बॉलीवूड

पुलवामा हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय

Dipali Naphade  |  Feb 19, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय

सलमान खान सध्या त्याच्या ‘भारत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. सलमानच्या प्रत्येक चित्रपटात पाकिस्तानी गायकाचं एक तरी गाणं असतंच. आतापर्यंत ‘जग घूमेया’ हे गाणारा गायक राहत फतेह अली खान असो वा ‘दिल दी या गल्ला’ हे गाणारा पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम असो. अर्थात त्यांना ही गाणी त्यांच्या पाकिस्तानी असल्यामुळे नाही तर आवाजामुळे मिळालेली आहेत. पण तरीही सलमानच्या चित्रटात हे गायक असतात. प्रत्येक वेळी पाकिस्तानी कलाकारांना भारतामध्ये काम न करू देण्याबद्दल बहिष्कार टाकण्यात आला पण असं काही होत नाही. पण यावेळी पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वच कलाकारांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे असं म्हणायला हरकत नाही. याला सलमानदेखील अपवाद नाही. सलमाननदेखील या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

सलमान खानच्या ‘भारत’मधून पाकिस्तानी गायकांची हकालपट्टी

सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटातदेखील पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचं गाणं होतं. पण आता पुलवामा हल्ल्यानंतर सलमानने हे गाणं काढून टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अर्थात एक गाणं रेकॉर्ड करण्यासाठी बराच पैसा लागतो. पण या सगळ्या गोष्टींचा विचार न करता सलमानने आपल्या देशाला प्राधान्य देत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असण्याची दाट शक्यता सर्वांनाच वाटत असल्यामुळे यावेळी सर्वच देश आणि अगदी इतर देशदेखील पाकिस्तानविरुद्ध उभे ठाकले आहेत. अशामध्ये चित्रपटसृष्टी कशी मागे राहील? यावेळी पाकिस्तानी कोणत्याही कलाकाराला पुन्हा भारतात येऊ द्यायचं नाही आणि त्यांना काम द्यायचं नाही अशा प्रकारची शपथच जणू काही प्रत्येकाने घेतली असल्याचं चित्र आहे.

सलमानने लगेचच जवानांसाठी दान केली होती रक्कम

पुलवामा हल्ल्यातील जवानांच्या कुटुंबाला सलमानच्या बिईंग ह्युमन फाऊंडेशनकडून लगेच मोठी मदत करण्यात आली. सर्वात पहिल्यांदा मदत करणाऱ्यांमध्ये सलमानचं नाव होतं. सलमान खान नेहमीच मदतीसाठी पुढे असतो. यावेळी सलमानने पाकिस्तानी गायकांचं गाणं हटवून पुन्हा एकदा आपल्यासाठी नक्की काय महत्त्वाचं आहे हे दाखवून दिलं. यासंदर्भात सलमानच्या जवळच्या मित्राने खुलासा करत सांगितलं, ‘सलमानला माहीत आहे की, तो पाकिस्तानी गायकांचं गाणं हटवण्याची मागणी अजिबातच नजरअंदाज करू शकत नाही. सलमानला असं वाटतं की, राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लमचा आवाज त्याला सूट होतो. त्यामुळे आतापर्यंत त्याने त्यांना संधी दिली. पण देशापुढे असा स्वार्थीपणा सलमानला जमणार नाही. शिवाय असं केल्यास सलमानची प्रतिष्ठादेखील नक्कीच धुळीला मिळेल आणि हे त्याला चालणार नाही. ही त्याच्यासाठी एक मोठी रिस्क नक्कीच असेल. त्यामुळेच पाकिस्तानी गायकांना हटवून आता तेच गाणं पुन्हा भारतीय गायकाच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करण्यात येईल’.

कोणत्याही जुन्या गाण्याचं रिक्रिएशन नाही

सध्या जुन्या गाण्याचं रिक्रिएशन करण्याचा ट्रेंड आहे. त्यामुळे बरेचदा अशा चित्रपटातदेखील जुनं गाणं वापरलं जाणार का असा प्रश्न चाहत्यांना पडतो. पण या चित्रपटामध्ये कोणत्याही जुन्या गाण्याचं रिक्रिएशन करण्यात आलेलं नाही. सध्या या चित्रपटासाठी गोरेगावमधील फिल्म सिटी स्टुडिओमध्ये चाळीस दिवसांचं शूट शेड्युल करण्यात आलं असून एक वेगळंच युग इथे तयार करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार विशाल – शेखर आणि गीतकार इर्शाद कामिल यांनी खूपच मेहनत घेतली आहे असंही सांगण्यात आलं आहे. शिवाय या गाण्यामधील दिवाळीचं शूट आधीच करण्यात आलं असून मिळालेल्या माहितीनुसार हे शूट माल्टामध्ये करण्यात आलं आहे. हे गाणं रोमँंटिक असून यामध्ये पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. याआधी सलमान, कतरिना आणि अली अब्बास जाफर या त्रिकूटाने हिट चित्रपट दिले आहेत. हा चित्रपट अतुल अग्निहोत्री, सलमान खान फिल्म्स आणि टी – सिरीजची निर्मिती आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर 5 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा 

‘भारत’मध्ये होळी-दिवाळीच्या गाण्यावर दिसणार सलमान-कतरिनाची रोमँटिक केमिस्ट्री

आगामी ‘भारत’ चित्रपटासाठी दिशा करतेय खतरनाक स्टंट्स

‘भारत’चं टीझर प्रदर्शित, यावर्षी देशभक्तीपर चित्रपटांची प्रेक्षकांना मेजवानी

 

Read More From बॉलीवूड