Travel in India

केरळलामोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं (Best Places To Visit In India In Marathi)

Dipali Naphade  |  Jan 16, 2019
केरळलामोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं (Best Places To Visit In India In Marathi)

नेहमी घरामध्ये सुट्टी लागल्यावर फिरायला कुठे जायचं हा विषय सर्वात पहिल्यांदा निघत असतो. मग त्यावर गहन चर्चा होते आणि बऱ्याचदा भावंडांमध्ये लुटूपुटूची भांडणंही. पण खरं तर नक्की सुट्ट्यामध्ये कुठे जायचं हा मोठा प्रश्न असतो. या प्रश्नापासून सुटका मिळण्यासाठी आम्ही तुमची मदत करणार आहोत. भारताबाहेर फिरण्यापेक्षा भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जी आपण पाहिलेली नसतात. शिवाय भारतातही अशी निसर्गरम्य ठिकाणं आहेत जिथे तुम्ही मनसोक्त भटकू शकता आणि भारतातील ठिकाणांबद्दल तसंच आपल्या प्राचीन परंपरांबद्दलही जाणून घेऊ शकता. भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत. पण आम्ही तुम्हाला इथे अप्रतिम अशा पाच ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत. अर्थात तुम्हाला या ठिकाणी फिरायला जाण्याचा मोह नक्कीच हे वाचल्यानंतर आवरणार नाही याची आम्हालाही खात्री आहे. तुमच्यासाठी खास आम्ही ही ठिकाणं निवडली आहेत आणि ती ठिकाणं आहेत –

1) मध्यप्रदेश
2) लेह लडाख
3) सिक्किम
4) मुन्नार
5) हैदराबाद

आता तुम्हाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की, भारतामध्ये इतरही बरीच ठिकाणं पाहण्यासारखी असताना केवळ हीच पाच ठिकाणं आम्ही का निवडली? तर ही ठिकाणं तुम्हाला बघण्यासाठी सात दिवस तर हवेतच. शिवाय या ठिकाणचा निसर्ग अतिशय मनमोहक असून या ठिकाणी जास्तीत जास्त फिरण्याची ठिकाणं आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमची सुट्टी अतिशय मजेत घालवू शकता. तर आपण सुरु करून मध्यप्रदेशपासून.

आपल्या प्रवासासाठी 5 भारतातील स्थाने बघणे (Best 5 Places To Visit)

मध्यप्रदेश (Madhya Pradesh)

व्याघ्र प्रकल्प, लेणी, किल्ले, मंदिरं, राजवाडे आणि अगदी आदिमानवांच्या गुहेपासून वैविध्य असलेले मध्यप्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. अगदी बाहेरील देशातील प्रवासीदेखील भारतामध्ये येऊन मध्यप्रदेश पाहण्याला प्राधान्य देत असतात. मध्यप्रदेशला भारताचं मन अशीदेखील ओळख आहे. अनेक तीर्थक्षेत्रदेखील मध्यप्रदेशमध्ये आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यप्रदेशला जाण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भागांमधून बस तसंच रेल्वेची सोय आहे. मध्यप्रदेशचं कार्यालय मुंबईमध्ये असून ‘वर्ल्ड ट्रेंड सेंटर’मध्ये जाऊन तुम्हाला मध्यप्रदेशच्या ट्रीपसाठी अथवा अगदी आता ऑनलाईनदेखील नोंदणी करता येते.

मोठ्या सुट्टीत फिरायला जायचंय

 

काय आहे मध्यप्रदेशचं वैशिष्ट्य (Tourist Places in Madhya Pradesh)

मध्यप्रदेश ओळखलं जातं ते येथील खजुराहोसाठी. वास्तविक मध्यप्रदेशमधील मध्यभाग, उत्तरभाग, दक्षिण भाग आणि पूर्व भाग ही सर्व ठिकाणं प्रसिद्ध आहेत. पूर्व भागामध्ये तुम्ही उज्जैन, इंदूर, ओंकारेश्वर, महेश्वर अशा भागांमध्ये फिरू शकता तर उत्तर भागामध्ये खजुराहो, ग्वाल्हेर, झाशी आणि शिवपुरी अशी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. मध्यभागामध्ये तुम्हाला सांची, भोपाळ, भीमबेटका अशी ठिकाणं आहेत, तर व्याघ्रप्रकल्प मध्यप्रदेशची शान आहे.

