लाईफस्टाईल

रत्नागिरी पर्यटन स्थळे | Ratnagiri Paryatan Sthale Marathi

Dipali Naphade  |  May 9, 2022
ratnagiri-travel-destinations.

रत्नागिरी हे एक ऐतिहासिक, निसर्गरम्य असे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ आहे. रत्नागिरी जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते स्वच्छ समुद्रकिनारे, गणपतीची मंदिरे, फणस आणि आंब्यांच्या बागा. रत्नागिरी जिल्हा पाहण्यासारखी ठिकाणे अनेक आहेत. रत्नागिरी पर्यटन स्थळे आता अधिक समृद्ध होऊ लागली आहेत. रत्नागिरी जिल्हा पर्यटन स्थळेही अनेक आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे तुम्हाला माहीत करून देण्यासाठी आम्ही हा लेख खास तुमच्यासाठी आणला आहे. रत्नागिरीतील पर्यटन स्थळे आणि त्याची माहिती या लेखातून आम्ही तुम्हाला देत आहोत. रत्नागिरी मधील पर्यटन स्थळे म्हटल्यानंतर काही ठिकाणे आपोआपच आपल्या डोळ्यासमोर येऊ लागतात. याची इत्यंभूत माहिती तुम्ही घ्या आणि सुट्टीच्या या महिन्यात नक्की आपल्या कोकणातील नयनरम्य रत्नागिरीला भेट द्या. 

Table of Contents

  1. रत्नागिरी पर्यटन स्थळे यादी | Ratnagiri Paryatan Sthale Marathi
  2. भाट्ये बीच – निसर्गरम्य रत्नागिरीतील पर्यटन स्थळ
  3. पावस – रत्नागिरीतील धार्मिक पर्यटन स्थळ
  4. कनकादित्य मंदिर – रत्नागिरीतील धार्मिक पर्यटन स्थळ
  5. सागरी मत्सालय आणि संग्रहालय – रत्नागिरी बघण्यासारखी ठिकाण पैकी एक
  6. मांडवी बीच – रत्नागिरी पर्यटन स्थळ
  7. थिबा पॅलेस -रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर पर्यटन स्थळ
  8. गणेशगुळे बीच – रत्नागिरी जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे
  9. रत्नदुर्ग किल्ला – रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ
  10. गणपतीपुळे मंदिर – रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ
  11. जयगड किल्ला – ऐतिहासिक रत्नागिरी पर्यटन स्थळे
  12. केशवसुत स्मारक, मालगुंड – रत्नागिरी पर्यटन स्थळे
  13. वेळणेश्वर शिवमंदिर – सुंदर असे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ
  14. टिळक आळी संग्रहालय – रत्नागिरी जिल्ह्यात पाहाण्यासारखे ठिकाण
  15. जय विनायक मंदिर जयगड आहे रत्नागिरीतील धार्मिक स्थळ
  16. पूर्णगड किल्ला – रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ
  17. बामणघळ – रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ
  18. FAQs – रत्नागिरी पर्यटन स्थळे | Ratnagiri Paryatan Sthale Marathi

रत्नागिरी पर्यटन स्थळे यादी | Ratnagiri Paryatan Sthale Marathi

भाट्ये बीच – निसर्गरम्य रत्नागिरीतील पर्यटन स्थळ

पांढरा फेस असणारे स्वच्छ समुद्रकिनारे हे रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. असाच सर्वाधिक प्रसिद्ध असणारा असा भाट्ये बीच. हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी आकर्षण आहे. अत्यंत स्वच्छ असणारा असा हा समुद्रकिनारा. इथे आता गेल्या काही वर्षांपासून पर्यटनासाठी अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. समुद्रकिनारी राहण्यासाठीही सोय करण्यात आली आहे. अगदी दुतर्फा झाडे आणि मधून जाणारा रस्ता आणि समुद्रकिनारा असा मनमोहक नजारा या ठिकाणी दिसून येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे अजिबात गर्दी नसते आणि तुम्हाला तुमच्या सुट्टीचा आनंद इथे मनसोक्त लुटता येतो. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
सीझनः ऑक्टोबर ते जून 
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस (रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षाही उपलब्ध आहेत)

