तुमचं वजन काही किलोनी वाढलं असेल, तोंडावर सतत पिंपल्स येत असतील आणि वरचेवर अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर याचा अर्थ तुमचं पोट स्वच्छ नाही आहे. कारण अनेक आजारपणं आणि आरोग्य समस्यांचा उगम हा तुमच्या पोट स्वच्छ नसल्यामुळे होऊ शकतो. यासाठीच वरचेवर नैसर्गिक पद्धतीने पोट स्वच्छ करणं गरजेचं आहे. पोट स्वच्छ असेल तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहू शकते. पोट स्वच्छ झाल्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होतं. थोडक्यात शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. ज्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि तुम्हाला निरोगी जीवन मिळतं. यासाठीच घरच्या घरी पोट स्वच्छ करण्याचे उपाय तुम्हाला माहीत असायलाच हवं.
पोट स्वच्छ झालं की त्याचे परिणाम नकळत तुमच्या शरीरावर दिसू लागतात. नैसर्गिक पद्धतीने पोट स्वच्छ करण्याचे अनेक फायदे आहेत.
जर तुमचं पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ झालं असेल तर तुमच्या शरीरातील विषद्रव्ये आणि न पचलेलं अन्न शरीराबाहेर टाकलं जातं. ज्याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होतो. पचनसंस्था सुधारल्यामुळे पोटात गेलेलं अन्न योग्य पद्धतीने पचतं आणि तुमचं सुदृढ राहण्यास मदत होते. यासाठीच वरचेवर नैसर्गिक पद्धतीने पोट साफ करणं गरजेचं आहे. जर पोटातील न पचलेलं अन्न तसंच आतड्यांमध्ये पडून राहीलं तर ते सडतं आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो.
पोटात राहीलेलं अन्न आतड्यांमध्ये सडून ते तसंच साचून राहतं. ज्यामुळे तुम्हाला मलावरोध अथवा बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. आतड्यांमधील अन्न मळ रूपात शरीराबाहेर पडताना तो कठीण होतो आणि शौचाला त्रास होतो. ज्यामुळे मळ शरीराबाहेर पडत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे खाण्याची इच्छा कमी होते, विविध आजारपणांना सामोरं जावं लागतं.
जर तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असाल आणि तरिही तुमचं वजन कमी होत नसेल तर हा उपाय जरूर करा. कारण वजन कमी करण्यासाठी तुमची पचनसंस्था सुरळीत असणं खूप गरजेचं आहे. पोट स्वच्छ झाल्यामुळे याचा परिणाम तुमच्या आहार आणि वजनावर दिसून येतो.
तुमच्या शरीरात अन्नावाटे, पाण्यावाटे आणि श्वासावाटे घेतली जाणारी विषद्रव्यांचा परिणाम तुमच्या शरीरातील आतडी, किडनी आणि यकृतावर होत असतो. ज्यामुळे शरीरात गेलेल्या या टॉक्सिन्सचा विपरित परिणाम सर्वात आधी या अवयवांवर पडतो. ज्यामुळे भविष्यात आतड्यांचा अथवा पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. मात्र जर तुम्ही वरचेवर तुमचं पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करत असाल तर हा धोका तुम्हाला नक्कीच कमी असू शकतो.
पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ झाल्यामुळे आतड्यांमधील टॉक्सिन बाहेर टाकले जातात. ज्यामुळे तुमच्या आतडी आणि पचनसंस्थेला चालना मिळते. याचा परिणाम तुम्हाला झोप चांगली लागते, रक्ताभिसरण सुधारतं आणि दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं.
आतड्यांची संपूर्ण स्वच्छता झाल्यामुळे तुमची जीवनशैली बदलते, तुम्ही पुरेशी झोप घेता, वजन कमी करता, पौष्टिक आणि सात्त्विक अन्न खाता, पाणी भरपूर पिता याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. वंधत्व येण्यामागे अनेकदा चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार कारणीभूत असतो. मात्र जेव्हा तुम्ही त्या जीवनशैलीत बदल करता तेव्हा तुमची आई होण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते.