मध्यप्रदेशच्या संस्कृतीवर मराठ्यांचा आणि इतिहासाचा बराच प्रभाव आहे. मुंबई आणि पुण्यावरून मध्यप्रदेशात जाण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेच्या बऱ्याच गाड्या आहेत. जर तुम्हाला उज्जैनपासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही उज्जैन पाहून इंदूरला मुक्काम करून त्यानंतर महेश्वरमार्गे ओंकारेश्वर गाठू शकता. ओंकारेश्वरवरून पुन्हा इंदूरला येणं सोपं आहे. त्यानंतर तुम्ही खजुराहो पाहू शकता.

खजुराहो हे मंदिरावर कोरलेल्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी इतकी सुंदर शिल्प आणि कला आहे की, नेहमीच प्रत्येकाला प्रश्न पडतो की, इतक्या सुंदर मूर्ती कोणी बनविल्या आणि त्या बनवण्यासाठी साधारण किती वेळ लागला असेल? वास्तविक हे ठिकाण पाहताना प्रत्येकजण मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे झाशी. झाशीच्या राणीचा इतिहास कधीही कोणालाही विसरता येणार नाही. असं हे पावन ठिकाण पाहण्याचीही सर्वांना उत्सुकता असते. खजुराहो पाहून झाल्यावर झाशीचा किल्ला पाहायला जाता येतं. खजुराहोला जाण्यासाठी तुम्हाला सतना स्थानकावर उतरून खासगी वाहन करावं लागतं. जर तुम्हाला अभयारण्याचीही आवड असेल तर तुम्ही पन्ना अभयारण्यातही जाऊन भेट देऊ शकता. मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ या शहरामध्ये चार पर्यटनस्थळं आहेत.

सम्राट अशोकाच्या काळामध्ये बांधण्यात आलेला सांचीचा स्तूप.इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात राजा अशोकाने संपूर्ण विटांच्या बांधकामाने बनवलेला हा स्तूप म्हणजे स्मारक आहे. शिवाय कोरलेली हिंदू लेणी, जैन लेणी, अश्मयुगीन मानवाचं वसतीस्थान असलेलं भीमबेटका हे सर्वच मध्यप्रदेशची खासियत आहे. भोजूपरमध्ये राजा भोज यांनी  बांधलेलं भव्यदिव्य भगवान शंकराचं मंदिर आणि एकाच दगडामध्ये घडवलेलं जगातलं सर्वात मोठं शिवलिंगदेखील याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल.

1) व्याघ्रप्रकल्प (Tiger Reserve)

भारतामध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला फिरायला जायला आवडेल. शिवाय वाघांना समोर पाहणं ही प्रत्येकासाठी पर्वणी असते. महाराष्ट्रातही अशी बरीच ठिकाणं आहेत. मात्र मध्यप्रदेशात खास यासाठी प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी कान्हा, पेंच, बांधवगड हे मुख्य व्याघ्रप्रकल्प आहेत. विशेष प्रतिनिधींसह हे व्याघ्रप्रकल्पदेखील तुम्ही खास जाऊन पाहू शकता. अगदी चार दिवस खास यासाठी तुम्ही काढू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करता येते. हे पाहण्यासाठी बऱ्याच पर्यटकांची पसंती असते. त्यामुळे यासाठी आधीच नोंदणी करून ठेवावी लागते.

