Family Trips

अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती | Ashtavinayak Darshan Information In Marathi

Vaidehi Raje  |  Aug 30, 2022
ashtavinayak darshan in marathi

हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते. सनातन धर्मातील प्रमुख आदिपंच देवतांमध्ये श्रीगणेशाचा समावेश आहे. दरवर्षी आपण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणतो आणि गणेशोत्सव साजरा करतो. आबाल वृद्धांचा लाडका गणपतीबाप्पा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. दरवर्षी श्रीगणेशाचा गणेशोत्सव देशभरात ठिकठिकाणी दहा दिवस चालतो.  गणपती हे महाराष्ट्राचेच काय तर संपूर्ण भारताचेच लाडके दैवत आहे. विघ्ने दूर करणाऱ्या गणपतीबाप्पाचे पूजन सगळ्या शुभकार्याच्या सुरुवातीला केले जाते. आपल्या इच्छित कार्याच्या यशासाठी सर्वप्रथम गणपतीची पूजा करून बाप्पाचे आशीर्वाद घेतले जातात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे यादीमध्ये गणपतीबाप्पाची असंख्य देवळे आहेत. त्यातील जागृत देवस्थान देखील गावात एक तरी असतेच. पण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अष्टविनायक स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत. ही प्राचीन देवळे महाराष्ट्राची शान आहे. ही आठही मंदिरे प्रेक्षणीय स्थळी आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात या आठ गणपती मंदिरांना भेटी दिल्याने मन शांत आणि प्रसन्न होते. लोक शुभ कार्य झाल्यावर, किंवा व्हावे म्हणून किंवा नवस फेडायला म्हणून किंवा नवस करायला म्हणून अष्टविनायक दर्शन यात्रा (Ashtavinayak Darshan Information In Marathi) करतात. अष्टविनायक दर्शन केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात. अष्टविनायक दर्शन किलोमीटर मध्ये किती प्रवास आहे असा प्रश्न पडतो, तर हा संपूर्ण प्रवास 654 किलोमीटरचा आहे. दोन ते तीन दिवसांत अष्टविनायक दर्शन (Ashtavinayak Darshan In Marathi ) पूर्ण करता येते. जाणून घेऊया अष्टविनायक दर्शनाची संपूर्ण माहिती आणि या यात्रेचे महत्व! 

अष्टविनायक दर्शन यात्रेचं महत्त्व | Importance Of Ashtavinayak Yatra

अष्टविनायक दर्शन संपूर्ण माहिती

अष्टविनायक हा शब्द ‘अष्ट’ आणि ‘विनायक’ या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झाला आहे. अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपले लाडके दैवत गणपती. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीची पूजा केली जाते. कारण गणपतीबाप्पा चौदा विद्या ,चौसष्ट कलांचा अधिपती आहे आणि सर्व विघ्ने दूर करणारा गणपतीबाप्पा आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो आणि समृद्धी देतो. ही मंदिरे प्रेक्षणीय स्थळांपैकी आहेत. या आठही मंदिरांची स्थापत्य रचना अतिशय उत्कृष्ट आणि मनाला आनंद देणारी आहे. वास्तविक पुण्याच्या जवळ विविध गावांत श्रीगणेशाची आठ मंदिरे आहेत, त्यांना अष्टविनायक म्हणतात. या मंदिरांना स्वयंभू मंदिरे असेही म्हणतात. स्वयंभू म्हणजे येथे भगवान श्रीगणेश स्वतः प्रकट झाले आहेत. म्हणजेच कोणीही त्यांची मूर्ती बनवून बसवली नाही. गणेश आणि मुद्गल पुराण यांसारख्या विविध पुराणांमध्येही या मंदिरांचा उल्लेख आढळतो. ही मंदिरे अतिशय प्राचीन असून त्यांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. या मंदिरांच्या यात्रेला अष्टविनायक तीर्थयात्रा असेही म्हणतात. अष्टविनायक मंदिराच्या संदर्भात असे मानले जाते की तीर्थ गणेशाची ही आठ पवित्र मंदिरे स्वतःच उगम पावली आणि जागृत झाली. धार्मिक नियमानुसार मोरगावपासून ही तीर्थयात्रा सुरू करावी. हा प्रवास मोरगाव जवळून सुरू करून तिथेच संपला पाहिजे असे शास्त्र सांगते. 

भक्त अष्टविनायक यात्रा करण्यास उत्सुक का असतात याचे कारण सोपे आहे: त्यांचा असा विश्वास आहे की भगवान गणेशाचे वैयक्तिक दर्शन प्रत्येक मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊनच केले जाऊ शकते. त्यांची प्रगाढ श्रद्धाच त्यांना या सर्व मंदिरांना भेट देण्यास प्रवृत्त करते. या मंदिरांना भेट देऊन त्यांना केवळ आनंद मिळत नाही तर मनाची शुद्धताही प्राप्त होते. त्यांना देवावर पूर्वीपेक्षा अधिक खोल आणि शुद्ध विश्वासाचा अनुभव येतो. शिवाय, या मंदिरांच्या मूर्ती मानवी हातांनी नव्हे तर नैसर्गिकरीत्या पृथ्वीपासून तयार झाल्या आहेत. त्यामुळे या मंदिरांना भेट देणे म्हणजे गणपतीच्या शुद्ध स्वरूपाचे दर्शन घेण्यासारखे आहे.