पावस – रत्नागिरीतील धार्मिक पर्यटन स्थळ

Pawas – Instagram

या पवित्र स्थळाला श्री क्षेत्र पावस असेही म्हटले जाते. श्री स्वामी स्वरूपानंदाचे समाधीस्थळ म्हणून प्रसिद्ध असणारे हे स्थळ पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. रत्नागिरी पर्यटन स्थळे अत्यंत सुंदर आहेत. तसंच नदी आणि हिरव्यागार वनराईने हे गाव समृद्ध आहे. लाल माती असणारे हे गाव अजूनही त्यातील मूळ रंग आणि स्वरूप टिकवून आहे. त्यामुळेच इथे अनेकांना समाधान प्राप्त होते. येथे स्वरूपानंद यांच्या मठामध्ये त्यांच्या नित्य वापरातील वस्तू आणि ग्रंथसंपदा जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. तर रोज इथे खिचडीचा महाप्रसाद देण्यात येतो. राहण्यासाठी भक्तनिवासाची सोयही करण्यात आली आहे. अतिशय शांत आणि पवित्र अशा या ठिकाणी मानसिक शांतता लाभते असंही अनेक जण सांगतात. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
सीझनः ऑक्टोबर ते जून 
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस (रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षाही उपलब्ध आहेत)

कनकादित्य मंदिर – रत्नागिरीतील धार्मिक पर्यटन स्थळ

भारतामध्ये एकूण सात सूर्यमंदिरे आहेत. त्यापैकी एक कनकादित्याचे मंदिर आहे ते म्हणजे कशेळी गावात. रत्नागिरीमधील कशेळी गावात अप्रतिम असं कनकादित्य मंदिर आहे. रत्नागिरी शहरापासून साधारण 40 किलोमीटरवर हे गाव वसले असून हे मंदिर गावातील आकर्षण आहे. 900 वर्षे प्राचीन हे मंदिर असून कौलारू स्थापत्य शैलीतील हे मंदिर खूपच सुंदर आहे. लाकडावर कोरलेल्या देवता, ज्यामध्ये प्रामुख्याने कार्तिक, वरूण, वायू, शेषशायी विष्णू अप्रतिम दिसते. रथसप्तमी उत्सवामध्ये सर्वात जास्त मजा असते. कनकादित्य आणि कालिकादेवीचा लग्नसोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. मंदिरामध्ये कमालीची स्वच्छता असून नेहमी या मंदिरातील विश्वस्त तुमचे स्वागत करायला तयार असतात, जे सहसा इतर ठिकाणी पाहायला मिळत नाही. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
सीझनः ऑक्टोबर ते जून 
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस (रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षाही उपलब्ध आहेत)

सागरी मत्सालय आणि संग्रहालय – रत्नागिरी बघण्यासारखी ठिकाण पैकी एक

Ranagiri Museum – Instagram

रत्नागिरी शहरामध्ये डॉ. बाबासाहेब सावंत कोकण विद्यापिठाच्या अधिपत्याखाली मत्स्य महाविद्यालयाचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील वेगवेगळ्या पद्धतीचे आणि जातीचे मासे आहेत. त्याचप्रमाणे इतर जलचर संग्रहालयदेखील इथे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. शिंपल्यांचे 250 पेक्षा अधिक प्रकार असून तारामासा, ऑक्टोपस, समुद्री कासव, समुद्री साप, कोंबडामासा आणि इतर साधारण 1300 समुद्री जीवांचे नमुने इथे आहेत. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 55 फूट लांबी असणारा आणि साधारण 5 हजार किलो इतका महाकाय असा देवमाशाचा सांगाडा. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
सीझनः ऑक्टोबर ते जून 
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस (रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षाही उपलब्ध आहेत)

मांडवी बीच – रत्नागिरी पर्यटन स्थळ

Mandvi Beach – Instagram

रत्नागिरी पर्यटन स्थळे शोधत असाल तर रत्नागिरीचा गेटवे म्हणून ओळखला जाणारा समुद्रकिनारा म्हणजे मांडवी. मांडवीचा समुद्रकिनारा खूपच मोठा आहे. रजिवाडा बंदरापर्यंत हा समुद्रकिनारा पसरलेला आहे आणि दक्षिणेला अरबी समुद्रकिनाऱ्याला हा मिळतो. ब्लॅक सी अर्थात काळा समुद्र म्हणूनही हा समुद्रकिनारा ओळखण्यात येतो. याच्या किनाऱ्यावर काळी रेती सापडते आणि त्यामुळेच याला काळा समुद्र असे नाव पडले आहे. याठिकाणी अनेक पाण्याशी संबंधित विविध गेम्स आता चालू करण्यात आल्यामुळे इथे पर्यटकांची रांग दिसून येते. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, मांडवी 
सीझनः ऑक्टोबर ते जून 
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस (रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षाही उपलब्ध आहेत)