Best Waterfalls In India To Explore In India In Marathi

2) गावातील फील (Village Feel)

शहरातील लोकांना गावातील बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे गावांमधील वातावरण कसं असतं यासाठीदेखील वेगवेगळ्या टूरिस्टकडून कँपेन करण्यात येतं. यामध्ये तुम्हाला गावातील फील, चुलीवरचं जेवण, तिथलं सांस्कृतिक जीवन या सगळ्याचा फीलही तुम्ही घेऊ शकता, अशी सर्व माहिती मध्यप्रदेश टूरिझम बोर्डचे उपसंचालक युवराज पडोले यांनी खास ‘POPxo Marathi’ ला दिली.  

लेह लडाख (Leh Ladakh)

भारतामध्ये बऱ्याच पर्यटकांसाठी लेह लडाखची सफर करणं हे एक स्वप्नं असतं. त्यातही हा प्रवास बाईकवरून करण्यात जास्त थ्रील अनुभवायला मिळतं अशी बऱ्याच तरूणाईकडूनही प्रतिक्रिया येत असते. ऑक्सीजनचा अभाव, अवघड रस्ते, अरूंद रस्ते तसंच खोल दऱ्या, अचानक दरड कोसळून रस्ता बंद होणं या सगळ्या गोष्टी बरेचदा आपल्याला लेह लडाखच्या रस्त्यावर प्रवास केलेल्या पर्यटकांकडून ऐकू येत असतात. पण तरीही लेह लडाखला जाण्यात एक मजा असते.

लेह – लडाखचा मार्ग (Leh-Ladakh Route)

लेह – लडाखला जाण्यासाठी साधारणतकः दोन मार्ग आहेत. एक म्हणजे जम्मू – श्रीनगर – कारगील आणि दुसरा म्हणजे मनाली – सर्च्यु – केलाँग – लेह. लेह लडाखमधील सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे पॅगाँग लेक आहे. या तलावाचं 65 टक्के पाणी हे चीनमध्ये जातं तर केवळ 15 टक्के पाणी हे भारतामध्ये वापरलं जातं. या ठिकाणी जाण्यासाठी पगला नाला ओलांडावा लागतो. या नाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे दररोज दुपारी मोठा पूर येत असतो. ठराविक वेळेच्या आत हा नाला ओलांडावा लागतो. इतकंच नाही तर यासाठी तुम्हाला तिथे उपस्थित असणाऱ्या सैनिकांचती मदत घ्यावी लागते.

लडाख अत्यंत दुर्गम प्रदेश (Remote Area)

लडाख हा भारतातील अत्यंत दुर्गम प्रदेश मानला जातो. साधारणतः 11 हजार 500 फूट उंचीवर हा प्रदेश आहे. लडाखमधील काही भाग हा अत्यंत शांत आहे. याच्या नॉर्थ वेस्टला काराकोरमच्या पर्वतरांगा आहेत, तर साऊथ वेस्टच्या बाजूला हिमालयाच्या रांगा आणि ट्रान्स हिमालय आहे. इथल्या भागांमधून फिरत असताना तुम्हाला या शांततेचीही सवय करून घ्यावी लागते. दरम्यान इथे ऑक्सीजनची कमतरता असल्यामुळे बरेचदा डोकं दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, मळमळणं, चेहऱ्याला सूज येणं यासारखे त्रास हमखास जाणवतात. पण त्यासाठी घरातून निघताना सर्व सामानदेखील स्वतःबरोबर ठेवायला हवं. साधारण या वातारवणाशी जुळवून घेण्यासाठी 48 तास जावे लागतात. लेहमधील चुंबकीय क्षेत्र हेही पर्यटकांचे आवडतं ठिकाण आहे. वास्तविक या ठिकाणाला निसर्गाचा एक चमत्कारच म्हटलं जातं. इथे चुंबकीय परिणाम पर्यटकांना अनुभवायला मिळतात. शिवाय इथे बर्फाचं वाळवंट असलेली नुब्रा व्हॅली आहे. इथे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हे खूप प्रसिद्ध आहे. विविध रंगाच्या फुलांची उधळण तुम्ही इथे पाहू शकता. शिवाय या नुब्रा खोऱ्यामध्ये सर्वात प्राचीन आणि मोठी अशी डिसकिट गुंफा आहे. इथे बुद्धाचा बत्तीस मीटर इंच असा सुवर्णपुतळा आहे. शिवाय लेहमध्ये शांती स्तूपही खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला खूप काही पाहायला आणि अनुभवायला मिळतं.