गणपती मंदिरांच्या स्थानाचा एक पैलू असाही आहे की ही साधारणपणे पाण्याच्या जवळ आढळतात. गणपतीला समर्पित केलेले मंदिर एखाद्या नदीच्या किंवा तलावाच्या किंवा लहान तलावाच्या काठावर असू शकते आणि कधीकधी तुम्हाला पाण्याची टाकी किंवा जवळपास विहीर दिसेल. असे मानले जाते की भगवान इंद्र, देवांचा राजा, पृथ्वीवर पाण्याचा प्रवाह त्याच्या अनेक रूपांमध्ये निर्देशित करतो. जेव्हा आकाशातून पावसाच्या रूपात पाणी येते तेव्हा ते सर्वात शुद्ध आणि गोड मानले जाते. तलाव, विहीर किंवा महासागर हे कोणतेही रूप असो, ते थेट आकाशातून आल्याने त्या पाण्यात दिव्य तेज असते, असे मानले जाते. या दिव्य तेजातच श्रीगणेशाचे रूप वास करते. त्यामुळे पाणी हा निसर्गातील सर्वात विस्तृत आणि सर्वशक्तिमान घटक मानला जातो. खरे तर पाणी हे गणपतीच्या पंचमहाशक्तीपैकी एक मानले जाते. म्हणूनच भगवान गणेशाचे भक्त त्यांच्या आयुष्यात एकदा तरी अष्टविनायक यात्रेला जाण्याचा प्रयत्न करतात.

अधिक वाचा – महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे

अष्टविनायक दर्शन यात्रेचा क्रम | Ashtavinayak Darshan Sequence In Marathi

अष्टविनायक दर्शन किलोमीटर

अष्टविनायक दर्शन यात्रेचा क्रम पुढील प्रमाणे आहे.
 

स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम् ॥१॥ 

बल्लाळं मुरुडे विनायकमहं चिन्तामणिं थेवरे ॥२॥

लेण्याद्रौ गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरे ॥३॥

ग्रामे रांजणनामके गणपतिं कुर्यात् सदा मङ्गलम् ॥४॥

या श्लोकामध्ये अष्टविनायकांची नावे तसेच त्यांच्या स्थानाचे वर्णन केले आहे. तसेच त्यांचा क्रम देखील सांगितला आहे. 

पहिला गणपती – मोरगावचा श्री मयुरेश्वर

दुसरा गणपती – सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर

तिसरा गणपती – पालीचा श्री बल्लाळेश्वर

चौथा गणपती – महाडचा श्री वरदविनायक

पंचम गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी

सहावा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज

सातवा गणपती – ओझरचा श्री विघ्नेश्वर

आठवा गणपती – रांजणगावचा श्री महागणपती

अष्टविनायकाच्या यात्रेमध्ये पुण्यात आणि आसपासच्या आठ प्राचीन पवित्र गणपती मंदिरांना भेट द्यायची असते. या प्रत्येक मंदिराचा स्वतःचा वेगळा इतिहास आणि आख्यायिका आहे. आणि ही सर्व माहिती प्रत्येक मंदिरातील गणपतीच्या मूर्तींप्रमाणेच अद्वितीय आहे. या प्रत्येक मंदिरातील गणेशमूर्तीचे स्वरूप आणि गणेशाच्या सोंडेचे स्थान एकमेकांपासून भिन्न आहेत.शास्त्राप्रमाणे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आठही गणपतींचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा पहिल्या गणपतीचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. या आठ मंदिरांपैकी प्रत्येक मंदिर स्वयंभू आणि अत्यंत जागृत मानले जाते. मोरेश्वर, महागणपती, चिंतामणी, गिरिजात्मज, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर आणि वरद विनायक अशी या विविध मंदिरांमध्ये गणपतीची वेगवेगळी नावे आहेत. ही मंदिरे मोरगाव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर, सिद्धटेक, पाली आणि महाड येथे असून पुणे, अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात आहेत. या 8 पैकी 6 मंदिरे पुणे जिल्ह्यात आणि 2 रायगड जिल्ह्यात असली तरी ती तुलनेने पुण्याच्या जवळ आहेत.

अधिक वाचा – महाराष्ट्रात फिरता येणारे अप्रतिम समुद्रकिनारे

अष्टविनायक दर्शन किती किलोमीटर आहे

अष्टविनायक दर्शन एकूण यात्रा ही अंदाजे ६९४ किमी आहे. 

