बॉलीवूड

देशासाठी शहीद होताना मनात येणाऱ्या भावनेचा अनुभव म्हणजे ‘केसरी’- अक्षयकुमार

Dipali Naphade  |  Mar 7, 2019
देशासाठी शहीद होताना मनात येणाऱ्या भावनेचा अनुभव म्हणजे ‘केसरी’- अक्षयकुमार

अक्षयकुमार एक असा अभिनेता आहे जो आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत असतोच पण त्या चित्रपटांमधून एक शिकवण मिळेल अशा गोष्टीही करतो. आतापर्यंत अक्षयकुमारने आपल्या करिअरमध्ये विविध चित्रपट आणि त्यातून विविध भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच अक्षय प्रेक्षकांच्या भेटीला ‘केसरी’मधून येत आहे. अक्षयने या चित्रपटाविषयी आणि त्यातील भूमिकेविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं याबाबत ‘POPxo Marathi’ सोबत शेअर केलं. कोणत्याही एका इमेजमध्ये अडकणारा अक्षय हा अभिनेता नाही. त्याने आतापर्यंत विविध भूमिका करून हे सिद्ध केलं आहे. शिवाय एका वेळी चार चित्रपट जरी करत असलो तरीही प्रत्येक चित्रपटाचा अभ्यास दिग्दर्शकाने केलेला असतो आणि आपण ‘Director’s Actor’ असून त्यामुळे विविध भूमिका एकाचवेळी करताना कोणताही त्रास होत नाही. शिवाय चित्रपटासाठी वेगळी तयारी करावी लागत नाही कारण सर्व अभ्यास हा आधीच रिसर्च टीम आणि दिग्दर्शकाने केलेला असतो. जसं दिग्दर्शक सांगेल तसं पडद्यावर उतरवण्याची आपली पूर्ण तयारी असते असंही अक्षय यावेळी म्हणाला.

जेव्हा शत्रूची गोळी तुमचा वेध घेते….

‘केसरी’चा अनुभव सांगताना अक्षय फारच भावूक झाला होता. हा चित्रपट करत असताना बरेच अनुभव आले. त्यापैकी एक कायमचा लक्षात राहणारा अनुभव आणि कायमची मनात निर्माण झालेली भावना म्हणजे जेव्हा आपले सैनिक बॉर्डरवर लढत असतात त्यावेळचा असं अक्षयने सांगितलं. जेव्हा शत्रूची गोळी तुमचा वेध घेते आणि त्या शेवटच्या क्षणामध्ये तुमच्या मनात नक्की काय निर्माण होतं ते हा चित्रपट करताना मला जाणवलं. तो एक शेवटचा क्षण आणि त्यावेळी त्या सैनिकाच्या मनामध्ये नक्की काय येत असेल आणि काय काहूर माजत असेल याचा अनुभव ‘केसरी’ करताना आल्याचं आणि त्यातून आपण बरंच काही शिकल्याचंही अक्षयने सांगितलं. ‘केसरी’ हा देखील एक देशभक्तीपर चित्रपट असून हा चित्रपट बघताना नक्कीच प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल असंही अक्षयने म्हटलं. एका सैनिकासाठी देशप्रेम हेच सर्वात महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी तो आपलं सर्वस्व पणाला लावतो. हेच या चित्रपटातूनही दिसणार आहे.

‘केसरी’ मधील पगडीचा अनुभव

प्रत्येक शीख सरदारासाठी पगडी ही खास असते. ती त्याची शान असते. या चित्रपटातही अक्षयने पगडी घातली आहे. यावेळी त्याने आपला अनुभव मीडियाबरोबर शेअर केला. ही पगडी घालण्यासाठी त्याला साधारणतः 35 मिनिट्स लागायची. शिवाय ही पगडी अत्यंत जड होती. पण प्रत्येक शीख ही पगडी का घालतो यामागे एक वैज्ञानिक कारण असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. पण ती पगडी डोक्यावर घातल्यानंतर एक जबाबदारीची जाणीव नक्कीच होते. स्वतः पंजाबी असल्यामुळे या चित्रपटासाठी वेगळी तयारी करावी लागली नाही. शिवाय अशी भूमिका साकारताना मुळातच सर्व रिसर्च झाला असल्यामुळे चांगलं काम करण्याची अधिक प्रेरणा मिळते अशी भावना अक्षयने व्यक्त केली.

मराठीविषयी विशेष प्रेम

अक्षयकुमारने यावेळी आपल्याला मराठी चित्रपट आणि नाटक याविषयी प्रचंड प्रेम असल्याचं सांगितलं. मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये उत्कृष्ट कथा आणि कथानक असल्यामुळे आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीविषयी प्रेम असल्याचंही त्याने सांगितलं. खरं तर त्यासाठीच आतापर्यंत अक्षयकुमारने दोन मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून दोन्ही चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत. तसंच आतापर्यंत केवळ मराठी चित्रपटांची निर्मिती केली असून अक्षयला मराठी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार असं विचारल्यावर अक्षयने आपल्याला संधी मिळाली तर नक्कीच मराठी चित्रपटामध्ये काम करू असं उत्तर क्षणाचीही उसंत न लावता दिलं. शिवाय मराठीमध्ये चांगला कंटेट असल्यामुळेच मराठी चित्रपट आणि नाटक बघायला आवडतं असंही यावेळी अक्षयने सांगितलं.

नकारात्मक पाहतच नाही

आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक दृष्टीकोनातूनच पाहत असल्यामुळे नकारात्मक गोष्टींकडे लक्षच देत नाही असंही अक्षयने यावेळी म्हटलं. खरं तर आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन कायम असणं महत्त्वाचं आहे. त्यातूनच नेहमी शहीदांसाठी काम असो वा इतर कोणत्याही गोष्टी नेहमीच अक्षय कुमार पुढे असतो. आता याच महिन्यात अक्षयचा ‘केसरी’ येणार असून पुन्हा एकदा अक्षय बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवणार हे लवकरच कळेल.

फोटो सौजन्य – Instagram 

हेदेखील वाचा – 

‘हेरा फेरी 3’ मध्ये पुन्हा अक्षय कुमार,परेश रावल आणि सुनिल शेट्टीची जबरदस्त कॉमेडी

अक्षयकुमारच्या फायर स्टंटनंतर ट्विंकलची जीवे मारण्याची धमकी

शाहरूख खानला जमत नाहीये अक्षय कुमारबरोबर काम करणं

 

Read More From बॉलीवूड