मनोरंजन

अमृता पवार साकारणार ‘स्वराज्य जननी जिजामाता’

Aaditi Datar  |  Jul 10, 2019
अमृता पवार साकारणार ‘स्वराज्य जननी जिजामाता’

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे सर्वेसर्वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडण-घडणीत सगळ्यात मोठा वाटा राजमाता जिजाऊंचा  होता. जिथे-जिथे स्वराज्याबद्दल बोललं जातं तिथे-तिथे या रयतेच्या राजाचा उल्लेख होतोच. आपली लढाई लढण्याचं बळ ज्या माऊलीमुळे शिवबाच्या पंखांमध्ये आलं ती जिजाऊ. शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा लढवय्या घडवणाऱ्या त्या माऊलीचा या प्रवासात मोलाचा वाटा होता. याच माऊलीच्या कर्तृत्त्वाला सलाम करणारी मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येत आहे. ऐतिहासिक मालिकांना मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता सोनी मराठी ‘स्वराज्य जननी जिजामाता’च्या निमित्ताने या वीरमातेची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. 

जिजामातांचं भारदस्त रूप

या मालिकेतून स्वराज्याच्या या जननीचा संपूर्ण प्रवास उलगडणार आहे. या स्वराज्य जननीच्या रूपात दिसणार आहे ललित 205 या सीरियलमध्ये झळकलेली अमृता पवार ही अभिनेत्री. तिचा लुकही सोशल मीडियावर रिव्हिल करण्यात आला आहे.

जिजामातांच्या गेटअपमध्ये अमृता भारदस्त दिसत आहे. त्यामुळे आता स्वराज्य जननी जिजामाताच्या भूमिकेतून अमृता हिच्या अभिनयाचा नवा पैलू पाहणं, औत्सुक्याचं ठरणार आहे.

ऐतिहासिक मालिकांच्या यादीत भर

वेगवेगळ्या विषयाच्या आपण नेहमीच या वाहिनीवर पाहिल्या आहेत. त्यातच आता भर पडली आहे येत्या १९ ऑगस्टपासून राजमातेचा जीवनप्रवास सांगणाऱ्या या मालिकेची. या मालिकेची छोटीशी झलक टीझर स्वरूपात नुकतीच या वाहिनीवर झळकली. ऐतिहासिक मालिकांबद्दल नेहमीच महाराष्ट्रात उत्सुकता असल्याचं पाहायला मिळालं आहे. याच पठडीतली जिजाऊंचं कर्तृत्त्व सांगणारी ही मालिका आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. तेव्हा अमोल कोल्हे आणि ऐतिहासिक मालिका, नाटकं हे समीकरण पुन्हा एकदा स्वराज्य जननी जिजामाता च्या निमित्ताने प्रेक्षक पाहता येणार आहे. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही जगदंब creations ची दुसरी निर्मिती असून स्वराज्यरक्षक संभाजीनंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे.

जिजाऊंचं जीवनचरित्र

या सीरियलबाबत सांगताना जगदंब क्रिएशन्सच्या डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितलं की, शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं, या सीरियलच्या माध्यमातून शक्य होत आहे. ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीही ! ही मालिका केवळ मनोरंजनासाठी नाही तर संस्कारसाठीही असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल!, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा –

सर्वाधिक मानधन घेणारे मराठी कलाकार

पावसाळ्यात जेव्हा कलाकारांनाही आवरता येत नाही भजीचा मोह

कार्तिकी गायकवाड आणि दिप्ती भागवत वारीत सहभागी

Read More From मनोरंजन