मनोरंजन

Kusumagraj Information In Marathi | जाणून घ्या कुसुमाग्रज यांची माहिती

Leenal Gawade  |  Apr 24, 2021
Kusumagraj Information In Marathi

मराठी साहित्यामध्ये कही साहित्यकारांची नावे कितीही जुनी झाली तरी आताची वाटतात. त्यापैकीच एक आधुनिक युगाचे कवी अशी ओळख असलेले कवी म्हणजे कवी ‘कुसुमाग्रज’ मराठी साहित्य आणि त्याचा अभ्यास करणाऱ्यांना आजही या मराठी साहित्यिकाविषयीची अधिक खोलवर माहिती घेणे भाग आहे. मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, समीक्षक, नाटककार आणि कथाकार अशी त्यांची ओळख आहे. समाजनिष्ठ लेखक अशी ओळख असलेले कुसुमाग्रज हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त असे साहित्यिक आहेत. वि. स.खांडेकर यांच्यानंतर साहित्यातील इतका मानाचा पुरस्कार प्राप्त करणारे हे दुसरे साहित्यिक आहे. त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आवर्जून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. इतकी त्यांची मराठी भाषेत ख्याती आहे. तुम्ही साहित्याचे चाहते असाल पण तुम्हाला कुसुमाग्रज यांची माहिती नसेल तर ती तुम्ही आताच घ्यायला हवी. कुसुमाग्रजांचे आयुष्य, त्यांचे बालपण आणि त्यांचे साहित्य जाणून घेण्याची गरज ही आपल्या सगळ्यांनाच आहे. त्यांच्या अजरामर साहित्याचा आढावा घेत त्यांच्या काही प्रसिद्ध कविताही जाणून घेणार आहोत. वाचा कुसुमाग्रज यांची माहिती

कुसुमाग्रज यांची माहिती मराठी – Kavi Kusumagraj Information In Marathi

Kavi Kusumagraj Information In Marathi

नाव : विष्णू वामन शिरवाडकर
मूळनाव: गजानन रंगनाथ शिरवाडकर
वडिलांचे नाव: रंगनाथ शिरवाडकर
काकांचे नाव: वामन शिरवाडकर
टोपण नाव: कुसम अग्रज ‘कुसुमाग्रज’
जन्म : 27 फेब्रुवारी 1912
जन्मस्थान : नाशिक
मृत्यू : 10 मार्च 1999
शिक्षण: बी.ए. (नाशिक)
पुरस्कार: महाराष्ट्र राज्य सरकार पुरस्कार (मराठीमाती, स्वगत, हिमरेषा, नटसम्राट), साहित्य अकादमी (नटसम्राट), ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, डि.लीट पुरस्कार, नाट्यलेखन पुरस्कार
शिवाय कुसुमाग्रज यांच्या नावाने अनेक पुरस्कार साहित्यिकांना दिले जातात.

कुसुमाग्रजांचे बालपण आणि कौटुंबिक माहिती – Kusumagraj Childhood & Family Life

कुसुमाग्रज यांचे मूळ विष्णू वामन शिरवाडकर हे आपण सगळेच जाणतो. पण कुसुमाग्रजांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव हे बदलून विष्णू वामन शिरवाडकर असे करण्यात आले. त्यांचा जन्म नाशिकचा त्यांचे शिक्षणही नाशिकमध्येच झाले. कुसुमाग्रजांचे वडील म्हणजेच वामन शिरवाडकर हे व्यवसायाने वकील होते. कामानिमित्त ते पिंपळगावमधील  बसवंत या गावी आले आणि तेथेच स्थायिक झाले. त्याच ठिकाणी त्यांचे संपूर्ण बालपण गेले. विष्णूंना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक बहीण होती. तिचा भाऊ म्हणजेच कुसुम अग्रज म्हणून त्यांनी त्यांचे टोपण नाव ‘कुसुमाग्रज’ असे ठेवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगावला तर माध्यमिक शिक्षण हे त्यांनी नाशिकमधून केले. पुढील मॅट्रिक शिक्षण त्यांनी मुंबई विद्यापीठातून केले. शालेय शिक्षण घेत असताना त्यांची पहिली कविता प्रकाशित झाली. ‘रत्नाकर’ नावाच्या मासिकातून ती प्रसिद्ध करण्यात आली. 