अष्टविनायक यात्रा क्रममंदिर ठिकाण अंतरमार्ग 
मोरेश्वर मोरगांव , पुणे 
सिद्धिविनायक सिद्धटेक , अहमदनगर मोरगांव -सिद्धटेक अंदाजे ६५ किमी 
बल्लाळेश्वर पाली , रायगड सिद्धटेक -पाली अंदाजे २२२ किमी 
वरदविनायक महाड, खोपोली जवळ , रायगड पाली -महाड अंदाजे ४२ किमी 
चिंतामणी थेऊर -पुणे महाड- थेऊर अंदाजे ११० किमी 
गिरिजात्मज लेण्याद्री -पुणे थेऊर – लेण्याद्री अंदाजे १०० किमी 
विघ्नेश्वर ओझर- पुणे लेण्याद्री -ओझर अंदाजे १५ किमी 
महागणपती रांजणगाव-पुणे ओझर -रांजणगाव अंदाजे ७० किमी 
रांजणगाव- मोरगांव अंदाजे ७० किमी 
अष्टविनायक दर्शन किलोमीटर

अष्टविनायक दर्शन नकाशा

अष्टविनायक यात्रा कशी करावी हा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच एका स्थानातून दुसऱ्या स्थानी जाण्यासाठी जवळचा व चांगला रस्ता कोणता आहे असाही विचार मनात येतो. तर अशावेळी आपल्या मदतीला येतो नकाशा! हल्ली मोबाईलवर डिजिटल नकाशे उपलब्ध झाल्यापासून हा प्रश्न जवळजवळ सुटलाच आहे. तरीही अष्टविनायक दर्शन यात्रेचे नियोजन करण्याआधी खालील नकाशा एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला प्रवासाचे नियोजन करणे सोपे जाईल.

अष्टविनायक दर्शन नकाशा

अधिक वाचा –अष्टविनायकाची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घ्या

अष्टविनायक संपूर्ण माहिती | Ashtavinayak Darshan Information In Marathi

आपण वर बघितले की पुण्यातील विविध भागात व पुण्याच्या जवळ श्रीगणेशाची आठ मंदिरे आहेत, त्यांना अष्टविनायक म्हणतात. या मंदिरांना स्वयंभू मंदिरे असेही म्हणतात. स्वयंभू म्हणजे येथे भगवान स्वतः प्रकट झाले होते आणि कोणीही त्यांची मूर्ती स्थापन केली नव्हती. गणेश पुराण आणि मुद्गल पुराण यांसारख्या विविध पुराणांमध्येही या मंदिरांचा उल्लेख आढळतो हे ही आपण पहिले. ही मंदिरे अतिशय प्राचीन असून त्यांना ऐतिहासिक महत्त्वही आहे. या मंदिरांच्या यात्रेला अष्टविनायक तीर्थ असेही म्हणतात. जाणून घ्या त्या आठ प्राचीन व ऐतिहासिक मंदिरांबद्दल- 

पहिला गणपती – मोरगावचा मोरेश्वर 

अष्टविनायक दर्शन

पुण्यातील मोरगाव परिसरात मोरेश्वर उर्फ मयुरेश्वर विनायकाचे मंदिर आहे. पुण्यापासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या मयूरेश्वर मंदिराच्या चार कोपऱ्यांवर बुरुज आणि उंच दगडी भिंती आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या चार युगांचे प्रतीक मानले जाणारे चार दरवाजेही येथे आहेत. येथे गणेशाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असून त्याची सोंड डावीकडे आहे. येथील गणेशमूर्ती ही चतुर्भुज व त्रिनेत्री आहे. येथे नंदीचीही मूर्ती आहे. या ठिकाणी श्रीगणेशाने सिंधुरासुर नावाच्या राक्षसाचा मोरावर स्वर होऊन वध केला असे सांगितले जाते. म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात.

प्राचीन काळी गंडकीवर चक्रपाणी नावाच्या महान राजाचे राज्य होते. सूर्याची उपासना करून त्यांना पुत्र झाला. त्याचे नाव  सिंधू असे ठेवले. सिंधूनेही सूर्याची उपासना करून अमरत्व प्राप्त केले. अमरत्व प्राप्त झाल्यावर सिंधूची बुद्धी भ्रष्ट झाली. त्याला फक्त त्रैलोक्याचे राज्य मिळवायचे होते. मग त्याने पृथ्वी जिंकली. त्याने इंद्राच्या अमरावतीवर हल्ला केला. इंद्राचा सहज पराभव झाला. त्याने स्वर्ग काबीज केला; तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध सुरू केले. पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता आला नाही. सिंधूने त्याच्या अतुलनीय सामर्थ्याने विष्णूला वश करून गंडकीमध्ये राहण्याची आज्ञा केली. मग सिंधूने सत्यलोक आणि कैलासवरही आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. त्याने सर्व देवतांना गंडकीत कैद केले. मग सर्व देवतांनी गणेशाची आराधना सुरू केली. प्रसन्न होऊन गणेशाने देवतांना आश्वस्त केले. मी मयुरेश्वराच्या नावाने देवी पार्वतीच्या पोटी अवतार घेईन आणि तुम्हाला सिंधूच्या दुःखातून मुक्त करीन. सिंधूच्या त्रासाला कंटाळून शंकर मेरू पर्वतावर पार्वतीसोबत राहत होते. नंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेशाची पूजा करत असताना गणेशाची मूर्ती जिवंत झाली. त्याने मुलाचे रूप धारण केले आणि पार्वतीला म्हणाला, “आई, मी तुझा मुलगा झालो आहे.”. 

त्यानंतर श्रीगणेश आणि सिंधू यांच्यात प्रचंड युद्ध झाले. श्रीगणेश एका मोठ्या मोरावर बसला आणि युद्ध करू लागला. त्याने कमलासुराचा वध केला. कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले गेले. कमलासुराचे मस्तक ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे मोरगाव परिसर. तेव्हा गणेशाने सिंधू राजाचा पराभव करून सर्व देवांना मुक्त केले. तेथेच गणेशभक्तांनी विनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मोरावर बसलेल्या गणेशाने राक्षसाचा वध केला म्हणून याला मयूरेश्वर किंवा मोरेश्वर असे म्हणतात आणि त्या जागेला मोरगाव असे नाव पडले.

