बिग बॉस

Bigg Boss 2 ‘टिकिट टू फिनाले’ शिवानीला मिळणं कितपत योग्य

Dipali Naphade  |  Aug 22, 2019
Bigg Boss 2 ‘टिकिट टू फिनाले’ शिवानीला मिळणं कितपत योग्य

Bigg Boss 2 आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. नुकतंच ‘टिकिट टू फिनाले’ या टास्कमध्ये नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे या दोघींचं नाव घोषित करण्यात आलं. पण मुळात प्रश्न आहे की, शिवानी या पदासाठी योग्य आहे का? बिग बॉस हा असा गेम आहे ज्यामध्ये टास्क खेळणं आणि आपल्याला सिद्ध करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नेहाने अगदी पहिल्या दिवसापासून आपली दावेदारी सिद्ध केली आहे. पण तिला तोडीस तोड म्हणून शिवनेही सिद्ध केलं होतं. शिव प्रत्येकाशी व्यवस्थित वागतो. आरोह सतत कटकट करत असूनही शिव त्याच्याशीही चांगला वागतो. केवळ वीणाबरोबर त्याच्या असलेल्या मैत्रीला टारगेट करून शिवानीला प्रबळ दावेदार बनवणं तुम्हाला तरी योग्य वाटतं का? 

प्रेक्षकांचा शिवला पाठिंबा असतानाही असं का?

शिव ठाकरे आणि वीणा जगताप हे दोघंही प्रबळ दावेदार असताना प्रत्येक घरातील सदस्यांनी शिवानीला नक्की पाठिंबा का दिला हे कोडं आता प्रेक्षकांनाही सतावत आहे. शिवानी ज्या तऱ्हेने घराबाहेर गेली आणि एक महिन्याने परत येऊन तिने खेळलेला ‘सो कॉल्ड’ खेळ हा प्रेक्षकांना नक्कीच भावत नाहीये. तरीही सतत आरोह आणि शिवानीला पाठिशी घालत या शो चा होस्ट असणारे महेश मांजरेकर तिला का मोठं करत आहेत हा प्रश्न उरतोच. केवळ टीआरपीसाठी असेल तर मग हा खेळ सामान्य प्रेक्षकांनी न पाहिलेलाच बरा. आपण करू ती पूर्व दिशा आणि दुसऱ्याने तेच केलं तर कसं चुकीचं हे सतत शिवानी आतापर्यंत थोपवत आली आहे. असं असूनही ती इतके आठवडे कशी सेफ राहू शकते असा प्रश्न ‘POPxo मराठी’च्या प्रेक्षकांनीही सोशल मीडियावर बऱ्याचदा विचारला आहे. 

नाव घोषित व्हायच्या आधीच शिवानीचा जल्लोष

बिग बॉस 2 या खेळामध्ये खरं मन जिंकलं आहे ते माधव देवचके आणि शिव ठाकरे यांनी. कोणालाही न दुखावता सर्वांना सांभाळून घेत आपला गेम खेळण्याचं कसब या दोघांनीही नेहमीच दाखवलं. शिव सुरूवातीपासून बरेचदा बेस्ट परफॉर्मर ठरला. मग असं असतानाही त्याला नक्की का डावलण्यात आलं? असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडला आहे. यावेळच्या सीझनमध्ये सतत नियम बदलण्यात आले. इतर कोणत्याही बिग बॉसमध्ये असं करण्यात आलेलं नाही. 

#BBM2update : टास्कसाठी नाही करणार विश्वासघात, शिव होतोय भावनिक

अभिजीत बिचुकले नक्की कशासाठी?

अभिजीत बिचुकलेसारखा माणूस नक्की आतमध्ये कशासाठी आहे?  इतके वेळा त्याने महिलांचा अपमान केला आहे. वाटेल तसं बोलला आहे असं असतानाही त्याला बिग बॉसमध्ये का ठेवण्यात आलं आहे हा प्रश्न नक्कीच सतावतो. बरं असंही नाही की, तो माणूस कोणताही टास्क खेळत आहे. कोणत्याही टास्कमध्ये अभिजीत बिचुकलेला खेळवण्यात येत नाही. असं असतानाही केवळ सेलिब्रिटीच्या डोक्याला ताप कशाला? बरं अभिजीत बिचुकलेला विकेंडच्या डावात इतकं ओरडल्याचा दिखावा केल्यानंतरही त्याला बाहेर काढण्यात आलं नाही. कोणतीही व्यक्ती जर इतक्या खालच्या थराला जाऊन बोलत असेल आणि सतत आपलं बोलणं फिरवत असेल तर अशा व्यक्तीला बिग बॉसमध्ये राहू देण्याची नक्की गरज काय आहे? मराठी बिग बॉसने आपले सगळेच नियम धाब्यावर बसवले आहेत का असा प्रश्नही यामुळे निर्माण होतो. 

#BBM2 मधून इलिमिनेट होऊनही माधवच ठरला ‘विजेता’

बिग बॉस प्रेक्षकांच्या आवडीचा तरीही….

बिग बॉस हा जगभरात खेळला जाणारा खेळ आहे. त्याचे काही नियम आहेत. पण यावेळी अत्यंत वाईटरित्या या नियमांचे बदल करून मराठी बिग बॉसने त्याला तडा दिला आहे. पराग कान्हेरेसारख्या स्पर्धकाला एक नियम तर अभिजीत बिचुकलेसारख्या स्पर्धकाला दुसरा नियम. यावेळी बिग बॉस 2 ने नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकलेली नाहीत. त्याचं मत विचारात घेतलं जात नसल्याचं सातत्याने दिसून येत आहे. शिवानीच्या निवडीने तर हे सिद्ध झालं आहे. असं असेल तर शिवानी फायनलमध्ये जिंकल्यास कोणालाही या खेळाबद्दल काहीच वाटणार नाही. यावेळी फेअर गेम खेळला गेला नाही असंच म्हटलं जाईल. नेहा आणि शिव यांच्यामध्ये टफ झाल्यास सर्वांनाच आवडेल. या दोघांमध्ये फायनल रंगल्यास ते फेअरही असेल असा प्रेक्षकांचा कौल सध्या सगळीकडेच दिसून येत आहे. पण बिग बॉस आपल्या नियमांमध्ये बदल करून फायनलला नक्की काय घोळ घालणार हे आता पाहावं लागेल.

#BBM2 : बिग बॉसच्या आदेशानंतर शिवानी व्हावं लागलं शांत

Read More From बिग बॉस