कसे जावे लेह लडाखला (Best Way To Reach Ladakh)

तुम्हाला मुंबईहून लेह लडाखला जायचे असल्यास, विमानप्रवास जास्त चांगला आहे. मुंबई ते दिल्ली आणि त्यानंतर दिल्ली ते लेह असा विमान प्रवास आहे. पण जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला राजधानीने प्रवास करता येऊ शकतो. शिवाय तुम्हाला लेह लडाखला बाईकने जायचं असेल तर तुम्ही तसंही जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित मॅप आणि इतर गोष्टींची व्यवस्थित माहिती घ्यायला हवी.

सिक्कीम (Sikkim)

उन्हाळ्यामध्ये बरेच जण भटकंतीसाठी सिमला – कुलू – मनालीला जायला प्राधान्य देतात. पण ते सोडून दुसरा अप्रतिम पर्याय म्हणजे हिमालयाच्या कुशीमध्ये विसावलेलं आणि अत्यंत सुंदर आणि शांत राज्य म्हणजे सिक्किम. सिक्कीम जितकं शांत आहे तितकंच ते नयनरम्य आहे. सिक्किममधील निसर्ग हा अतिशय मनमोहक आहे. त्यामुळे मोठ्या सुट्टीमध्ये सिक्कीमला जाणं हा खूपच चांगला पर्याय आहे. शिवाय इथली पर्यटनस्थळे आणि व्यवस्थाही खूपच चांगली आहे.

भारतात ट्रेकला जाण्यासाठी सर्वोत्तम आहेत ही ‘22’ ठिकाणं

सिक्किमला कसं जावं? (How To Reach Sikkim)

मुंबईवरून रेल्वेने कोलकाता मग तिथून जलपाईगुडी आणि मग गंगटोक असा एक पर्याय आहे. पण हा प्रवास खूपच मोठा आहे. त्यामुळे तो कंटाळवाणा होतो. त्यापेक्षा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही विमानाने सरळ गंगटोकजवळील बागडोगरामध्ये उतरावं आणि मग तिथून गंगटोकला जाणं सोपं आहे. सिक्कीमची ही राजधानी साधारणतः 5,410 फूट उंचीवर आहे. या राज्यात नेपाळी, भूतिया आणि लेपचा या जमातीचे लोक प्रचंड संख्येने राहतात. गंगटोकला तुम्ही राहिलात तर तुम्हाला सुमो अथवा जीप असा पर्याय निवडून सिक्कीम फिरता येतं.

काय पाहावं सिक्किममध्ये? (Places To Visit In Sikkim)

सिक्कीमचे रस्ते हे डोंगरदऱ्यातून जाणारे असल्यामुळे लहान आहेत. त्यामुळे इथे बसची सोय नाही. शिवाय आपल्यासारख्या पर्यटकांना अशा रस्त्याची सवय नसल्यामुळे तिथल्या स्थानिक चालकांची मदत घ्यावी. शिवाय चीनच्या सीमेला हे लागून असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर सैन्याची वर्दळ असते. गंगटोकमध्ये तुम्ही कुठेही पाहिलं तर तुम्हाला हिमालयाच्या रांगा दिसतात. इथे सर्वात महत्त्वाचं बघण्याचं ठिकाण म्हणजे नथू-ला. त्यासाठी तुम्हाला परमीट घ्यावं लागतं, जे गंगटोकला मिळतं. इथे मध्ये लागणारा छांगू लेक हा अतिशय नयनरम्य आहे. शिवाय इथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही त्यामुळे तुम्हाला तिथे प्रसन्न वाटतं.

