बॉलीवूड

Birthday Special: चित्रपटातून काढून टाकल्यावर रडली होती कतरिना, पण हाल बघून सलमान हसला

Dipali Naphade  |  Jul 15, 2019
Birthday Special: चित्रपटातून काढून टाकल्यावर रडली होती कतरिना, पण हाल बघून सलमान हसला

आज बॉलीवूडची ‘चिकनी चमेली’ अर्थात कतरिना कैफचा 36 वा वाढदिवस आहे. कतरिना कैफ बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. कतरिनाने बॉलीवूडमध्ये आपलं स्थान पक्कं करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. कतरिना आणि सलमान खूपच चांगले मित्र आहेत. शिवाय त्यांची जोडी पडद्यावर खूपच छान दिसते आणि प्रेक्षकांनाही या जोडीला पाहायला आवडतं. आतापर्यंत या जोडीने केलेले चित्रपट हिट ठरले आहेत. यामध्ये युवराज, एक था टायगर, मैंने प्यार क्यो किया, टायगर जिंदा है आणि भारत या चित्रपटांचा समावेश आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? कतरिना आणि सलमानची मैत्री तेव्हापासून आहे जेव्हा कतरिनाला बॉलीवूडमध्ये कोणी ओळखतही नव्हतं. कतरिनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक खास गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

मुलाखतीमध्ये शेअर केली कतरिनाने मजेशीर गोष्ट

Instagram

कतरिनाने आपल्या आयुष्यातील एक मजेशीर गोष्ट एका मुलाखतीत शेअर केली होती. कतरिनाने सांगितलं की, एकदा ती खूपच त्रासली होती आणि रडत रडत सलमानकडे गेली. तर तिच्याकडे पाहून सलमान हसायला लागला होता. वास्तविक कतरिना कैफ ही दिग्दर्शक अनुराग बासूच्या चित्रपट सायामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार होती. या चित्रपटात जॉन अब्राहम भूताच्या भूमिकेत होता. दोन दिवस चित्रीकरण केल्यावर कतरिनाला या चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. यानंतर कतरिनाला खूपच वाईट वाटलं होतं. त्यामुळे ती सलमानला भेटली आणि त्याला ही गोष्ट सांगून रडायला लागली. पण त्यावर सलमान हसला. पण त्यानंतर त्याने तिला समजावलं आणि तो म्हणला की, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात. आपल्या कामावर लक्ष केंद्रित कर असा सल्लाही त्याने तिला दिला. यावर कतरिना म्हणाली की, ‘सलमानला नेहमीच माझ्यावर विश्वास होता’

तसंच यावर पुढे कतरिनाने सांगितलं की, ‘मी कधीही सलमानला भेटायचे आणि याबद्दल बोलणं निघालं की रडायचे पण सलमान हसत राहायचा. मला वाटायला लागलं होतं की, तो खूपच स्वार्थी आहे. माझं करिअर सुरु होण्याआधीच संपलं आहे, मला माझ्या पहिल्याच चित्रपटातून काढून टाकण्यात आलंय आणि हा माझ्या आयुष्याचा अंत आहे तर याला कसं काय हसायला येऊ शकतं? त्यानंतर त्याने मला एकदा बसवून समजावलं की, या सगळ्या गोष्टींना काहीच महत्त्व नाहीये कारण मला माहीत आहे की, तू कुठपर्यंत पोचशील. या सगळ्या गोष्टी घडत असतात. का घडतात त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. पण तू लक्षात ठेव की, तू खूप पुढे जाशील. फक्त मेहनत करत आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत कर.’ असा सल्लाही सलमानने दिला होता. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील वाचा

कतरिनाच्या मेहनतीबरोबरच सलमानचीही साथ

Instagram

कतरिनाने बॉलीवूडमध्ये टॉपमध्ये येण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. पण तिला सलमानच्या मैत्रीचीही तितकीच साथ लाभली. कतरिना कोणत्याही संकटात असो सलमानने नेहमीच तिची मदत केली आहे. कतरिनाने ‘बूम’ या चित्रपटातून पदार्पण केलं पण तिला ओळख मिळवून दिली ती ‘मैंने प्यार क्यों किया’ या सलमानबरोबरच्या चित्रपटाने. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. रणबीरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनासाठी कठीण काळ होता. पण पुन्हा एकदा तिला ‘भारत’ च्या रूपाने सलमानने हात दिला. आता पुन्हा एकदा नव्या स्क्रिप्टच्या शोधात कतरिना असून ती सध्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे. दरम्यान कतरिना सध्या ‘सूर्यवंशी’ या रोहित शेट्टीच्या चित्रपटात अक्षयकुमारबरोबर बऱ्याच वर्षांनी काम करत आहे.

हेदेखील वाचा 

प्रियांकाने गायले नीक जोनसचे गाणे, व्हिडिओ झाला व्हायरल

#BBM2 ची “शिवानीच खरी विनर”

भारत चित्रपटामध्ये कतरिना कैफचा ‘सिंपल’ लुक 

Read More From बॉलीवूड