थिबा पॅलेस -रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर पर्यटन स्थळ

Thiba Palace – Instagram

1885 पासून असणारा हा पॅलेस रत्नागिरीचे मुख्य आकर्षण आहे. साधारण 132 वर्षांपासून हा भव्य ऐतिहासिक राजवाडा पर्यटकांसाठी खुला आहे. ब्रम्हदेशाच्या थिबा राजाचे या राजवाड्यात वास्तव्य होते. थिबा राजाने ब्रम्हदेशावर सात वर्षे राज्य केले आणि असे राज्य करणारा तो शेवटचा राजा होता. त्यावेळी ब्रम्हदेशावर इंग्रजांनी कब्जा मिळवला आणि त्यानंतर थिबा आपल्या कुटुंबासह म्यानमार ते मद्रास आणि नंतर मद्रासवरून कोकणात रत्नागिरीला येऊन स्थायिक झाला. अनेक ऐतिहासिक घटांना हा पॅलेस साक्षीदार असून या पॅलेसमध्ये संगमरवरी नृत्यागृह आहे. तर याच्या छतावर अत्यंत सुंदर नक्षीकाम असणाऱ्या पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय खिडक्यांना रंगीत अशा इटालियन काचाही बसविण्यात आल्या आहेत. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी
सीझनः ऑक्टोबर ते जून 
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस (रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षाही उपलब्ध आहेत)

गणेशगुळे बीच – रत्नागिरी जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे

Ganeshgule beach – Instagram

रत्नागिरीमध्ये अनेक गणपतीची मंदिरे आहेत. त्यापैकी प्रसिद्ध असे मंदिर म्हणजे रत्नागिरीहून 22 कि. मी. अतंरावर असणारे गणेशगुळ्याचे मंदिर.रत्नागिरी पर्यटन स्थळे आणि त्यापैकी एक म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर असणारे हे मंदिर 400 वर्षापूर्वीचे आहे आणि याची बांधणी हे जांभ्या दगडाने करण्यात आलेली आहे. पूर्णगडपासून जो उजवा फाटा फुटतो त्या दिशेने गणेशगुळे येथे जावे लागते. हे मंदिर शिवपूर्वकालीन असून हा गणेश स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. या मंदिराजवळ 70 फूट लांबीची विहीर असून ती दगडांमध्ये खोदली आहे. मात्र ही नक्की कशा पद्धतीने बांधण्यात आली याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, गणेशगुळे
सीझनः ऑक्टोबर ते जून 
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस (पूर्णगडपासून उजव्या फाट्यावर वळून पुढे जाणे)

रत्नदुर्ग किल्ला – रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ

Ratnadurga Fort – Instagram

रत्नागिरी शहरामध्ये बंदराजवळ रत्नदुर्ग अर्थात भगवती किल्ला हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. हा किल्ला साधारण 12 व्या शतकापासून इथे स्थित आहे. साधारण 120 एकरावर हा किल्ला उभा आहे. या संपूर्ण किल्ल्याला साधारणतः 29 बुरुज आहेत.  किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन विभागांमध्ये हा किल्ला विभागला गेलाय. तिन्ही बाजूला समुद्र असून दीपगृह असल्याने हा परिसर अतिशय नयनरम्य दिसतो. तसंच हा गड चढायला खूपच सोपा असून इथ पुढपर्यंत जाता येते. भगवती मंदिरापर्यंत याचा रस्ता पोहचलेला आहे. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी बंदर
सीझनः ऑक्टोबर ते जून 
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस, रिक्षा  

गणपतीपुळे मंदिर – रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ

Ganpatipule Mandir – Instagram

निवळी फाट्यावरून गणपतीपुळ्याला रस्ता जातो. अत्यंत सुखद असा अनुभव आहे. रत्नागिरीपासून 35 कि. मी. अंतरावर समुद्राच्या किनाऱ्यावर हे सुंदर गणपती मंदिर स्थित आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी या ठिकाणी नंदादीप स्थापित केला तर बाजीराव यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी नगारखान्याची व्यवस्था केली. तर माधवराव पेशव्यांच्या पत्नी रमाबाई यांनी येथे दगडी धर्मशाळा उभारली असा उल्लेख इतिहासामध्ये आढळून येतो. येथील सुव्यवस्था आणि सुशोभिकरणामुळे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण बनले आहे. याशिवाय येथे आसपास आरे वारे समुद्र किनारा, केशवसुत स्मारक, वॅक्स म्युझियम, जयगड हेदेखील फिरण्यासाठी पर्यटकांना उपलब्ध आहे. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, गणपतीपुळे
सीझनः वर्षभर  
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस, रिक्षा 