अधिक वाचा – पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं

दुसरा गणपती – सिद्धटेकचा सिद्धेश्वर 

अष्टविनायक दर्शन

सिद्धिविनायक मंदिर कर्जत तहसील, अहमदनगर येथे आहे. पुण्यापासून 200 किमी अंतरावर भीमा नदीवर हे मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 200 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूंनी सिद्धटेकमध्ये सिद्धी प्राप्त केली होती असे म्हणतात. सिद्धिविनायक मंदिर डोंगराच्या माथ्यावर बांधलेले आहे. त्याचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे. या मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी डोंगराचा प्रवास करावा लागतो. सिद्धिविनायक मंदिरातील गणेशमूर्ती 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद आहे. येथे श्रीगणेशाची सोंड उजव्या हाताला आहे.

प्राचीन काळी ब्रह्मदेवाने विचार केला की, आपण सृष्टी निर्माण केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी श्रीगणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली. गणेशाने त्यांना एकाक्षरी मंत्र दिला होता. ब्रह्मदेवाच्या कठोर तपश्चर्येने श्रीगणेश प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, ‘तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.’ मग देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. त्यावेळी क्षीरसागरात झोपलेल्या भगवान विष्णूंच्या कानातून मधु आणि कैटभ हे दोन राक्षस जन्माला आले. त्यांनी ब्रह्मदेवाचा छळ सुरू केला. संपूर्ण पृथ्वी हादरली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंना जागे केले. विष्णू आणि मधु-कटभ यांच्यात घनघोर युद्ध झाले. पाच हजार वर्षे युद्ध झाले तरी विष्णू त्या राक्षसांचा वध करू शकले नाहीत. म्हणून ते भगवान महादेवांकडे गेले. युद्धाच्या सुरुवातीला तू गणेशाची स्तुती केली नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाही, असे शंकर म्हणाले. त्यानंतर विष्णू एका पवित्र टेकडीवर आले. तेथे त्यांनी ‘श्री गणेशाय नमः’ या सहा अक्षरी मंत्राने श्रीगणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने विनायक (गणेश) प्रसन्न झाले. विनायकाच्या कृपेने भगवान विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली. मग त्यांनी मधु-कैटभाचा वध केला. विनायकाने ज्या ठिकाणी प्रसन्न होऊन वरदान दिले त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी मोठे मंदिर बांधले आणि त्यात गंडकिशिलाच्या विनायकाची मूर्ती बसवली. या ठिकाणी विष्णूचे कार्य सिद्ध झाले, म्हणून या स्थानाला सिद्धटेक आणि येथील विनायकाला ‘श्रीसिद्धिविनायक’ असे म्हणतात. तेव्हापासून सिद्धटेक हे गणेशाचे पवित्र मंदिर म्हणून ओळखले जाते.

कालांतराने मंदिर नष्ट झाले. नंतर या टेकडीवर विनायकाने एका मेंढपाळाला दर्शन दिले. गुराखी रोज श्रीगणेशाला भीमा नदीच्या पाण्यात आंघोळ घालत आणि शिदोरी अर्पण करत असे. तेव्हा श्रीगणेशाने त्याला सांगितले. माझी पूजा तुम्हीच करा. मग त्यांनी पुरोहित नावाच्या ब्राह्मणाकडून श्रींची पूजा करायला सुरुवात केली. पेशव्यांच्या काळात येथे मंदिर बांधण्यात आल्याची आख्यायिका आहे.

तिसरा गणपती – पालीचा बल्लाळेश्वर 

अष्टविनायक दर्शन

रायगड येथील पाली गावातील या मंदिराचे नाव बल्लाळ या गणेशभक्ताच्या नावावरून आहे. बल्लाळच्या आख्यायिकेबद्दल असे म्हटले जाते की या परम भक्ताला त्याच्या श्रीगणेशावरील भक्तीमुळे त्याच्या कुटुंबाने गणेशमूर्तीसह जंगलात सोडले होते. जिथे त्याने फक्त गणपतीच्या नामस्मरणात वेळ घालवला होता. यावर प्रसन्न होऊन श्रीगणेशाने त्याला या ठिकाणी दर्शन दिले आणि पुढे हे मंदिर बल्लाळच्या नावाने बांधले गेले. हे मंदिर गोवा महामार्गावर नागोठणेच्या आधी आहे.

प्राचीन काळी, कल्याण नावाचा व्यापारी सिंधू खोऱ्यातील कोकण पल्लीर (पाली गाव) नावाच्या गावात राहत होता. त्यांच्या पत्नीचे नाव इंदुमती होते. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ ठेवले. बल्लाळ जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याचा गणेशमूर्ती पूजेकडे कल अधिकच दिसू लागला. हळूहळू तो गणेशाचे ध्यान करू लागला. त्याचे मित्रही गणेशभक्तीत वेडे झाले. बल्लाळ आपल्या मित्रांसह जंगलात गेला आणि गणेशाच्या मूर्तीची पूजा करू लागला. बल्लाळाने मुलांचा छळ केल्याची चर्चा गावात सुरू झाली. लोक कल्याणशेठजींकडे गेले आणि ‘बल्लाळने आमची मुलं बिघडवली’ अशी तक्रार करू लागले.