पोट स्वच्छ झाल्यामुळे खाल्लेल्या अन्नातील पोषकतत्व शरीराला पुरेशा प्रमाणात मिळतात. ज्यामुळे तुमचे रक्त शुद्ध होते, शरीराला ऊर्जा मिळते, कामाचा उत्साह वाढतो. योग्य आणि पोषक आहाराचा परिणाम तुमच्या शरीरयष्ठी आणि मनावर जाणवू लागतो.
आतड्यांमधील टॉक्सिन्स साचल्यामुळे शरीरातील प्रत्येक कार्यात अडथळे येतात. आतड्यांमधील टीश्यूज, रक्तपेशी त्यांचे कार्य सुरळीत करू शकत नाहीत. मात्र पोट स्वच्छ झाल्यामुळे या पेशींच्या कार्यात सुधारणा होते.
असं म्हणतात की, पोट स्वच्छ असेल तर कोणताही आजार अथवा आरोग्य समस्या होत नाहीत. कारण आजार आणि आरोग्य समस्यांचं मुळ पोटाच्या अस्वच्छतेमध्ये दडलेलं आहे. त्यामुळे निरोगी आणि सुदृढ शरीरप्रकृती हवी असेल तर महिन्यातून एकदा नैसर्गिक पद्धतीने पोट स्वच्छ केल्याचा तुम्हाला चांगला फायदाच होऊ शकतो.
निरोगी आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी महिन्यातून एकदा नैसर्गिक पद्धतीने पोट साफ करणं गरजेचं आहे. यासाठी काही नैसर्गिक आणि घरच्या घरी करता येण्यासारखे उपाय आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. हे उपाय तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरू शकतात.
माणसाच्या शरीराला निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी दिवसभरात कमीत कमी आठ ग्लास पाणी पिण्याची आवश्यक्ता असते. कारण आपल्या शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी पुरेशी पाण्याची गरज असते. जेव्हा तुम्ही नियमित आणि पुरेसे पाणी पिता तेव्हा तुमचे शरीरा नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होते. पाण्यावाटे अथवा युरिनवाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स सहज बाहेर टाकले जातात.
लिंबू हे एक नैसर्गिक क्लिंझर आहे. कारण लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात आणि तुमचे मेटाबॉलिझम सुधारते. एवढंच नाही तर नियमित लिंबू पाणी पिण्यामुळे तुमचे वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते. म्हणूनच पोट स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित लिंबू पाणी प्या.
दुपारच्या जेवणानंतर अथवा दोन जेवणामध्ये ताक पिणे शरीरासाठी अतिशय उत्तम असतं. जर तुम्ही ही सवय शरीराला लावली तर तुमचं पोट अगदी नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होऊ शकतं. ताक हे दह्यापासून तयार होतं आणि दह्यामध्ये नैसर्गिक प्रोबायोटिक असतात ज्याचा चांगला परिणाम तुमच्या आतड्यांवर होतो. मात्र ताकामध्ये काहिही न मिसळता ते प्या ज्यामुळे चांगला फायदा तुम्हाला मिळू शकतो.
दिवसभर जर तुम्ही तळलेले आणि जास्त तिखटमीठ टाकलेले पदार्थ खाल्ले तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसू लागतो. दोन जेवणाच्या मध्ये लागणारी भुक भागवण्यासाठी तुम्ही सलाड अथवा ताज्या भाज्यांपासून तयार केलेली स्मूदी अथवा रस नक्कीच घेऊ शकता. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येणार नाही. शिवाय पोट स्वच्छ होण्यास मदत होईल.
वजन कमी करण्यासाठी आणि पोट स्वच्छ ठेवण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ आहारातून घेणं फायद्याचं ठरू शकतं. कारण फायबरयुक्त पदार्थ खाण्यामुळे ते लवकर पचतात आणि त्यामुळे अपचन होण्याची शक्यता कमी असते. शिवाय फायबरयुक्त पदार्थांमुळे मलावरोध होत नाही. ज्यामुळे पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होते. गहु, बाजरी, नाचणी, गाजर,मटार, बीट अशा धान्य आणि भाज्यांचा वापर आहारात करा.
अळशीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. शिवाय त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिडदेखील असतं. ज्यामुळे तुमचं पोट स्वच्छ होतं, शरीराला आणि मेंदूला चालना मिळते, ह्रदयाचे आरोग्य सुधारते. यासाठी आळशीच्या बिया भाजून घ्या आणि दररोज त्याचा वापर स्वयंपाकात करा. सकाळी आणि संध्याकाळी जेवणापूर्वी तुम्ही एक एक चमचा अळशीची पावडर कोमट पाण्यासोब घेऊ शकता.
कोरफड हे तुमच्या आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी नैसर्गिक औषधच आहे. कारण त्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अॅंटिऑक्सिडंट असतात. कोरफडाचा रस घेण्यामुळे तुमच्या पोटातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. ज्यामुळे आतडी स्वच्छ होतात. यासाठी दिवसभरात दोन वेळा कोरफडाचा रस घ्या.
दूधामध्ये कॅल्शियम असतं जे आपल्या शरीरातील हाडं आणि दातांसाठी गरजेचं असतं हे तर आपल्या सर्वांना माहीत असेलच. पण तुम्हाला हे माहीत आहे का की दूध एक चांगलं टॉक्सिन वॉशर सुद्धा आहे. जर तुम्ही नियमित दूध घेत असाल तर तुमचं पोट व्यवस्थित स्वच्छ होतं. काही लोकांना तर दूध घेतल्याशिवाय मॉर्निंग कॉल येत नाही. त्यामुळे पोट साफ करण्यासाठी दररोज दूध पिणे फायद्याचे ठरू शकते.
एरंडेल तेल हे अगदी पूर्वीपासून पोट स्वच्छ करण्याचा उपाय म्हणून वापरण्यात येतं. एरंडेल तेलामुळे पोट पूर्ण स्वच्छ होतं. पूर्वी प्रत्येकाच्या घरात एरंडेल तेल याच कारणासाठी असायचं. शिवाय घरातील प्रत्येकाला आठवड्यातून एकदा ते आवर्जून दिलं जायचं. एरंडेल तेलामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रात्री एक चमचा एरंडेल तेल कोमट पाण्यासोबत घेतलं की दुसऱ्या दिवशी पोट अगदी साफ होतं. पोट स्वच्छ करण्यासाठी ते फायदेशीर आणि खात्रीलायक औषध आहे.
ग्रीन टी एक आयुर्वेदिक आणि उत्तम क्लिंझर आहे. नियमित ग्रीन टी घेण्याची सवय लावल्यामुळे तुमचं पोट नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ होतं. ग्रीन टी पिण्यामुळे पोट स्वच्छ होतंच शिवाय तुमच्या शरीरातील पेशींनी चालना मिळते. म्हणूनच शरीर डिटॉक्स करण्याचा ग्रीन टी हा एक चांगला पर्याय आहे.
पोट स्वच्छ असणं हे आरोग्याचं लक्षण आहे. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर वेळीच पोट साफ करणं गरजेचं आहे. नाहीतर विनाकारण आजारपण आणि आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
प्रत्येकाची शरीरप्रकृती निरनिराळी असल्यामुळे प्रत्येकावर या गोष्टीचा परिणाम निरनिराळा होऊ शकतो. सहाजिकच वजन कमी होण्याचं प्रत्येकाचं प्रमाणही निराळं असू शकतं. मात्र अंदाजे यामुळे एक ते दोन किलो वजन कमी होऊ शकतं.
नैसर्गिक पद्धतीने पोट स्वच्छ करण्याची अथवा शरीरा डिटॉक्स करण्याची क्रिया महिन्यातून कमीत कमी एक वेळा तरी करायला हवी.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -
बहुगुणी हिरड्याचे आहेत 'हे' अनेक आरोग्यदायी फायदे
जाणून घ्या पोट कमी करण्यासाठी अकुंरित धान्य कसे आहेत फायदेशीर
जाणून घ्या पोटाचे विकार, लक्षणे आणि उपचार