जयगड किल्ला – ऐतिहासिक रत्नागिरी पर्यटन स्थळे

Jaigad Fort – Instagram

जयगड किल्ला हा ऐतिहासिक असून 16 व्या शतकामध्ये विजापूरकरांनी बांधला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. 1695 पासून हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. तर 1818 मध्ये कोणतीही लढाई न करता इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला असे इतिहासात सांगण्यात येते. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तटबंदी खोल्या दिसतात. तर उजव्या बाजूला प्रशस्त मैदान आणि अनेक वास्तू दिसून येतात. ब्रिटीश काळात येथे दोन मजल्यांचे विश्रामगृह बांधलेले आढळते. तर इथेही गणेश मंदिर असून येथे दीपमाळही आहे. जयगड किल्ला हा 12 एकरमध्ये विस्तारित असून चढायला एकदम सोपा आहे. तर जयगड पोलीस चौकीपासून जाण्यासाठी केवळ 5 मिनिट्स लागतात. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, जयगड
सीझनः वर्षभर  
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस, रिक्षा (रत्नागिरीकडून खंडाळे – जयगड असा एस. टी. मार्ग आहे)

केशवसुत स्मारक, मालगुंड – रत्नागिरी पर्यटन स्थळे

Keshavsut Smarak – Instagram

गणपतीपुळ्यापासून केवळ 2 किलोमीटरवर मालगुंड असून येथे केशवसुताचे स्मारक आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म मालगुंडमध्ये झाला होता. तिथेच त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. रत्नागिरी पर्यटन स्थळे शोधत असाल तर आजही केशवसुत यांच्या मूळ कौलरू घरातील स्मारकांमध्ये केशवसुतांच्या अनेक वस्तू आणि साधारण 100 वर्षांपूर्वीची तांब्या पितळेची भांडी, मूदपात्र, पंचपाळे हे सर्व जतन करण्यात आले आहे. आता कालबाह्य झालेल्या या वस्तू पर्यंटकांसाठी आकर्षण ठरते. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, मालगुंड
सीझनः वर्षभर  
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस, रिक्षा

वेळणेश्वर शिवमंदिर – सुंदर असे रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ

Velneshwar Mandir – Instagram

वेळणेश्वरचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे. साधारण 1200 वर्षापूर्वी हे गाव वसलं असं सांगण्यात येते. किनाऱ्यावर वेळणेश्वराचे अत्यंत सुंदर शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाजूने जो भाग समुद्रामध्ये घुसला आहे, त्याला मेरूमंडल असं म्हटलं जातं. या गावाचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे. महाराष्ट्र शासनाने वेळणेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. हिरव्यागार वनराई, नारळाच्या बागा यामुळे मनाला अधिक प्रसन्नता लाभते. येथे जाण्यासाठी वळणावळांचा रस्ता असल्यामुळे अधिक मजा येते. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, वेळणेश्वर

सीझनः वर्षभर  

कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस, रिक्षा 

टिळक आळी संग्रहालय – रत्नागिरी जिल्ह्यात पाहाण्यासारखे ठिकाण

Tilak Ali Museum – Instagram

(Tilak Ali Sangrahalaya) टिळक आळी संग्रहालय हे रत्नागिरीमधील अत्यंत प्रसिद्ध स्थळ आहे. टिळकांचा जन्म रत्नागिरीतील असून हे टिळकांचे मुख्य घर आहे. स्थानिक वास्तुकलेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. या संग्रहालयात अनेक चित्र आणि कथांच्या माध्यमातून टिळकांची जीवनशैली आणि जीवनाबाबत सांगण्यात आले आहे. टिळकांचा स्वातंत्र्यामध्ये किती सहभाग होता हे सर्व याठिकाणी दर्शविण्यात आले आहे. 