आपल्या मुलाने एवढ्या लहान वयात भक्तीमार्गाला सुरुवात करून इतर मुलांनाही त्याच मार्गाला लावले याचा राग कल्याणशेठजींना होता. संतप्त होऊन ते एक मोठी काठी घेऊन बल्लाळ होता त्या जंगलात गेले. तेथे बल्लाळ आपल्या साथीदारांसह गणेशमूर्तीची पूजा करत होता. सर्वजण गणेशाचा जप करत होते. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात लीन झाला होता. ते पाहून कल्याणशेठजींच्या पायाची आग मस्तकात गेली. ते ओरडत आणि शिव्या देत तिथे गेले. त्यांनी ती पूजा मोडली. गणेशमूर्ती फेकून देण्यात आली. बाकीची मुले घाबरून पळून गेली; पण बल्लाळ गणेश ध्यानात लीन होता. कल्याण सेठजींनी बल्लाळला काठीने मारहाण केली. बल्लाळ रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला; पण कल्याणला त्याची दया आली नाही. त्यांनी बल्लाळाला झाडाला बांधले. कल्याणशेठ रागाने म्हणाला, ‘तुझा गणेश आता तुला वाचवायला आला पाहिजे. तू घरी आलास तर तुला मारून टाकीन. तुझे माझ्याशी असलेले नाते कायमचे तुटले आहे.’ असे म्हणून कल्याणशेठ निघून गेले.

काही वेळाने बल्लाळ शुद्धीवर आला. त्याचे शरीर थरथरत होते. त्याच अवस्थेत तो गणेशाकडे धावला आणि त्याने प्रार्थना केली की, “भगवान, तू विघ्नहर्ता आहेस. तू तुझ्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीस… ज्याने कोणी गणेशाची मूर्ती फेकून मला मारले तो आंधळा, बहिरा, मुका आणि कुष्ठरोगी होईल. मी आता तुझा विचार करतच मरेन.” बल्लाळची प्रार्थना ऐकून विनायक-गणेश ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाले. बल्लाळचे बंधन तुटले. त्याचे शरीर तेजस्वी झाले. गणेश बल्लाळला म्हणाला, “ज्याने तुला त्रास दिला आहे, त्याला या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मातही खूप त्रास सहन करावा लागेल.” तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तू माझा भक्त, महान गुरु आणि दीर्घायुष्याचा प्रवर्तक होशील. आता तुला काय हवे ते माग.” तेव्हा बल्लाळ म्हणाला- “तुम्ही नेहमी या ठिकाणी राहून तुमच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा. ही भूमी गणेशक्षेत्र म्हणून ओळखली जावी. तेव्हा गणेश म्हणाले – “तुझ्या इच्छेनुसार मी येथे ‘बल्लाळ विनायक’ या नावाने सदैव वास करीन. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येथे येणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.” तीच मूर्ती आज बल्लाळेश्वर म्हणून ओळखली जाते. 

चौथा गणपती – महाडचा वरदविनायक 

अष्टविनायक दर्शन

रायगडच्या महाड मध्ये वरदविनायक मंदिर आहे. एका मान्यतेनुसार वरदविनायक भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देतो. या मंदिरात नंदादीप नावाचा दिवा असल्याचीही एक आख्यायिका आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून अखंड तेवत आहे. प्राचीन काळी भीम नावाचा शूर आणि उदार राजा होऊन गेला. मुलबाळ नसल्याने तो दु:खी होता. मग तो आपल्या राणीसह जंगलात गेला. त्याचे दु:ख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एक उपाय सांगितला. तेव्हा राजाने घोर तपश्चर्या केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. “लवकरच तुला मुलगा होईल,” त्याने राजाला सांगितले. काही दिवसांनी राजाला मुलगा झाला. त्याचे नाव रुक्मांगद असे ठेवले. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने संपूर्ण राज्य त्याच्या स्वाधीन केले आणि त्याला एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. एकदा रुक्मांगद  शिकारीसाठी जंगलात भटकत असताना तो वाचकन्वी ऋषींच्या आश्रमात गेला. ऋषींच्या पत्नीचे नाव मुकुंदा होते. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्या प्रेमात पडली पण पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे मुकुंदाने रुक्मांगदाला ‘तू कुष्ठरोगी होशील’ असा शाप दिला. शाप मिळाल्यानंतर सोन्यासारखे चमकणारे रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी होऊन रुक्मांगद जंगलात भटकत असताना नारदमुनींना भेटला. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरीच्या कदंब मंदिरात स्नान केले आणि तेथे चिंतामणी गणेशाची पूजा केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.

