Family

प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स

Leenal Gawade  |  Jan 21, 2019
प्रेम करता? घरी सांगायचय? तुमच्यासाठी खास टीप्स

‘प्यार किया तो डरना क्या’, असे म्हणत प्रेमने सिमरनला जिंकण्यासाठी तिच्या कुटुंबाचे मन जिंकले. पण सिमरनला मिळवणे प्रेमला अर्थात सलमान खानला हिरो असूनही सोपे नव्हते. त्यासाठी त्याने चित्रपटातही खूप पापड लाटले होते. सिनेमात काजोलचे वडील धर्मेंद्र आणि भाऊ अरबाजने त्याची चांगलीच परीक्षा घेतली आणि मगच सिमरन (काजोल)चा हात प्रेमच्या हातात दिला होता. आता खऱ्या आयुष्यात हे शक्य नाही ना! म्हणजे मुलाची परीक्षा घेण्यासाठी त्याला बोलावून त्याला फार्म हाऊस किंवा घरी ठेवायला कोणाला इतका वेळ आहे नाही का?. शिवाय खऱ्या आयुष्यात आई- वडीलांना पडणारे प्रश्नही वेगळे असतात. आता प्रश्न असा की, तुम्ही कोणावर प्रेम करता का? पण आपलं नातं घरी सांगायला घाबरता? मग थोडं थांबा कारण आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स देणार आहोत ज्याचा उपयोग तुम्ही घरी आपले नाते सांगताना करु शकता. 

जोडीदाराला जाणून घेण्यासाठी विचारा हे प्रश्न

 प्रेम म्हणजे नक्की काय असतं?

प्रेमाची नेमकी व्याख्या काय? असा प्रश्न कोणी विचारला आणि सध्याच्या काळात कोणी गुगल केला तर प्रेमाच्या लाखोच्या घरात व्याख्या मिळतील. म्हणजेच प्रेमाची नेमकी अशी व्याख्या कोणालाच माहीत नाही. पण प्रेम म्हणजे ओढ, समजून घेण्याची वृत्ती आणि कोणत्याही प्रसंगात एकमेकांना न सोडण्याचा आत्मविश्वास… अशी सर्वसाधारण व्याख्या गुगल केल्यावर मिळते. एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा विचार करत असाल तर आधी आत्मचिंतन करा. आत्मचिंतन यासाठी की, तुम्ही प्रेम करता हे घरी सांगण्याआधी  तुमच्या दोघांमधील नाते किती घट्ट आहे ते ओळखा. आयुष्य एकत्र घालवण्याच्या आणाभाका घेणे आणि ते खरे घालवणे हे चित्रपटांपेक्षा फार वेगळे असते. त्यामुळे तुम्हाला दोघांना लग्न करायचे आहे की नाही हे आधी ठरवा.

प्रपोझ कराचयं? मग जाणून घ्या प्रपोझ करण्याच्या आयडियाज

पालकांना विश्वासात घ्या आणि सांगा

तुमचे आई-वडील कितीही कडक शिस्तीचे असले तरी ते तुमचे आई-वडील आहेत. तुमच्या सुखापुढे त्यांना काहीच महत्वाचे नसते. एकदा तुम्ही दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवायचे ठरवल्यानंतर पालकांना सांगण्याची तयारी करा. पण पालकांशी इतरवेळी बोलणे आणि आपल्या आयुष्यातील मोठ्या निर्णयासंदर्भात सांगणे खूप वेगळे असते. अशावेळी आत्मविश्वासाची गरज असते. आई ऐकते म्हणून फक्त आईला सांगू नका. दोन्ही पालकांना एकत्र बसवून त्यांना तुम्ही कोणावर प्रेम करता ते सांगा. हे ऐकल्यानंतर कदाचित त्यांना धक्का बसेल (किंवा बसणार नाही) पण त्यांना ती गोष्ट पटली नाही तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतील. त्यांना अचानक अनेक प्रश्न पडतील काही पालक चिडतीलसुद्धा.