नथू-ला खिंड आणि आजूबाजूच्या परिसरातून चीनच्या सैन्याच्या चौकी अगदी समोर दिसतात. तर इथूनच पुढे बाबा मंदिराकडे रस्ता जातो. पण इथे जायला पूर्ण एक दिवस लागतो. कारण इथले रस्ते बरेच अरूंद आणि वळणावळणाचे आहेत.

तुम्हाला जर शॉपिंगची आवड असेल तर इथल्या गांधी मार्केटला भेट द्यायला हवी. इथे अजिबात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जात नाही. फक्त चालण्यासाठीच इथे रस्ते आहेत. सिक्कीमला आल्यानंतर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं ही पर्वणी आहे. त्याशिवाय तुमचा दौरा पूर्ण होऊच शकत नाही. इथे संपूर्ण सिक्किममधील चांगली पर्यटनस्थळं पाहण्यासाठी निदान तुमच्या हातात आठ दिवस हवेतच.

1) पेलिंग आणि ला – चेन (Pelling and La-Chains)

सिक्कीम हे सुंदरच आहे. पण पर्यटकांच्या स्वागताला सदैव तयार असलेले ठिकाण म्हणजे पेलिंग आणि ला – चेन. पेलिंगमध्ये तुम्ही कुठेही राहिलात तरीही तुम्हाला कांचनगंगा पर्वतरांग दिसतेच. त्यामुळे या ठिकाणाहून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. तर ला – चेन मधून तिबेटच्या सीमेवर असणारे 17 हजार फूट उंचीवरली गुरडोग्मार सरोवर पाहता येते. हे सरोवर पाहिल्यानंतर दुसऱ्या कुठेही जाऊ नये असाच फील येतो. शिवाय पेलिंगमध्ये एक बौद्ध मठ आहे, तेथील काबरू शिखर हेदेखील अतिशय नयनरम्य आहे.

मुन्नार (Munnar)

केरळ हे असं राज्य आहे ज्याला नेहमीच देवाची नगरी असं नाव देण्यात आलं आहे. केरळ आणि सुंदरता हे एक समीकरणच आहे. केरळमधील एक ठिकाण असं आहे, जिथे तुम्हाला कधीही उन्हाची झळ बसणार नाही. तुम्ही कधीही या ठिकाणी गेलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त निसर्गसौंदर्य आणि थंडीचा अनुभव मिळतो आणि हे ठिकाण म्हणजे मुन्नार. मुन्नार हिल्स हे आधी केवळ हनीमूनकरिता ठिकाण प्रसिद्ध होतं. पण आता अनेक कुटुंब या ठिकाणी फिरायला जातात. तुमच्या रोजच्या घाईगडबडीच्या आणि धावपळीच्या जगण्यातून आवडत्या माणसांबरोबर वेळ घालवायचा असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हा पर्याय अत्यंत उपयुक्त आहे. शिवाय या ठिकाणी नक्कीच तुम्हाला वेगळा अनुभव मिळेल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो.

ढगांच्या जगातून जाऊ शकता मुन्नारला (Feel the Clouds At Munnar)

मुन्नारला जाण्यासाठी तुम्हाला कोईम्बतूरला उतरावं लागतं. तुम्ही रेल्वे अथवा विमान तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही पर्याय यासाठी निवडू शकता. या स्टेशनच्या किंवा अगदी विमानतळाच्याही बाहेर आल्यानंतर तुम्हाला जाणवेल तो थंडगार वारा आणि मनाला आनंद देणारा हिरवागार परिसर. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही खासगी वाहन करून तुम्ही बुक केलेल्या ठिकाणी पोहचू शकता. तुम्ही जेव्हा तुमच्या इच्छित स्थळी जाणार असाल तेव्हा तुम्हाला ढगांच्या दुनियेचा मस्त अनुभव मिळेल. कारण या हिल स्टेशनवर जाण्यासाठी नेहमीच तुम्हाला ढगांच्या  दुनियेतून जावं लागतं. आपल्याला सहसा हा अनुभव नसल्यामुळे अतिशय प्रसन्न आणि अफाट असा अनुभव मिळतो.

