Travel in India

प्रवासाला जाताना सोबत न्या ‘हे’ घरगुती खाद्यपदार्थ

Trupti Paradkar  |  Apr 24, 2019
प्रवासाला जाताना सोबत न्या ‘हे’ घरगुती खाद्यपदार्थ

मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली की बाहेरगावी फिरायला जाण्याचे बेत आखले जातात. फिरायला जाण्यापूर्वी अनेक गोष्टींची पूर्वतयारी केली जाते. कुठे जायचं, कोणत्या मार्गाने जायचं, कोण-कोण बरोबर असेल, कोणती पर्यटनस्थळं पाहायची अशा अनेक गोष्टी ठरवल्या जातात. बॅग भरताना कोणकोणत्या गोष्टी बरोबर ठेवायच्या हेही आपण ठरवतो. मात्र यात सर्वांत महत्वाची तयारी असते ती सोबत नेण्यासारख्या ‘खाद्यपदार्थां’ची. कारण जर तुम्ही एखाद्या नवीन प्रांतात फिरण्यासाठी जात असाल तर तिथे खाण्यासाठी काय सोय असेल हे तुम्हाला आधीच सांगता येत नाही. शिवाय कुटुंबातील वयस्कर माणसे अथवा लहान मुलांसोबत जात असाल तर त्याच्या खाण्या-पिण्याची योग्य काळजी घ्यावी लागते. यासाठी नेहमी प्रवासाला जाताना असे पदार्थ सोबत ठेवा जे किमान चार-पाच दिवस टिकतील. शिवाय तुम्ही ज्या ठिकाणी गेला आहात तिथले जेवण तुम्हाला आवडेलच  असे नाही. या खाद्यपदार्थांमुळे तुमचा प्रवास सुखकर होईल. कधी कधी प्रवासात एखाद्या ठिकाणी अडकल्यास खाण्याची आबाळ होऊ नये यासाठीदेखील असे घरगुती पदार्थ तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात. जर तुम्ही तुमच्या खाजगी वाहनाने प्रवास करणार असाल तर प्रवासात सतत काहीतरी खायला हे हवेच  असते त्यामुळे हे पदार्थ तुमचा खाण्याचा प्रश्न सोडवू शकतील.  प्रवासात असे घरगुती पदार्थ जवळ ठेवा ज्यामुळे तुम्ही प्रवासात उपाशी राहणार नाही.आम्ही तुम्हाला असे काही खाद्य पदार्थ सूचवत आहोत जे तुम्ही प्रवासात नक्कीच सोबत ठेऊ शकता.

कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी ’25’ पर्यटन स्थळं

1. पराठे –

बाहेरगावी जाताना चॉकलेट, वेफर्स, बिस्किटे असे पदार्थ मुळीच सोबत ठेवू नका. कारण हे पदार्थ तुम्हाला कुठेही विकत मिळू शकतात. शिवाय अशा पदार्थांनी तुमची बॅग जड करण्यापेक्षा तुमच्या आवडीचे पराठे सोबत ठेवा. जे किमान चार ते पाच दिवस तुमची भुक भागवू शकतात. मेथीचे पराठे, तिखट-मिठाच्या पुऱ्या, गोड दशम्या असे पदार्थ सोबत ठेवल्यामुळे तुम्हाला कुठेही खाण्या-पिण्याची चिंता करण्याची गरज नाही. मात्र पुरी, थेपले अथवा दशमी दूधात मळून तयार करा. ज्यामुळे त्या काही दिवस मऊ राहतील. बाहेरगावी जाताना तुम्ही घरी तयार केलेली पुरणपोळी नक्कीच घेवून जावू शकता. पुरणपोळी हा पदार्थ किमान दोन ते तीन दिवस फ्रेश राहतो. शिवाय पुरळपोळी खाण्याने तुमचे अथवा मुलांचे पोट नक्कीच भरू शकते.

फिरायला जाणार असाल तर तुमच्या बॅगमध्ये ‘या’ गोष्टी असायलाच हव्यात – Essentials You Should Always Keep While Travelling

2. चटणी आणि जॅम –

प्रत्येकाची खाण्या-पिण्याची आवड निरनिराळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या भाज्या तुम्हाला आवडतीलच असे नाही. जर एखादी भाजी तुम्हाला आवडली नाही तर सोबत एखादी घरगुती चटणी अथवा जॅम ठेवा. ज्यामुळे पोळी अथवा ब्रेडसोबत तुम्ही तो खाऊन तुमची भुक भागवू शकता. शेंगदाणे चटणी, तिळाची चटणी, लसूण-खोबऱ्याची चटणी आणि मिक्स फ्रुट जॅम सोबत नेणे योग्य ठरेल.

3. चिवडा आणि लाडू-

घरी तयार केलेला पोहे, कुरमुरे अथवा मक्याचा चिवडा प्रवासात नेण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे तुमची जेवणाच्या मधल्यावेळी लागणारी भुक भागू शकेल. काहीजणां लहान लाडू, भुक लाडू सोबत ठेवण्याची सवयच असते. अशी सवय नेहमीच चांगली असते. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तुम्हाला भुक लागल्यास आधारच ठरतात.

4. इंस्टंट फुड-

आजकाल घरीच इंस्टंट नाश्ता करून ठेवण्याची अनेक महिलांना सवय असते. शिवाय बाजारात देखील असे पदार्थ सहज उपलब्ध असतात. समजा तुम्ही एखाद्या परप्रांतामध्ये फिरण्यासाठी गेला असाल आणि तिथे तुमच्या आवडीचे पदार्थ उपलब्ध नसतील तर इंस्टंट शिरा, उपमा, कप न्युडल्स असे पदार्थ तुमच्यासाठी वरदान ठरू शकतील.

5.मुखवास-

काहीजणांना जेवणानंतर मुखवास खाण्याची सवय असते. अशा लोकांनी घरूनच एखादे मुखवास तयार करून नेल्यास प्रवासात तुमची गैरसोय होणार नाही. मुखवासामुळे तुमचे पचन चांगले होईल शिवाय तुम्हाला उलटी अथवा मळमळीचा त्रासही होणार नाही. यासोबतच थोडासा सुकामेवा आणि काही दिवस टिकतील अशी ताजी फळेही बरोबर घ्या.

यासोबत वाचा अभिनेत्री ऊर्मिला निंबाळकरचं ट्रॅव्हलिंग सिक्रेट

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From Travel in India