Festival

वटपौर्णिमा नक्की का आणि कशासाठी, जाणून घ्या कशी साजरी करावी वटपौर्णिमा

Dipali Naphade  |  Jun 15, 2019
वटपौर्णिमा नक्की का आणि कशासाठी, जाणून घ्या कशी साजरी करावी वटपौर्णिमा

वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण. खरं तर या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते असं म्हणायला हवं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या व्रताला सर्व सुवासिनींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे. महाराष्ट्रीय महिला हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात. या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून आणि त्याची पूजा करून हे व्रत करण्यात येतं. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या नवऱ्यासाठी उपवास ठेवते. पण हे व्रत केल्याने नवऱ्याचे प्राण खरंच वाचतात का? अनादी काळापासून हा विचार कदाचित बायकांना आलाच नसावा आणि महिला असा विचार करतात त्यांना वेड्यात काढलं जातं. पण खरं सांगायचं तर वटपौर्णिमा हे पूर्वीच्या काळी एकत्र जमण्याचं निमित्त होतं. वडाच्या झाडाजवळ चांगला ऑक्सीजन मिळतं तो म्हणजे अगदी दोन्ही अर्थाने. एक म्हणजे श्वासोच्छवासाचा ऑक्सीजन आणि दुसरा म्हणजे आपल्या मैत्रिणींचा थोड्या कालावधीसाठी का असेना पण मिळणारा सहवास. कारण पूर्वी ‘रांधा वाढा उष्टी काढा’ हेच स्त्रियांचं काम होतं. सर्व महिलांना त्याकाळी नटण्याची आणि एकत्र राहण्याची संधी मिळायची. पण आता या सगळ्या रूढी – परंपरा जपणं तितकंसं महत्त्वाचं आहे का? असाही प्रश्न विचारण्यात येतो. पण खरं तर याच पद्धतीने आणि आचाराने आणि विचाराने ही परंपरा जपली तर का नाही? असा प्रतिप्रश्नही करता येईल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाड्याच्या फांद्या तोडून नका जपू रूढी

आजही आपल्या घरातील परंपरा आणि आपल्या घरातील वारसा जपण्यासाठी थोरा मोठ्यांना आवडतं म्हणून इतर दिवशी जीन्स आणि शर्टमध्ये वावरणाऱ्या महिला या वटपौर्णिमेला मात्र खास ऑफिसला सुट्टी घेऊन सर्व साजश्रृंगारासह वडाला फेऱ्या मारताना दिसतात. या सगळ्याचं अर्थातच कौतुक आहे. पण त्याचबरोबर आपण पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी तर पोहचवत नाही ना? याचा विचार होणंदेखील गरजेचं आहे. आपली परंपरा जपण्याचा आणि कोणालाही न दुखावता सर्व करण्याच्या प्रयत्नात वडाच्या झाडाच्या फांद्याची मोडतोड करणं हे चुकीचं आहे. खरं तर वडाच्या झाडाच्या फांद्या न तोडता या दिवशी वडाची अथवा अन्य झाडं लावली तर हे व्रत पूर्ण होईल अशी सद्यस्थिती आहे. आता बऱ्याच महिला ऑफिसमध्ये जातात. त्यामुळे केवळ फळांवर राहून त्याचा उपास सांभाळून हे व्रत पूर्ण होऊ शकतं का? हा विचार केला जातो का? मग उपवासाचे पदार्थ खात ‘दुप्पट’ खात हा उपवास केला जातो. इतकी ओढाताण करून हे सर्व करून नक्की काय मिळणार? बरं जेव्हा तुम्ही उपवास करता तर तुमच्या दीर्घायुष्यासाठी तुमचा पतीही उपवास करतो का? तोदेखील तुमच्याबरोबरीने हे व्रत करत असेल तुमची काळजी घेत असेल तर हे व्रत दोघांनी करण्यात जास्त मजा नाही का? थोडा आता असाही विचार करून बघा. म्हणजे तुम्हाला वटपौर्णिमेचं महत्त्व अजून पटेल.

वाचा – वटपौर्णिमा उखाणे (Vat Purnima Ukhane)

प्रेम नसेल तर व्रताचा काय उपयोग?

वटपौर्णिमा करणाऱ्या महिलांच्या लग्नाला बरेचदा खूप वर्ष झालेली असता. पण अशा जोडप्यांमध्ये खरंच प्रेम असतं का? असा प्रश्नही उभा राहतो. एकमेकांविषयी आदर नसेल, जर एखाद्या स्त्री चा नवरा कर्तव्य नीट निभावत नसेल, सतत बायकोला गृहीत धरत असेल तर असा नवरा जन्मोजन्मी खरंच मिळायला हवाय का? धकाधकीच्या जीवनात दोन क्षण चांगले घालवायचे आणि मजा करायची असेल तर वटपौर्णिमा आपल्या मैत्रिणींना बोलावून करणं केव्हाही चांगलं पण पर्यावरणाला हानी पोहचवून करणं योग्य नाही. त्यापेक्षा आजच्या या प्रदूषणाच्या जगात आपल्या आजूबाजूला वटपौर्णिमेच्या दिवशी झाडं लावणं हे जास्त मोठं व्रत आहे. कारण मुंबईसारख्या शहरांमध्ये झाडांची कत्तल आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टी वाढल्या आहेत. त्यामुळे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करणं हे जास्त चांगलं व्रत असेल.

एकंदरीत दोन टोकं सध्या आहेत. व्रतवैकल्य करून काही नवऱ्यावरील प्रेम व्यक्त होत नाही. पण तुम्हाला आपल्या नवऱ्यासाठी खरंच मनापासून वाटत असेल तर तुम्ही नक्की करा. पण त्यासाठी पर्यावरणाची कोणतीही हानी होऊ देऊ नका. याचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. वडाला फेऱ्या मारून हाच नवरा जन्मोजन्मी मिळू दे असं म्हणण्यापेक्षा सात जन्म तुझी पूजा करता यावी यासाठी हे वडाच्या झाडा तू नेहमीच असा उभा राहा अशी प्रार्थना यावेळी नक्की वटपौर्णिमेला करा.

फोटो सौजन्य – Instagram

हेदेखील वाचा

गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचे महत्व जरूर जाणून घ्या

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी

नागपंचमीचं बदलतं महत्त्व

 

Read More From Festival