उदा. काही घरात प्रेमविवाहाला परवानगी नसते. पण तरीदेखील तुम्ही प्रेम करण्याचे धाडस केले हे ऐकून ते चिडतील तुमचे काहीच ऐकायला तयार होणार नाहीत. पण एक लक्षात ठेवा की, तुम्ही घरातील नियम माहीत असूनही प्रेम केले आहे. म्हणजे ते निभावण्याची ताकदही तुमच्यामध्ये आहे. फक्त आत्मविश्वासाची गरज आहे.

थोडं थांबा विरोध केला तरी ते तुमचे आई- बाबा आहेत. तुमचं वाईट ते कधीच पाहणार नाहीत. आणि महत्वाची गोष्ट अशी की,  आता तुमच्या प्रेमाच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली आहे हे लक्षात ठेवा.

आता प्रश्नोत्तराचा तास

तुमच्या भावना तुम्ही पालकांना सांगितल्यानंतर सगळे एकाच दिवशी मार्गी लागे असा कधीच विचार करु नका. प्रेम जसजसे हळूहळू फुलते. तशी परवानगी मिळायलाही वेळ लागतोच. शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला सगळे वाचता येईल, असे होत नाही. त्यामुळे ही गोष्ट थोडा वेळ घेणारच. कारण हे सांगितल्यानंतर आता आई-वडिलांना प्रश्न पडायला सुरुवात होईल आणि मग सुरु होईल तुमचा प्रश्नोत्तराचा तास..

साधारण कोणते प्रश्न असतील ते सुद्धा आम्ही तुमच्यासाठी काढले आहेत ते पुढील प्रमाणे

मुलगा/ मुलगी काय करते?

जीवनसाथी म्हणून तो /ती योग्य आहे का?

भविष्यात एकत्र राहण्यासाठी तुम्ही योग्य आहात का?

तुमच्या जोडीदाराच्या घरी या नात्याला परवानगी आहे का?

मुलगी असल्यास ती आपल्या घरात रुळू शकेल का?

आपल्या कुटुंबाची सर्व माहिती तिला/ त्याला माहीत आहे का?

कुठे भेटलात?

कधीपासून हे प्रकरण सुरु आहे?

साधारण असेच प्रश्न पालकांना पडतात. आता प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे या प्रश्नांना आणखी काही प्रश्नांची जोड मिळू शकते.

सांगण्याआधी ही गोष्ट तपासणे गरजेचे

कोणतीही गोष्ट सांगण्याआधी समोरची व्यक्ती ते ऐकण्याच्या मन: स्थितीत आहे का हे तपासणे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. एखादी गोष्ट समोरच्याला सांगण्यासाठी त्याचा मूड चांगला आहे का? हे तपासणे महत्वाचे असते. कारण त्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. मूड खराब असताना जर तुम्ही हा विषय काढलात तर तुम्हाला पहिल्यांदाच त्यांच्या नकाराला सामोरे जावे लागेल आणि जो आत्मविश्वास तुम्ही कसाबसा स्वत:मध्ये आणला असेल तोही गळून जाईल. त्यामुळे पालकांचा मूड पाहूनच या गोष्टी त्यांच्याशी बोला.

अपयश ही यशाची पहिली पायरी

शाळेत अनेकदा फळ्यावर हा सुविचार लिहिलेला पाहिला असेल ना? मग आता हा सुविचार पूर्णपणे लागू होतो. तुम्ही प्रेमाविषयी सांगितल्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्याइतके पालक पटकन तयार होतील. पण काही पालक काही केल्या होणार नाही. म्हणजे त्यांनी सांगितल्या सांगितल्या नाही म्हटले म्हणजे सगळे संपले असे नाही, यावेळी हा सुविचार सतत आठवा. नकाराने तुम्ही खचून गेलात असे अजिबात दाखवू  नका. एक दिवस तुम्ही त्यांना हे पटवून द्याल, हा विश्वास चेहऱ्यावर ठेवा.

