Festival

गुढीपाडव्याला कडुलिंबाचे नक्की काय महत्त्व आहे

Dipali Naphade  |  Apr 9, 2021
गुढीपाडव्याला कडुलिंबाचे नक्की काय महत्त्व आहे

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा आरंभ. वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा आपल्याकडे थाटामाटात साजरा केला जातो. पुराणात सांगितल्याप्रमाणे ब्रम्हदेवाने हे जग चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले. त्यामुळेच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजण्यात येणारा असा हा गुढीपाडवा घराघरात गुढी उभारून साजरा केला जातो. पण या दिवशी नक्की गुढी कशी उभारली जाते? तुम्हाला माहितीये का? या दिवशी या गुढीला कडुलिंबाचा टाळाही बांधला जातो. तसंच अनेक घरांमध्ये कडुलिंबाचा पाला खाण्याचीही पद्धत आहे. पण असं नक्की का? त्याचे कारण काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? गुढी उभारताना त्याला तांबडे जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ तर बांधली जातेच पण त्याचबरोबर बांधला जातो तो म्हणजे कडिलिंबाचा टाळा. कडुलिंबाची ही पाने लावल्यानंतर त्यावर तांब्याचा लोटा ठेऊन ही गुढी उभारण्यात येते. कडुलिंबाचे नक्की काय महत्त्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी ते आपण जाणून घेऊया.

गुढीपाडवा 2021: जाणून घ्या मुहूर्त आणि पूजाविधी

कडुलिंबाचा आरोग्यावर चांगला प्रभाव

Freepik

कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावली जातात. त्यामुळे घरात येणाऱ्या रोगजंतूंना अटकाव होतो आणि कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहाते. कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण कडुलिंबामध्ये समाविष्ट आहेत. वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे कडूलिंबाचा उपयोग केला जातो. यामुळे खोकला बरा होतो आणि आरोग्याला नवसंजीवनीही मिळते. त्यामुळेच याचा उपयोग गुढीपाडव्याला केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे. तसंच कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. कडुलिंबाची कोवळी पानं, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध हे सर्व एकत्र करून हा प्रसाद गुढी उभारून झाल्यावर घरातील मंडळीना देण्यात येतो. तसंच कडुलिंबाच्या कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ हे सर्व पदार्थ मिक्स करून चटणी तयार करण्यात येते. या चटणीच्या सेवनाने शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते असं समजण्यात येतं.

गुढीपाडव्यासाठी करा घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड

त्वचेसंबंधी तक्रारी होतात दूर

Shutterstock

कडुलिंबाच्या पाने, फुले, फळे, मुळे आणि खोड या पाचही अंगांचा उपयोग होतो. पाने कडू लागतात पण तरीही याच्या गुणामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी याचे सेवन करण्याची प्रथा आहे. याने पोटातील जंत दूर होतात. तर अंगावर उठणारी खाज आणि त्वचेसंबंधी असणाऱ्या इतर तक्रारीही दूर होण्यास मदत मिळते. तसंच वर्षभर कडुलिंबाची पाने खाणे शक्य नाही. पण वर्षाच्या सुरूवातीला किमान खाऊन आरोग्याची काळजी घेण्याची आठवण तरी किमान राहावी यासाठी या दिवशी कडुलिबांची पाने खाल्ली जातात. आरोग्याच्या दृष्टीने कडुलिंबाचे सेवन करणे अत्यंत योग्य आहे. यामुळे रोगराई दूर होते आणि शरीरही निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळेच अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे सेवन करण्यात येते. ही पूर्वपरंपरागत चालत आलेली रितही आहे. मात्र यामागे वैज्ञानिक कारणही असल्यामुळे याचा चांगला उपयोग करून घेता येतो. त्यामुळे तुम्हीही या गुढीपाडव्याला नक्कीच कडुलिंबाचे पान खायला विसरू नका आणि आपलेही आरोग्य राखा अधिक चांगले!

गुढीपाडव्याचा झटपट तयार होणारा महाराष्ट्रीयन खास मेनू

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Festival