इकडे मुकुंदा रुक्मांगदाच्या प्रेमात झुरू लागली. तेव्हा मुकुंदाची येथील स्थिती पाहून इंद्राने रुक्मांगदाचे रूप धारण करून मुकुंदाची इच्छा पूर्ण केली. त्यांच्यापासून मुकुंदाला मुलगा झाला. त्याचे नाव ग्रीत्सम्द असे ठेवले.  ग्रीत्सम्दाला आपल्या जन्माचे सत्य समजले तसेच त्याच्या  जन्माची कहाणी सर्वांनाच ठाऊक होती. परिणामी, तो हळूहळू अपमानित होऊ लागला. आईच्या पापामुळे सर्वजण त्याचा तिरस्कार करू लागले. त्यानंतर  ग्रीत्सम्दाने त्याच्या आईला शाप दिला. त्यानंतर त्याने प्रायश्चित्तासाठी पुष्पक (भद्रक) वनात तपश्चर्या सुरू केली. त्याने विनायकाची पूजा केली. त्यामुळे श्रीगणेश प्रसन्न झाले. श्रीगणेशाने त्यास वर मागण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला, “तुम्ही या वनात राहून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा.” ते पुष्पक किंवा भद्रक जंगल म्हणजे आजचा महाड प्रदेश. येथील विनायकाला ‘वरदविनायक’ असे म्हणतात कारण याच ठिकाणी  ग्रीत्सम्दाचा भाग्योदय झाला.  ग्रीत्सम्द हे गणेश पंथाचे संस्थापक मानले जातात.

पाचवा गणपती – थेऊरचा चिंतामणी 

अष्टविनायक दर्शन

थेऊर गावात भीमा, मुळा आणि मुठा या तीन नद्यांच्या संगमावर चिंतामणी मंदिर आहे. या मंदिरात जे व्यथित मनाने जातात त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर होऊन शांती मिळते, असा विश्वास आहे. या मंदिराशी संबंधित अशी आख्यायिका देखील आहे की ब्रह्मदेवाने स्वतःचे अस्वस्थ मन शांत करण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या केली होती.

प्राचीन काळी अभिजित नावाचा राजा होता. त्यांच्या पत्नीचे नाव गुणवती होते. राजाला मूलबाळ नव्हते. मग वैशंपायन नावाच्या ऋषींच्या आज्ञेवरून राजा-राणींनी वनात जाऊन तपश्चर्या केली. पुढे गुणवंतीला मुलगा झाला. त्याचे नाव गणासूर असे ठेवले. एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिल मुनींकडे चिंतामणी हा मणी होता. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिल मुनींनी गणासुराला पंचपक्वान्नाचे जेवण खाऊ घातले. गणासुराला ते रत्न हवे होते, पण कपिल मुनींनी ते देण्यास नकार दिला. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने ऋषींकडून ते रत्न बळजबरीने घेतले. त्यांनी देवीला सर्व हकीकत सांगितली आणि देवीने ऋषींना गणपतीची प्रार्थना करण्याचा सल्ला दिला. श्रीगणेशाने ऋषींना चिंतामणी परत आणण्याचे वचन दिले. श्रीगणेशाने गणासुराला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न मिळवून पुन्हा ऋषींना दिले.  ऋषींनी ते रत्न गणपतीच्या कंठात घातले आणि तेंव्हापासून कंठात चिंतामणी रत्न घातलेला गणपती “चिंतामणी विनायक” म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला ‘कदंबपूर’ असेही म्हणतात.

चिंतामणी गणेश हे पेशवे घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव पेशवे हे याच मंदिरात त्यांच्या अखेरच्या दिवसांत  वास्तव्यास होते आणि त्यांनी त्यांचे प्राण याच मंदिरात गणपतीचे नाव घेत सोडले. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केले. त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपात अवतीर्ण होऊन त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.

अधिक वाचा – महाराष्ट्राची शान असलेले महाराष्ट्रातील किल्ले

सहावा गणपती – लेण्याद्रीचा गिरिजात्मज

अष्टविनायक दर्शन यात्रा

लेण्याद्री गावात गिरिजात्मज अष्टविनायक मंदिर आहे, म्हणजे गिरिजाचा आत्मज म्हणजेच माता पार्वतीचा पुत्र म्हणजेच श्रीगणेश होय. हे मंदिर पुणे-नाशिक महामार्गावर पुण्यापासून ९० किमी अंतरावर आहे. लेण्याद्री पर्वतावरील बौद्ध लेण्यांच्या जागेवर हे देऊळ बांधले आहे. या पर्वतावर 18 बौद्ध लेणी आहेत, त्यापैकी 8 व्या लेणीमध्ये गिरजात्मज विनायक मंदिर आहे. या लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात. मंदिरात जाण्यासाठी सुमारे 300 पायऱ्या चढाव्या लागतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर एकच मोठा दगड कापून बांधण्यात आले आहे.

गजानन हाच पुत्र व्हावा या इच्छेने पार्वतीने लेण्याद्रीच्या गुहेत 12 वर्षे तप केले. तिच्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाले त्यांनी पार्वतीला वचन दिले की मी तुझा पुत्र होईन आणि तुझ्या इच्छा आणि लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करीन. पार्वतीने भाद्रपद चतुर्थीला गजाननाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. मूर्ती जिवंत झाली आणि पार्वतीपुढे पुत्ररूपात प्रकट झाली. गजाननाला सहा हात, तीन डोळे आणि सुंदर शरीर होते.

गिरिजात्मज गणेशाने या परिसरात 12 वर्षे तपश्चर्या केली. अगदी लहान वयातच त्याने राक्षसांचा वध करून सर्वांना अत्याचारातून मुक्त केले. या परिसरात गौतममुनींनी गणेशाची पूजा केली. या प्रदेशात श्रीगणेशाने ‘मयुरेश्वर’ अवतार घेतला असे म्हणतात. या परिसरात गिरिजात्मज गणेशाचे वास्तव्य सुमारे 15 वर्षे होते. त्यामुळे हा परिसर अत्यंत पवित्र मानला जातो.