चहाच्या बागा (Tea Garden)

केरळ आणि चहाच्या बागा नाहीत असं दृष्य कधीच दिसणार नाही. चहाचे मळे आणि चहाच्या उत्पत्तीसाठी मुन्नार प्रसिद्ध आहे. त्यामुळे या उंचच उंच डोंगरावर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चहाचे मळे दिसतात. जे आपल्यासाठी पाहणं ही एक पर्वणीच आहे.

मुन्नारमध्ये तीन नद्यांचा संगम (Conflunce of three river)

मुन्नार अर्थात तीन नद्यांच्या संगमाची जागा असा त्याचा अर्थ आहे. जो बऱ्याच जणांना माहीत नाही. मधुरपुजहा, नल्लाथन्नी आणि कुंडाली अशा तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. त्यामुळेच या ठिकाणाला मुन्नार असं नाव देण्यात आलं असून हा शब्द मल्याळी आहे. इथे ठिकठिकाणी नद्या आणि छोट्या घरांमुळे या ठिकाणाला अजून शोभा आली आहे. शिवाय या ठिकाणी कायम थंंड वातावरण अनुभवायला मिळतं.

इको पॉईंट (Echo Point)

हे हिल स्टेशन असल्यामुळे इथे इको पॉईंट असणंही स्वाभाविक आहे. पण पर्यटकांना अशा ठिकाणी जायला जास्त प्रमाणात आवडतं. ही मुन्नारमधील सर्वात लोकप्रिय जागा असून अर्थातच या ठिकाणाहून तुम्ही नाव उच्चारल्यावर तुमच्या आवाजाचा एको तुम्हाला ऐकू येतो.

इतर कोणती ठिकाणं पाहावीत? (Other Places To Visit)

तुम्हाला जर प्राणी पाहायची आवड असेल तर तुमच्यासाठी इराविकुलम उद्यान म्हणजे एक पर्वणी आहे. मुन्नारपासून साधारण सतराशे मीटर उंचीवर मट्टुपेट्टी हे ठिकाण आहे.  इथे बोटिंग करण्यासाठी तुम्हाला खूपच चांगले तलाव आणि बांध आहेत. तसंच साधारण पंधरा किमी दूर असणारे राजमाला हे ठिकाणही खूप प्रसिद्ध आहे. नीलगिरी तहर नावाचा प्राणी तुम्हाला या भागात पाहता येतो. शिवाय जगातले अर्ध्यापेक्षा अधिक तहर इथे तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही साधारण सात दिवस सुट्टी घेऊन जर मुन्नारला गेलात तर तुम्ही संपूर्ण मुन्नार पालथं घालू शकता.

हैदराबाद (Hyderabad) 

मोत्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध असणारं हैदराबाद हे बिर्याणी आणि पर्यटनासाठीही तितकंच प्रसिद्ध आहे. हैदराबादला प्राचीन इतिहास, परंपरा लाभली आहे. शिवाय इथलं खाणंही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या शहराने आपलं वेगळेपण जोपासलं आहे. इतकंच नाही तर इथली भाषादेखील प्रत्येकाला वेगळी आणि अधिक जाणून घेण्यासारखी वाटते. तुम्हाला जर सुट्ट्यांमध्ये हैदराबादला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच या स्थळांना भेट देऊ शकता.

हैदराबादला कसं जायचं? (How To Reach Hyderabad)

हैदराबादला जाण्यासाठी तुम्हाला मुंबईवरून हुसैन सागर एक्स्प्रेस आणि अशा दोन ते तीन ट्रेन्सचा पर्याय आहे. किंवा तुम्हाला विमानाने जायचं असल्यास, दोन तास लागतात. मात्र हैदराबादचं विमानतळ हे हैदराबाद शहरापासून खूप लांब आहे. त्यामुळे तिथून जाण्यासाठी तुम्हाला स्थानिक बसेस किंवा खासगी वाहनांचा उपयोग तुम्हाला करता येतो.

