लाईफस्टाईल

भाई व्यक्ती की वल्लीच्या उत्तरार्धातील ‘नाच रे मोरा’ गाणं प्रदर्शित

Trupti Paradkar  |  Feb 5, 2019
भाई व्यक्ती की वल्लीच्या उत्तरार्धातील ‘नाच रे मोरा’ गाणं प्रदर्शित

पु.ल. देशपांडेच्या जन्मशताब्दी निमित्त ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाची  निर्मिती करण्यात आली. पुल देशपांडे यांचा जीवनप्रवास फक्त दोन ते तीन तासात चाहत्यांसमोर मांडणं केवळ अशक्य असल्याने दोन भागात हा चित्रपट निर्माण करण्यात आला. 4 जानेवारीला या चित्रपटाचा पूर्वार्ध प्रदर्शित झाला आणि 8 फेब्रुवारीला या चित्रपटाचा उत्तरार्ध प्रदर्शित होत आहे. उत्तरार्धाच्या प्रदर्शनाआधी नुकतच या चित्रपटातील ‘नाच रे मोरा’ हे लोकप्रिय गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. नाच रे मोरा हे गाणं प्रत्येकासाठी अविस्मरणीय गाणं आहे. पुलंनी हे बालगीत संगीतबद्ध केलं होतं. अनेकांचं बालपण या गाण्याने समृद्ध झालं आहे. बालपणीच्या अनेक पावसाळ्यात कित्येकांनी मोरांच्या नृत्यासह या गाण्याचा आनंद लुटला असेल. त्यामुळे ‘नाच रे मोरा’ हे बालगीत आजही अजरामर आहे. भाई चित्रपटासाठी चित्रीत केलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग. दि. माडगुळकरांनी लिहीलेलं हे गाणं या चित्रपटात अजीत परब यांनी गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे.

भाईच्या पूर्वार्धाप्रमाणेच  उत्तरार्धाबाबत उत्सुकता

‘भाई व्यक्ती की वल्ली’ या दोन्ही भागांची निर्मिती दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केली आहे.त्यांच्या ‘फाळकेज फॅक्टरी’ या निर्मितीसंस्थेने या चित्रपटांची निर्मिती केली आहे. भाई व्यक्ती की वल्ली या चित्रपटाच्या पूर्वाधाच्या यशानंतर भाईंच्या चाहत्यांना आता उत्तरार्धाची उत्सुकता लागली आहे. पहिल्या भागात पु,ल. देशपांडे यांचं बालपण, आई-वडीलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार, कॉलेजमधल्या गमतीजमती, सुनीताबाईंशी त्यांच्यासोबत झालेली पहिली भेट, जगावेगळा आणि अगदी साध्या पद्धतीने झालेला त्यांचा विवाह, त्यांच्यातील कलाकाराची विविध रूपं प्रेश्रकांना पाहायला मिळाली. पहिल्या भागात कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे, भीमसेन जोशी, जब्बार पटेल यांच्या भूमिकांमधून भाईंच्या जीवनात असलेलं त्यांचं महत्तव दिसून आलं होतं. शिवाय ‘‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्यामधून एका अफलातून जुगलबंदीचा आनंद चाहत्यांना लुटता आला होता. उत्तरार्धातील ‘नाच रे मोरा’ हे गाणं देखील प्रेश्रकांच्या आता पसंतीस उतरत आहे. शिवाय या चित्रपटाच्या पुढील भागात बाबा आमटे, जवाहर लाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, दुर्गा भागवत यांच्यासोबत भाईंचे असलेले नातेसबंध यावर प्रकाश टाकला जाणार आहे. पहिल्या भागात सक्षम कुलकर्णीने किशोरवयीन भाईंची भूमिका केली होती आणि ‘मध्यमवयीन भाई’ सागर देशमुखने तर ‘सुनीताबाई इरावती हर्षे यांनी साकारले होते. आता पुढील भागात विजय केंकरे भाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.

भाईंमधील कलाकाराच्या छटा

‘पु.ल.देशपांडे’ म्हणजे मराठी साहित्यातील दैवत. मराठी साहित्य, नाटक, अभिनय अशा सर्वच बाबतीतील पु.लंच योगदान फार महत्वाचं आहे. पुलंच्या लेखनशैलीचं वैशिष्ट म्हणजे पूर्वीच्या पिढीतील सर्वजण त्यांच्या लिखाणाचे चाहते आहेतच पण आत्ताची तरुणपिढीही पुलंच्या तितक्याच प्रेमात आहे त्यामुळे आता भाई व्यक्ती की वल्लीच्या उत्तरार्धाची चाहत्यांना तितकीच ओढ लागली आहे.

अधिक वाचा

दयाबेननंतर सोनू सोडणार तारक मेहता का उलटा चश्मा मालिका

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र

‘भाईः व्यक्ती की वल्ली’ चित्रपटातील लुक साकारण्यासाठी तिरूपतीहून मागवण्यात आले केस

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

Read More From लाईफस्टाईल