शिक्षण पूर्ण केल्यानंतर चित्रपट व्यवसायात पटकथा लिहण्याचे काम केले. यासोबतच त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्ये वृत्त संपादनाचे कामही केले. स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी ही ती काही वृत्तपत्र आणि नियतकालिके.  मराठीवर आणि लिखाणावर प्रेम असणारे कुसुमाग्रज ज्यावेळी पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आले त्यावेळी त्यांची भेट मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव यांच्याशी झाली  मराठी साहित्याची होणारी दूरवस्था त्यांना सांगून कुसुमाग्रजांकडून त्यांनी दर्जेदार साहित्य निर्मितीला प्रेरणा दिली. त्यातून प्रेरणा घेतच ते एक उत्तम नाटककार म्हणून नावारुपाला आले. त्यांच्या कविता, कथा या फारच प्रसिद्ध आहेत. त्यांची ओळख एक नाटककारपेक्षा कवी म्हणून अधिक नावारुपाला आलेली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या साहित्यातून कायमच आधुनिकतेचे एक वलय दिसून आहे. बुरसटलेल्या विचारांना बगल देत त्यांनी साहित्यात नव क्रांती घडवून आणली म्हणूनच त्यांना ‘आधुनिक युगाचे कवी’ म्हणतात. 

कुसुमाग्रज आणि साहित्य – Kusumagraj And Literature

कुसुमाग्रजांच्या साहित्याविषयी बोलायचे झाले तर ते शब्दात अपुरे पडतील असे आहे. त्यांच्या कविता, कथा, नाटकांविषयी लिहिण्यासारखे बरेच काही आहे. आजही त्यांच्या कविता या अनेकांच्या ओठी असतात आणि त्या जगण्याची नवी प्रेरणा देतात. पण त्यांच्या एकूण साहित्याचा विचार करता त्यांचे वर्गीकरण केले तर ते जाणून घेणे अधिक सोपे ठरेल.

 कविता: कुसुमाग्रजांच्या अनेक कविता या फारच प्रसिद्ध आहेत. आजही त्यांचे कविता संग्रह अभ्यासले जातात. अक्षरबाग (१९९९),किनारा(१९५२), चाफा(१९९८),छंदोमयी (१९८२),जाईचा कुंज (१९३६),जीवन लहरी(१९३३),थांब सहेली (२००२),पांथेय (१९८९),प्रवासी पक्षी (१९८९),मराठी माती (१९६०),महावृक्ष (१९९७, माधवी(१९९४), मारवा (१९९९), मुक्तायन (१९८४). मेघदूत(१९५६), रसयात्रा (१९६९),वादळ वेल (१९६९),विशाखा (१९४२),श्रावण (१९८५),समिधा ( १९४७),स्वगत(१९६२), हिमरेषा(१९६४)

 नाटक:  शिरवाडकरांची अनेक नाटकं सुद्धा फारच प्रसिद्ध आहेत 

 शिरवाडकरांच्या स्वतंत्र नाटकांत दुसरा पेशवा (१९४७), कौंतेय (१९५३), आमचं नाव बाबुराव (१९६६), ययाति आणि देवयानी (१९६६), वीज म्हणाली धरतीला (१९७०), नटसम्राट (१९७१) यांचा समावेश होतो. दूरचे दिवे (१९४६), वैजयंती (१९५०), राजमुकुट (१९५४), ऑथेल्लो (१९६१) व बेकेट (१९७१) ही त्यांची काही रुपांतरीत नाटकं आहेत.

कथासंग्रह: इतकेच नाही तर त्यांनी लिहिलेले कथासंग्रह देखील फारच गाजले आहेत.
अंतराळ, अपाईंमेंट, एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण, जादूची होडी, प्रेम आणि मांजर, फुलवाली, एकाबारा निवडक कथा, सतारीचे बोल

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, मराठी भाषेचा प्रवास

कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध कविता – Kusumagraj Famous Kavita

कुसुमाग्रजांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. त्याच्या काही कविता या अनेकांच्या ओठी असतील. पण काही कविता या तुम्हाला आता नव्याने कळतील. पण साहित्याची आवड असेल तर तुम्हाला या कविता माहीत असायला हव्यात अशा आहेत.