ठिकाणः रत्नागिरी शहर
सीझनः वर्षभर  
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस, रिक्षा 

जय विनायक मंदिर जयगड आहे रत्नागिरीतील धार्मिक स्थळ

Jai Vinayak Mandir – Jaigad – Instagram

पर्यटकांसाठी ताजी हवा आणि थंड वातारवणासाठी ओळखण्यात येणारे हे जय विनायक मंदिर. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे बांधण्यात आलेले हे मंदिर अप्रतिम असून यातील गणपतीची मूर्ती ही पितळेची आहे. तर याच्या बाजूला माशांनी भरलेला एक तलाव आणि हिरवीगार बागही आहे. रत्नागिरीतील कचरे गावात हे मंदिर असून. साधारण 37 किलोमीटरवर रत्नागिरी शहरापासून हे दूर आहे.  

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, कचरे गाव 
सीझनः वर्षभर  
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस, रिक्षा 

पूर्णगड किल्ला – रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ

Purnagad Fort – Instagram

मराठी आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी 1724 च्या सुमारास पूर्णगड किल्ला बांधला. पूर्णगड-गावखडी-कशेळी अशी तिन्ही लागोपाठची गावं ही पाहण्यासारखी आहेत. या गडावर गेल्यानंतर लगेच मुख्य दरवाजा दिसत नाही. तर हनुमान मंदिर ही इथली महत्वाची खूण आहे. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर पेशव्यांकडे हा गड आला. त्यांनी जे कारभारी नेमले होते त्यांचे वंशज अजूनही या गावामध्ये वास्तव्यास आहेत. या गडाला इतिहास लाभला आहे. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
सीझनः वर्षभर
कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस (रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून रिक्षाही उपलब्ध आहेत)

बामणघळ – रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ

Bamanghal – Instagram

रत्नागिरीतील हेदवी या ठिकाणी जाऊन जलस्तंभ पाहणे हे पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. बामणघळ असे याचे नाव असून हा निसर्गाचा एक रौद्र आविष्कार मानला जातो. हेदवीच्या गणपती मंदिराजवळ असणाऱ्या समुद्रकिनाऱ्याच्या काळ्या कातळामधील भेगेमधून लाटांचा अनोखा खेळ चालू असतो. भरतीच्या वेळी हा जलस्तंभ अधिक सुंदर दिसतो. समुद्राच्या लाटांमुळे इथे खडकांमध्ये एक मीटर रूंद आणि 10 मीटर लांबीची एक घळ निर्माण झाली असून याचे नाव बामणघळ असेल आहे. यामध्ये समुद्राचे पाणी जोरात घुसते आणि त्यानंतर साधारण 10-15 मीटर उंचीचा अवर्णनीय जलस्तंभ निर्माण होतो. ऑगस्ट महिन्यानंतर साधारण दिवाळीपर्यंत याचा मनमोहक नजारा तुम्हाला अनुभवता येतो. 

ठिकाणः रत्नागिरी जिल्हा, हेदवी

सीझनः पावसाळा

कसे जावेः स्वतःचे वाहन, ट्रेन, बस, रिक्षा 

FAQs – रत्नागिरी पर्यटन स्थळे | Ratnagiri Paryatan Sthale Marathi

प्रश्नः रत्नागिरीमध्ये विकत घेण्यासाठी चांगलं काय आहे?
उत्तरः काजू, आंबे, कोकम सरबत, फणसाचे गरे, आमसूल ही रत्नागिरीची खासियत आहे. तुम्ही इथे जाणार असाल तर हा कोकणचा मेवा नक्की विकत घ्या. 

प्रश्नः रत्नागिरीला जाण्यासाठी सोपा मार्ग कोणता?
उत्तरः ट्रेनने तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता. पण गावागावात जायचं असेल तर एस. टी. अथवा बस हा उत्तम पर्याय आहे. तुमचे स्वतःचे वाहन असेल तर अप्रतिमच. 

प्रश्नः रत्नागिरीत फिरण्यासाठी जायचे असेल तर राहण्याची सोय होते का?
उत्तरः हो रत्नागिरी शहर असो वा तुम्हाला पर्यटनासाठी एखाद्या खेड्यात जायचे असो अनेक हॉटेल्स आणि गावात घरगुती सोयही उपलब्ध आहेत. तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवल्यास, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होतो. 

निष्कर्ष – रत्नागिरी जिल्हा अत्यंत सुंदर असून फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. रत्नागिरीच्या अनेक भागात समुद्रकिनारे असून तुम्ही फिरू शकता. तुम्हालाही सुट्टीचा प्लॅन बनवायचा असेल आणि कोकणात जायचे असेल तर रत्नागिरी हा उत्तम पर्याय आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तुम्हीही करा एन्जॉय!

Read More From लाईफस्टाईल