हैदराबादमध्ये पाहण्यासाठी प्रमुख स्थळं (Major Places To Vist In Hyderabad)

1) चारमिनार (Char Minar)

हैदराबाद म्हटलं की, सर्वात पहिल्यांदा डोक्यामध्ये ठिकाण येतं ते म्हणजे चारमिनार. शहराच्या मधोमध मोहम्मद कुली कुतूब शाह याने 1551 मध्ये हे स्मारक बांधले. साजिया शैलीला दर्शवणारं हे स्मारक म्हणजे रोगाच्या साथीतून लोकांना वाचवण्यासाठी करण्यात आलेली निर्मिती होती. या इमारतीच्या वरती चार स्तंभ आहेत. ज्या प्रत्येक स्तंभाची उंची ही 48.7 सेंटीमीटर इतकी आहे. शिवाय इथे आतमध्ये एक मस्जिद आहे. या ठिकाणी मोती आणि अत्तराची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

2) नेहरू प्राणी संग्रहालय (Nehru Zoo Museum)

जगातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयांपैकी एक अशी या संग्रहालयाची ओळख आहे. वाघ, सिंह आणि अस्वलाची सफारी हे इथलं वैशिष्ट्य आहे. तसंच लहान मुलांसाठी इथे मिनी रेल्वेदेखील आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारचे प्राणी तुम्हाला बघायला मिळतात. पर्यटनाच्या दृष्टीने हे सर्वात महत्त्वाचं ठिकाण आहे.

3) मक्का मस्जिद (Mecca Mosque)

सर्वात जुन्या मस्जिदपैकी ही मक्का मस्जिद आहे. साधारणतः 400 वर्षांपूर्वी सुलतान मोहम्मद कुतूबशाहच्या काळात ही मस्जिद बांधण्यात आली होती. तसंच याच्या जवळच कुली कुतूब शाहने आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं. त्यामुळे हा इतिहासदेखील या मक्का मस्जिदसाठी महत्त्वाचा आहे.

4) हुसैन सागर (Hussain Sagar)

सर्वात मोठं मानवनिर्मित जलाशय म्हणून या हुसैन सागरची ओळख आहे. यातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे या जलाशयाच्या अगदी मधोमध सोळा मीटर उंचीची गौतम बुद्धांची मूर्ती. शिवाय इथे तुम्हाला बोटिंगही करता येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जलाशयाच्या पाण्यात बरीच रोषणाई केलेली असते. त्यासाठी बऱ्याच मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणाला भेट द्यायला येतात.

5) बिर्ला मंदिर (Birla Temple)

हैदराबादमधील हे बिर्ला मंदिर हे 280 फूट उंच डोंगरावर वसलेलं आहे. हे मंदिर संपूर्ण पांढऱ्याशुभ्र अशा संगमरवरी दगडापासून बनवण्यात आलेलं आहे. याच्या जवळच हुसैन सागर तलाव आहे. त्यामुळे तुम्ही इथे आल्यानंतर तलावामध्ये सूर्यास्त होताना सूर्याचं प्रतिबिंब पाहू शकता. हे दृष्य अतिशय विहंगम असून इथून कुठेही जाण्याची इच्छा होत नाही, इतका सुंदर हा परिसर आहे.

शिवाय सालारजंग संग्रहालय जिथे तुम्हाला एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधून आयात केलेलं संगीतमय घड्याळ पाहता येईल. तसंच तुम्हाला इथे पुरातन काळातील कपडे, कलाकृती, हत्यारं, हस्तिदंतापासून बनविलेल्या कलाकृती या साहित्यांचा खजिनादेखील पाहता येईल.

भारतामध्ये अनेक ठिकाणं आहेत जी तुम्हाला पाहता येतात. पण ही पाच ठिकाणं अतिशय अप्रतिम असून तुमच्या बजेटमध्येदेखील बसणारी आहेत. त्यामुळे यावेळी जर तुम्हाला मोठ्या सुट्टीत नक्की कुठे जायचं हा प्रश्न पडला असेल, तर त्यासाठी पर्याय नक्कीच तयार आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम 

Read More From Travel in India