अखेर कमाई 

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले 
ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकान्ची होय दाट गर्दी

प्रभादिपान्ची फ़ुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी 

कोपर्याशी गुणगुणत अन अभन्ग
उभा केव्हाचा एक तो अपन्ग

भोवतीचा अन्धार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसान्चा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दिना त्या उभारुनी उर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिन बन्धू वाट

आणी धनिकान्ची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात. 

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करु प्रीतीची याचना 

नव्हाळीतले ना उमाळे उससे
न ती आग अंगात आता उरे
विझोनी आता यौवनाच्या मशाली
ऊरी राहीले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न येणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तीवाचून देवा
मला वाटते विश्व अंधारले 

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशू
तपाचार स्वीकारुनी दारुण

निराशेत सन्यस्थ होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रृव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी प्रीतीची याचना लाजुनी
लाल होऊनिया लाजरा मंगळ 

परी दिव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षूद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तूझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठातली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धुलिःकण
अलंकारण्याला परी पाय तूझे
धुळीचेच आहे मला भूषण

स्वगत 

शब्द – जीवनाची अपत्ये –
मृत्यूपर्यंत पोहोचत नाहीत
म्हणून तुझ्या समाधीवर
मी वाहात आहे
माझे मौन

मृत्यूसारखेच अथांग
अस्पष्ट, अनाकार
सारे आकाश व्यापून
अज्ञाताच्या प्रदेशाकडे
प्रवाहात जाणा-या
स्वरहीन संथ मेघमालेचे
मौन

निर्माल्य

होता मोहरला व संत वितरी मार्गावरी तो फुले
होते धुंद सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,
स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर
आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा
झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा
मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी
वाहे मन्थर आणि जीवनमयी त भावमन्दाकिनी ! 

साधी वेषतर्‍हा तयातहि खुले ती आकृती लालस
डोळ्यातूनच भावबन्ध जडले-प्रीती असे डोळस !
जाण्याला निघसी अचानक पुढे, व्याकूलसी पाहुनी,
गंगा लोपुनी गर्जना करित तो सिंधूच नेत्रांतुनी !

आणी गेलिस तू-वसन्तहि सखे गेला तुझ्या संगती,
पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती !

Kusumagraj Famous Kavita Marathi

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
“अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!” 

प्रेम

पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा 

मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा 

शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय? 

उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय? 

म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ 

प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं 

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं 

शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस 

उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं 

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार! 

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार! 

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार! 

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार! 

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

जोगीण

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन.
दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावली सारखी
निघुन जाईन.
तुझा मुगूट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही.
माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.

सागर 

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे
मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती
संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते
तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो
खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
दर्यावरची रंगीत मखमल उचलुन घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी
दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

नदी

नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर
नदीबाई आई माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी
नदीमाय जळ सा-‍या तान्हेल्यांना देई
कोणी असो कसा असो भेदभाव नाही
शेतमळे मायेमुळे येती बहरास
थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास
श्रावणात आषाढात येतो तिला पूर
पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर
माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय चालत्याला जय

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. कुसुमाग्रजांचे खरे नाव काय ?

कुसुमाग्रज यांचे खरे नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांना वि.वा. शिरवाडकर या नावाने देखील ओळखले जाते. त्यांच्या अनेक मराठी कविता फारच प्रसिद्ध आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कुसुमाग्रजांचे साहित्य अजरामर आहे.

2. कुसुमाग्रजांच्या कोणत्या साहित्य प्रकारात विशेष आहेत ?

कुसुमाग्रजांच्या कविता या फारच प्रसिद्ध आहेत. कविता लेखन हा प्रकार ही त्यांच्या साहित्याची ओळख आहे. याशिवाय त्यांच्या कथा आणि नाटकांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

3. कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता कोणती ?

कुसुमाग्रजांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक कविता म्हणजे ‘कणा‘ ओळखलत का सर मला?’ – पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून : ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’. माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला ‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

Read More From मनोरंजन