सातवा गणपती – ओझरचा विघ्नेश्वर 

अष्टविनायक दर्शन यात्रा

हे मंदिर पुण्यातील ओझर जिल्ह्यात आहे. पुणे-नाशिक रस्त्यावर सुमारे ८५ किमी अंतरावर हे मंदिर बांधले आहे. एका पौराणिक कथेनुसार विघ्नासूर नावाचा राक्षस मुनींचा छळ करत असताना याच ठिकाणी श्रीगणेशाने त्याचा वध केला. तेव्हापासून हे मंदिर विघ्नेश्वर, विघ्नहर्ता आणि विघ्नहर म्हणून ओळखले जाते.

प्राचीन काळी हेमावती नगरीवर अभिनंदन नावाचा राजा राज्य करत होता. आपल्याला इंद्रपद मिळावे, असा विचार तो करू लागला. ही बातमी इंद्राला नारदमुनींकडून स्वर्गात समजली होती. तो घाबरला. त्यांनी अभिनंदनाच्या यज्ञात व्यत्यय आणण्यासाठी काळाचे स्मरण केले. त्यावेळी ते असुर रूपात प्रकटले. इंद्राने त्यांना आज्ञा केली, ‘अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न निर्माण कर, त्याचा यज्ञ नष्ट कर. त्याने परवानगी मिळवून केवळ यज्ञच नष्ट केला नाही तर पृथ्वीवरील सर्व वैदिक कर्मांचा नाश केला. धर्म नाहीसा झाला. ही मोठी संकटे देवतांवर आली. मग सर्व देवांनी गजाननाची पूजा केली. त्यावेळी गजानन पराशर मुनींच्या आश्रमात राहत होते. देवतांच्या पूजेने गजानन प्रसन्न झाले. त्त्यांनी देवांना आश्वासन दिले की ‘मी तुमचे रक्षण करेन. त्यानंतर गजाननाने पराशर ऋषींच्या पुत्राच्या अवतारात जन्म घेतला  त्याने विघ्नसुराशी मोठे युद्ध केले. गजाननाच्या अफाट सामर्थ्यासमोर विघ्नसूर हरला व त्याने शरणागती पत्करली. गजाननाने त्याला आज्ञा केली, ‘ज्या ठिकाणी माझे भजन-पूजा-कीर्तन होत आहे तेथे तू जाऊ नकोस.’ तेव्हा विघ्नसुराने गजाननाला विचारले, ‘तुझ्या नावामागे माझे नाव असावे. या भागाला ‘विघ्नहर’ किंवा ‘विघ्नेश्वर’ असे नाव द्यावे. तेव्हा गजानन म्हणाला, “मी आजपासून ‘विघ्नेश्वर’ झालो आहे..’विघ्नेश्वर’ नामाचा जप करणाऱ्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतील.”

त्यामुळे या ठिकाणी गजाननाला ‘विघ्नेश्वर’ किंवा ‘विघ्नहर’ हे नाव पडले. त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दुपारी देवतांनी नैऋत्य दिशेला विघ्नेश्वर गजाननाची स्थापना केली. ही घटना ओझरमध्ये घडली. हेच ओझरचे ‘श्री विघ्नेश्वर विनायक’ मंदिर होय. 

आठवा गणपती – रांजणगावचा महागणपती 

अष्टविनायक दर्शन यात्रा

पुण्याजवळ रांजणगाव येथे महागणपती मंदिर आहे. हे मंदिर ९-१०व्या शतकातील असल्याचे मानले जाते. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेकडे असून ते खूप मोठे आणि सुंदर आहे. येथील गणपतीची मूर्ती महोत्कट या नावानेही ओळखली जाते. एका मान्यतेनुसार या मंदिरातील मूळ गणेशमूर्ती परकीय आक्रमकांपासून संरक्षण करण्यासाठी तळघरात लपवून ठेवण्यात आली आहे.

 प्राचीन काळी ग्रीत्समद नावाचे एक महान व विद्वान ऋषी होऊन गेले. ते अनेक शास्त्रांमध्ये पारंगत होते. ते गणेशाचे परम भक्त होते. एकदा एक लाल रंगाचा मुलगा त्यांना सापडला. त्यांनी त्याला आपला मुलगा मानले. “मी मोठा झाल्यावर त्रिलोकाला पार करून इंद्रावर विजय मिळवीन,” असे तो मुलगा म्हणाला. मग ऋषींनी त्याला “गणानां त्वां’ हा गणेशमंत्र सांगितला. मुलाने जंगलात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला अपार शक्ती दिली. त्याने त्याला लोखंड, चांदी आणि सोन्याची तीन नगरे दिली. ‘भगवान शिवाशिवाय या त्रिपुराचा कोणीही नाश करणार नाही. भगवान शिव एका बाणाने या त्रिपुराचा नाश करतील आणि तुम्ही मुक्त व्हाल. असा वर दिला.

