फॅशन

लग्नानंतर सासरच्या पहिल्या रितीरिवाजांसाठी ईशाने निवडली ३५ वर्षांपूर्वीची साडी

Dipali Naphade  |  Dec 13, 2018
लग्नानंतर सासरच्या पहिल्या रितीरिवाजांसाठी ईशाने निवडली ३५ वर्षांपूर्वीची साडी

पूर्ण आठवडाभर ईशा अंबानी आणि आनंद पिरामलचं लग्न गाजत आहे. सर्वात महागडं लग्न असंही सध्या या लग्नाबद्दल म्हटलं जात आहे. या लग्नामध्ये बॉलीवूड, उद्योगपती अगदी सगळ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. तर ईशा आणि आनंदचा थाट काही वेगळाच होता. 12 डिसेंबरला दोघेही शाही थाटामध्ये मुंबईतील अंबानीच्या अँटिलिया या निवासस्थानी विवाहबद्ध झाले. त्यापूर्वी राजस्थानमधील उदयपूरमध्ये अगदी धुमधडाक्यात प्रि – वेडिंग सोहळा 3 दिवस पार पडला. अगदी यामध्येही बॉलीवूडपासून ते अगदी राजकारण, स्पोर्ट्स सर्व क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तींना आमंत्रण होतं आणि प्रत्येकजण सहभागी झाला होता. अर्थात अंबानी म्हटल्यानंतर कोणत्याही गोष्टीला नक्कीच कमी नाही. मात्र ईशाने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सासरी होणाऱ्या पारंपरिक रितीरिवाजामध्ये आपल्या आईच्या लग्नातील 35 वर्षांपूर्वीची साडी नेसण्याला प्राधान्य दिलं आहे. अर्थात ईशासाठी नवी साडी वा लेहंगा खरेदी करणं यामध्ये काहीच अडचण नाही. मात्र आपल्या आईची आठवण आणि प्रेम यासाठी ईशाने ही साडी नेसली आहे आणि त्याचा पहिला लुक सध्या व्हायरल होत आहे.


ईशा आपल्या आई – वडिलांची लाडकी

प्रत्येक लेक ही आपल्या आई – वडिलांची लाडकी असते आणि ईशाही त्याला अपवाद नाही. आपल्या तिन्ही मुलांमध्ये ईशा ही निता आणि मुकेश अंबानींची लाडकी लेक आहे आणि हे बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबाच्या फोटोंमधूनही दिसून आलं आहे. ईशादेखील आपल्या आई-वडिलांच्या फारच जवळ आहे. त्यामुळे सासरी गेल्यानंतर तिने आपल्या आईची साडी नेसण्याला प्राधान्य दिलं असून या साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. गोल्डन आणि ऑफव्हाईट असं कॉम्बिनेशन असणाऱ्या लेहंग्यावर 35 वर्षांनंतरही तितकाच सुंदर आणि आकर्षक दिसणारा बांधणीच्या साडीचा दुप्पटा अप्रतिम दिसत आहे. त्यावर ईशाने घातलेले हिऱ्यांचे दागिने अजूनच शोभा वाढवत आहेत.


लग्नासाठीही हिऱ्यांनी मढली होती ईशा

ईशा लग्नामध्येदेखील हिऱ्यांच्या दागिन्यांनी मढली होती. अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांनी कोणतीही कसर या लग्नामध्ये ठेवलेली बघायला मिळाली नाही. अगदी गेले आठवडाभर हे लग्न शाही स्वरुपामध्ये साजरं होतं आहे. इतकंच नाही तर सामान्य लोकांसाठी हे लग्न म्हणजे विचाराच्याही पलीकडील आहे. कारण या लग्नामध्ये 700 कोटी इतका खर्च झाल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय अंबानी कुटुंबातील अजून दोन मुलांचीही लग्न लवकरच होणार आहेत, त्यामुळे या दोन मुलांच्या लग्नामध्ये आता अजून काय? असाही प्रश्न सामान्य माणसाला पडलेला आहे. आता लवकरच तेदेखील कळेल. मात्र सध्या ईशा आणि आनंदच्या लग्नाचा फिव्हर अजूनही चालूच असल्याचं पाहायला मिळतं आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम 

Read More From फॅशन