कुटुंबातील सगळ्यात जवळच्या व्यक्तिकडे व्यक्त व्हा

पालकांना सांगणे तुम्हाला जमत नसेल तर घाई करु नका. घरातील तुमच्या जवळच्या व्यक्तिला गाठा. त्या व्यक्तिकडे मन मोकळे करा. ही व्यक्ती मोठी बहीण, मोठा भाऊ, आजी- आजोबा आणि कदाचित लहान भावंडे देखील असू शकतात. पण तुमचे प्रेम समजून घेऊ शकेल अशी परफेक्ट व्यक्ती कोण ?  हे तुम्हाला आधी शोधावे लागेल. तुम्ही कोणाला सांगणार हे ठरवल्यानंतर त्या व्यक्तीसमोर तुम्ही तुमच्या प्रेमाविषयी सगळे काही सांगा. त्यांना तुमच्या प्रेमावर विश्वास बसला तर ते तुम्हाला नक्कीच पाठींबा देतील. वेळप्रसंगी तुम्हाला आई-वडिलांनी विरोध केल्यानंतर त्यांना समजावून सांगतील. आई-वडिलांनी विश्वास ठेवायला अशी व्यक्ती ती असायला हवी. त्यामुळे ती जवळची व्यक्ती निवडताना काळजी घ्या.

भेटायला जाताना

तुमच्या घरी सांगून झाल्यानंतर एकमेकांच्या कुटुंबाची भेट घडवून देणेही तितकेच महत्वाचे असते. दोन कुटुंबाची होणारी पहिली भेट खूप महत्वाची असते. कारण त्यावरुनच दोन्ही कुटुंब एकमेकांच्या पाल्याच्या उत्तम भविष्याचा आणि आनंदाचा विचार करत असतात. दोन्ही कुटुंबामध्ये सुसवांद घडवून आणण्यासाठी तुम्ही दोन दुवा असता. तुमच्या वागण्याबोलण्यातून तुम्हाला पारखण्याचा प्रयत्न केला जात असतो. अशावेळी तुम्ही काय घालता? भेटायला कुठे बोलावता? हे सगळे देखील पाहिले जाते. कुटुंबाची भेट घडवून देण्यासाठी चांगले हॉटेल,मॉल अशा ठिकाणी भेटा. जाताना अगदी डिसेंट कपडे घाला. अशा भेटींच्यावेळी ताजेतवाने आणि फ्रेश दिसण्यासाठी खूप गडद मेकअप टाळा.

‘जा सिमरन जिले अपनी जिंदगी’

तुमचे आई वडील तुम्हाला लग्नाची परवानगी देणार नाहीच हे गृहीत धरु पळून जाण्याचा विचार करु नका किंवा घरातल्यांचा राग डोक्यात ठेवून टोकाची भूमिका मुळीच घेऊ नका. ‘जा सिमरन जिले अपनी जिंदगी’ असा डायलॉग मारणारे पालक फारच कमी असतात. त्यांना पालक म्हणून थोडं अधिकाराने वागण्याचा आणि तुम्हाला थोडसं रुसून बसण्याचा अधिकार आहे. हे क्षण एकदा होकार मिळाल्यावर अनुभवता येणार नाहीत म्हणून आहे तो क्षण एन्जॉय करा आणि पालकांच्या मतपरिवर्तनासाठी प्रयत्न करत राहा.

लपवाछपवी कशाला?

अनेकदा परवानगी मिळण्यासाठी जोडीदारासंदर्भातील काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न केला जातो. ही गोष्ट कोणतीही असू शकते.

उदा. एखादी मुलगी मुलापेक्षा वयाने मोठी असते. तिचे मोठे असणे घरातल्यांना पटणार नाही म्हणून तिचे वय लपवणे  किंवा मुलगा वयाने मुलीपेक्षा खूप मोठा असल्यामुळे त्याचे वय लपवणे आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन मुलाची आर्थिक परिस्थिती लपवणे. त्याच्याविषयी घरी खोटी माहिती देणे.  घरी पटणार नाही अशा गोष्टी लपवणे हे चुकीचेच आहे.

काही गोष्टींचे तात्पुरते निवारण करण्यासाठी आपण खोटे बोलून वेळ मारुन नेतो. पण त्याचा त्रास भविष्यात होऊ शकतो.  काही गोष्टींमुळे पालक दुखावले जातील याचा विचार करुन गोष्टी लपवल्या तर पालकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होईल. तुमच्या प्रेमापेक्षाही तुम्ही खोटे बोललात याचा राग त्यांच्या मनात कायम राहील.

Read More From Family