बॉलीवूड

शकुंतला देवी नंतर आता ‘शेरनी’ व्हायचं आहे विद्या बालनला, लवकरच सुरू होणार शूटिंग

Trupti Paradkar  |  Aug 5, 2020
शकुंतला देवी नंतर आता ‘शेरनी’ व्हायचं आहे विद्या बालनला, लवकरच सुरू होणार शूटिंग

लॉकडाऊननंतर सर्व काही पुन्हा पूर्ववत होऊ लागलं  आहे. टेलिव्हिजन मालिकांचं शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. चित्रपट आणि वेबसिरीजचे शूटिंग जरी सुरू झाले नसले तरी हळूहळू चित्रपटसृष्टीही पुर्वपदावर येत आहे. चित्रपट निर्मात्यांनी कास्टिंग आणि कलाकारांच्या डेट घेण्यास पुन्हा नव्याने सुरूवात केली आहे. काही प्रोजेक्टसाठी लोकेशनही ठरवण्यात येत आहे. अभिनेत्री विद्या बालनच्या शेरनी या चित्रपटाचीही पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शकुंतला देवीनंतर आता शेरनी हा विद्याचा आगामी चित्रपट असणार आहे.

काय आहे शेरनी

विद्या बालनचा पुढील चित्रपट ‘शेरनी’ असून या चित्रपटाची चर्चा सगळीकडे जोरदार सुरू झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा तर दिग्दर्शन अमित मसूरकर करणार असून चित्रपटासाठी मध्यप्रदेशचे बालाघाट हे लोकेशन ठरवण्यात आलेलं आहे. मध्यप्रदेशचे जंगल आणि वन्यजीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबरपासून सुरू होणार असून शूटिंगदरम्यान कलाकारांच्या सुरक्षेची व्यवस्थित काळजी घेतली जाणार आहे. सध्या तरी निर्माते आणि कलाकार चित्रपटांच्या शूटिंगला सरकारी परवानगी कधी मिळणार याच्या प्रतिक्षेत आहे. मात्र या बातमीमुळे विद्याचा शेरनी अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विद्या बालन या चित्रपटात फॉरेस्ट रेंजरच्या भूमिकेत दिसणार आहे.

विद्या बालन शेरनीसाठी आहे तयार

विद्या बालन शेरनी चित्रपटात एक धडाकेबाद फॉरेस्ट रेंजरची भूमिका साकारणार आहे. लॉकडाऊन आधी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली होती मात्र नंतर सर्वकाही बंद करण्यात आलं होतं. आता पुन्हा या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती पूर्णपणे सज्ज आहे. तिच्या मते सध्याच्या वातावरणात न घाबरता पुन्हा कामाला सुरूवात करायला हवी. कारण भिती असेल तर माणूस पुढे जाऊ शकत नाही. मात्र पुढे जाताना सुरक्षेची योग्य काळजीही घ्यायला हवी. त्यामुळे लवकरात लवकर तिला या चित्रपटाच्या कामाला सुरूवात करायची आहे. ऑक्टोबरमध्ये मध्यप्रदेशमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाण्यासाठी ती नक्कीच उत्सुक आहे.

निर्मात्यांची शूटिंग सुरू करण्याबाबत काय आहे भूमिका

विक्रम मल्होत्रा यांच्या मते जरी देशात आता कोरोनाच्या संक्रमणाचे प्रमाण कमी होऊ लागले असले तरी प्रत्येकाने याबाबत आजही सतर्क राहणं नक्कीच गरजेचं आहे. शेरनी चित्रपटाचं थोडं काम यापूर्वीच सुरू झालेले असून या चित्रपटाचं पुढील शूटिंग आणि इतर गोष्टींवर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. मध्यप्रदेशच्या वन्य अधिकारी वर्गाने शूटिंग टीमला विश्वास दिला आहे की चित्रपटासाठी ठरवण्यात आलेलं लोकेशन पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र अजून सरकारकडून चित्रपटांच्या शूटिंगसाठी रितसर परवानगी मिळणं बाकी आहे. त्यामुळे सर्व काही नीट होताच या चित्रपटाच्या शूटिंबला सुरूवात केली जाईल. जर काही ठरवल्याप्रमाणे घडले तर ऑक्टोबर ते मे पर्यंत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईल. पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचं थोडं शूटिंग झालेलं आहे. त्यामुळे आता सर्व खबरदारी घेत पुन्हा सगळं नव्याने सुरू करावं लागेल. कारण आता पुन्हा शूटिंग सुरू झाल्यावर सर्व पूर्वीसारखं नक्कीच नसेल मात्र तरिही पुढे जाण्यासाठी आता सर्वांना पुन्हा नव्याने सुरवात ही करावीच लागेल. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा  –

अभिनेता ज्यांनी ऑनस्क्रिन गाजवल्या महिलांच्या भूमिका, दिसतात सुंदर

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या डोळ्यांनी जिंकली आहेत अनेकांची मनं

जेव्हा दिलीपकुमार यांच्या कौतुकाने भावुक झाले होते धर्मेंद्र

Read More From बॉलीवूड