श्रीगणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासुर उन्मत्त झाला. त्याने त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडले. त्याने सर्व देवांनाही जिंकले. तेव्हा सर्व देव महादेवांना शरण गेले. महादेवांनी त्रिपुरासूराला मारण्याचे वचन दिले. तेव्हा भगवान शिव त्रिपुरासुरस मारण्यासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासुर आणि महादेव यांच्यात घनघोर युद्ध झाले; पण ते त्रिपुरासुरास नष्ट करू शकले नाहीत. तेव्हा नारद त्यांना भेटले आणि म्हणाले, ‘युद्धाच्या प्रारंभी आपण विघ्नहरी गणेशाचे स्मरण केले नव्हते, त्यामुळे आपण जिंकू शकला नाहीत. त्यानंतर नारदांनी भगवान शंकराला प्रसिद्ध अष्टश्लोकोत्तम स्तोत्र ‘प्रणाम्य शिरसा देवं” सांगितले.. त्या स्तोत्राने महादेव गणेशाची आराधना करत असताना त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि ‘मी गणेश आहे’ असे म्हणाला आणि वर मागण्यास सांगितले. महादेवांनी त्रिपुरासुरवर विजय मिळावा असा वर मागितला. तेव्हा श्रीगणेशाने वर दिला आणि या ठिकाणाला लोक मणिपूर (रांजणगाव) म्हणतील असे सांगून श्रीगणेश अदृश्य झाले.

त्यानंतर महादेव आणि त्रिपुरासुर यांच्यात प्रचंड युद्ध झाले आणि शेवटी महादेवांनी एकाच बाणाने त्रिपुराचा आणि त्रिपुरासूरचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली; म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. त्रिपुरासुराशी युद्ध जिंकण्यासाठी भगवान महादेवांनी या ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा केली. तोच हा रांजणगाव म्हणजेच मणिपूरचा श्री महागणपती आहे.

अधिक वाचा – गणेश चतुर्थीची माहिती मराठीत

अष्टविनायक गणपती दर्शन यात्रेसंबंधी पडणारे सामान्य प्रश्न । FAQ 

प्रश्न – अष्टविनायक यात्रा का करतात | Why To Do Ashtavinayak Yatra?

उत्तर – लोक नवस पूर्ण करण्यासाठी किंवा मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून ही यात्रा करतात. तसेच या मंदिरांना प्राचीन , ऐतिहासिक व धार्मिक महत्व आहे. ही स्वयंभू व जागृत देवस्थाने आहेत. म्हणूनच लोक अष्टविनायक यात्रा करतात.

प्रश्न – पुण्यात अष्टविनायक दर्शन यात्रेतील किती गणपती आहेत? 

उत्तर – अष्टविनायकाच्या 8 मंदिरांपैकी पैकी 6 मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत आणि 2 मंदिरे रायगड जिल्ह्यात असली तरी ती तुलनेने पुण्याच्या जवळ आहेत.

प्रश्न – अष्टविनायक दर्शन यात्रेचा क्रम कसा असावा? 

उत्तर – अष्टविनायकाची यात्रा ही मोरगावच्या मोरेश्वराच्या दर्शनाने सुरु करायची असते आणि  त्यानंतर सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगांव याक्रमाने श्रीगणेशाचे दर्शन घ्यायचे असे शास्त्र आहे. त्यानंतर पुन्हा पहिल्या मोरगावच्या गणपतीचे दर्शन घेऊनच या तीर्थयात्रेची सांगता करावी. 

प्रश्न – अष्टविनायक दर्शनासाठी किती दिवस लागतात?

उत्तर – बाईक किंवा कारने अष्टविनायक यात्रा दोन दिवसांत करता येण्यासारखी आहे. तुम्हाला थोडी आरामात आणि निसर्गरम्य स्थळांचा मनापासून आस्वाद घ्यायचा असल्यास घाई न करता तीन दिवसांत ही यात्रा तुम्ही करू शकता. 

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अष्टविनायक स्वयंभू गणपतीची आठ मंदिरे आहेत. या आठही मंदिरांना ऐतिहासिक, धार्मिक दृष्ट्या महत्व आहेच पण या देवळांचे बांधकाम व रचना देखील आगळीवेगळी आहे. ही आठही मंदिरे प्रेक्षणीय स्थळी आहेत. त्यामुळे अष्टविनायक दर्शन करायचं म्हटल्यावर नेमके किती किलोमीटर आहे, अष्टविनायक दर्शन रूट किंवा मार्ग कसा आहे, असे प्रश्न मनात येतात. यासाठी तुम्ही वरील अष्टविनायक दर्शन नकाशा पाहिला असेलच. तसंच वरील लेखातून तुम्हाला अष्टविनायक दर्शन किलोमीटर, अष्टविनायक दर्शन कसे करावे, अष्टविनायक दर्शन रूट किंवा अष्टविनायक दर्शन क्रम कसा असावा (Ashtavinayak Darshan Sequence In Marathi) हेही कळलं असेलच. आजच्या धकाधकीच्या ,तणावयुक्त जीवनात अष्टविनायक दर्शन (Ashtavinayak Darshan In Marathi) केल्याने मन शांत आणि प्रसन्न होते. 

अधिक वाचा –

जाणून घ्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांचे महत्व आणि आख्यायिका

Best Ganesh Chaturthi Wishes Hindi

Ganesh Chaturthi Shayari Hindi

Read More From Family Trips