मनोरंजन

साजिदसोबतच्या लग्नाला दिव्या भारतीच्या पालकांचा होता विरोध

Leenal Gawade  |  Apr 30, 2020
साजिदसोबतच्या लग्नाला दिव्या भारतीच्या पालकांचा होता विरोध

काळाच्या पडद्याआड गेलेल्या काही अभिनेत्री आजही अनेकांना आठवतात. काहींची एक्झिट मनाला इतकी चटका लावून जाणारी होती की, ती अभिनेत्री आज आपल्यात नाही याचा आजही अनेकांना विश्वास बसत नाही. अशा या अभिनेत्रींच्या यादीमध्ये आवर्जून घेतले जाणारे नाव म्हणजे ‘दिव्या भारती’ सौंदर्याची खाण असलेल्या दिव्या भारतीचा मृत्यू हा तसा संशयास्पद होता. बिल्डींगच्या टेरेसवरुन पडून तिचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याची चर्चा होत होती. पण यामध्ये काहीतरी गौडबंगाल असल्याचे समोर आले. पण हे प्रकरण कधीच सोडवले गेले नाही. साजिद नाडियादवालासोबत लग्न केल्यानंतर अगदी काहीच महिन्यात तिचा मृत्यू झाला. साजिदसोबत नाते जोडणे दिव्या भारतीच्या पालकांना कधीच रुचले नव्हते. तिच्या आईने एका मुलाखतीदरम्यान नेमके काय सांगितले ते पाहूया.

अंडरवर्ल्डच्या संपर्कामुळे संपले या अभिनेत्रींचे करीअर

दिव्या भारतीच्या आईने केला खुलासा

Instagram

काही दिवसांपूर्वी साजिद नाडियादवालाची दुसरी पत्नी वरदा नाडियादवाला हिने दिव्या भारतीच्या आठवणी सांगितल्या होत्या. ती आजही या कुटुंबाचा एक भाग असल्याचे म्हटले. दिव्या भारतीच्या जाण्याचे दु:ख तिने बोलून दाखवले. त्या निमित्ताने पुन्हा एकदा दिव्या भारतीची आई  मीता भारती हिची देखील एक मुलाखत समोर येऊ लागली. त्यात तिने दिव्याच्या लग्नाच्या गोष्टींबद्दल सांगितले होते. तिने दिलेल्या माहितीनुसार ‘शोला और शबनम’ या चित्रपटात दिव्या भारती आणि गोविंदा अशी जोडी सगळ्यांना दिसली. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान  गोविंदाच्या डेट्स घेण्यासाठी चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला आले होते. त्याच दरम्यान दिव्या आणि साजिदची पहिली भेट झाली. या पहिल्या भेटीतच तिने आईला साजिद कसा माणूस वाटतो? म्हणून प्रश्न विचारला. त्यावेळ मीता यांनी चांगला आहे असे म्हटले होते. दिव्या भारती 18 वर्षांची झाल्यानंतर तिने आईला साजिदसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मीता यांनी वडिलांची परवानगी घेण्यास दिव्याला सांगितले. कोर्ट मॅरेजसाठी तिच्या आईने साक्षीदार व्हावे असे तिला वाटत होते.पण वडिलांनी लग्नाला परवानगी न दिल्यामुळे आईही या लग्नाच्या विरोधात होती. साजिदला ओळखून घेण्याअगोदरच तिने घाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला जो तिच्या घरच्यांना अजिबात रुचला नव्हता. 

ट्रक ड्रायव्हर्समध्ये आजही प्रसिद्ध आहेत ही अजय देवगणची गाणी

10 महिन्यातच झाला मृत्यू

Instagram

दिव्या भारतीचा लग्नानंतर अवघ्या 10  महिन्यात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची बातमी ऐकताच अनेकांना धक्का बसला हे वर्ष होते 1993. तिच्या आकस्मिक मृत्यूमुळे अनेकांना धक्का बसला होता.  तिच्या या मृत्यूसंदर्भात अनेक अफवांना उधाण आले होते. ती राहत असलेल्या फ्लॅटच्या हॉलला ग्रिल नव्हती. ती बाहेर पाय टाकून बसली असताना अचानक तिचा तोल गेला. ही घटना रात्री घडली त्यावेळी तिच्या चित्रपटाच्या शुटींगच्या कॉश्च्युमसाठी नीता लुल्ला तिच्या घरी आली होती. साजिद, नीता आणि तिचा पती त्यावेळी त्याच घरी होते. पण त्यांनाही ही गोष्ट पटकन लक्षात आली नाही. दिव्यासाठी काम करणारी अमृता नावाची व्यक्तीही त्यावेळी घरीच होती. पण हे सगळे इतके पटकन झाले की, कोणालाच काही कळले नाही. तिला खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहताच तातडीने कुपर रुग्णालयात नेण्यात आले पण तिचा त्या आधीच मृत्यू झाला होता.  पोलिसांनाही दिव्याचा मृत्यू संशयास्पद वाटला म्हणून त्यांनी या संदर्भात चौकशीही सुरु केली होती. तिची मोलकरणी अमृताकडून पोलिसांना माहिती मिळत होती. पण ही चौकशी सुरु असतानाच अमृताला हृदयविकाराचा झटका आला आणि तीसुद्धा गेली. त्यामुळे चौकशी थांबण्यात आली आणि तिची फाईल कायमची बंद करण्यात आली. पण असे असले तरी तिच्या मृत्यूचे गुढ काही उलगडले नाही. 

एकाकी निघून गेलेल्या दिव्या भारतीचा लग्नाचा निर्णय चुकला असे आज देखील अनेकांना वाटते. 

90 चं दशक गाजवलेल्या टीव्हीवरील अभिनेत्री

Read More From मनोरंजन