमुळे स्त्रियांना त्यांनी घेतलेल्या अपॉइंटमेंट्सचा फेरविचार करायला भाग पडलेले आहे. अशा अपॉइंटमेंट्स टाळण्यापेक्षा पर्याय निवडण्यासाठी तुम्ही इंटरनेट व हेल्थ अॅप्सचा वापर करून तुमच्यासारख्याच परिस्थितीतून जाणाऱ्यांच्या प्रतिक्रिया बघून तुमच्या गरजा समजून घेणारे आणि चांगले डॉक्टर शोधू शकता.
बरे नसल्याची भावना किंवा काहीतरी चुकत आहे अशी भावना हा कोणत्याही गंभीर समस्येचा पहिला निदर्शक असू शकतो. उदाहरणार्थ, मधुमेह, हृदयविकार,नैराश्य. तुम्हाला ज्या क्षणी अशी भावना येईल, त्या क्षणी लगेच डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे. नवीन कार्यात्मक रचना भारतात टेलिमेडिसिन घेऊन येत आहे. यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरून डॉक्टरांशी बोलू शकाल किंवा अगदी व्हिडिओ कॉलही करू शकाल आणि तुमच्या समस्येबाबत पटकन सल्ला घेऊ शकाल. तुम्हाला तुमच्या स्वत:च्या किंवा कुटुंबीयांपैकी कोणाच्या स्वास्थ्याबद्दल मन:शांती मिळवून देण्यात हे खूपच उपयुक्त ठरू शकते.
निदान खूपच सकारात्मक असले, तरीही तुम्हाला वाटणाऱ्या सुटकेच्या भावनेच्या तळाशी चिंतेची पाल चुकचुकत असते. जर ते खूपच वाईट असेल, तर तुम्हाला ते स्वीकारणे जड जाते. काहीही म्हणा जेव्हा तुमच्या आरोग्याचा प्रश्न असतो तेव्हा कोणताच धोका पत्करू नका. तुमच्या मनात शंकेची पाल थोडी तरी चुकचुकत असेल तरी किंवा आजाराची अवस्था खूप गंभीर असली तरी तुम्ही सेकंड ओपिनियन (दुसऱ्याचा सल्ला) घेतलाच पाहिजे. आता तंत्रज्ञानामुळे तुम्हाला जगातील सर्वांत अनुभवी आणि मान्यताप्राप्त तज्ज्ञांशी संपर्क साधणे शक्य आहे. तुमच्या हातातील स्मार्टफोनच्या मदतीने आरोग्यसेवेची द्वारे तुमच्यासाठी खुली होऊ शकतात आणि तुमच्या तसेच कुटुंबीयांच्या आरोग्याबाबत निश्चिंत होण्यासाठी तुम्ही या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.
फोटो सौजन्य - Instagram, Giphy