खाणंपिण आणि नाइटलाईफ

मिरची कापल्यावर हाताची जळजळ होऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स

Trupti Paradkar  |  Jun 7, 2021
मिरची कापल्यावर हाताची जळजळ होऊ नये यासाठी फॉलो करा या टिप्स

स्वयंपाक ही एक कला असल्यामुळे स्वयंपाक करताना आधी त्याबद्दल ज्ञान असायला हवं. स्वयंपाक करताना अनेकदा चिरणे, कापणे, सोलणे, वाटणे, भाजणे, परतणे असे प्रकार करावे लागतात. स्वयंपाकासाठी जेव्हा तुम्ही मिरची चिरता तेव्हा मिरचीचा तिखटपणा हाताला लागतो आणि हात जळजळ करू लागतात. एवढंच नाही जर तुमच्या हाताचा  स्पर्श तुमच्या चेहरा अथवा शरीरावरील इतर भागाला झाला तर तो भागही जळजळ करू लागतो. त्यामुळे पहिल्यांदा स्वयंपाक करणाऱ्या अथवा स्वयंपाक नव्याने शिकणाऱ्या लोकांना मिरची कापल्यावर खूप वेळ जळजळ सहन  करावी लागते. यासाठीच अशा लोकांना मिरची कापल्यावर होणारी जळजळ कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय माहीत असायला हवेत.

हाताला लावा कोरफडीचा गर-

कोरफडीचा गर त्वचेसाठी अतिशय उत्तम आणि  लाभदायक ठरतो. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा गर वापरू शकता. मिरचीचा स्पर्श झाल्यामुळे होणारी आग अथवा जळजळ या  गरामुळे कमी होते कारण यामध्ये थंडावा देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे मिरची कापल्यावर हाताची जळजळ होत असेल तर लगेच हात साबणाने धुवा आणि त्याला कोरफडीचा गर लावा. शिवाय हा घरगुती उपाय केल्याने तुमच्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.

दही, लोणी अथवा दूध हाताला लावा –

मिरचीने हात जळजळ करू लागल्यावर पहिल्यांदा काहीच सुचत नाही. त्यामुळे अशा वेळी जर तुमच्या घरात मलम अथवा दाह कमीम करणारं एखादं औषध नसेल तर काळजी करू नका. तुम्ही स्वयंपाक घरात उपलब्ध असलेलं दूध, लोणी, दही यापैकी काहीही तुमच्या हातावर लावू शकता. यापैकी जे मिळेल ते हातावर लावा आणि काही मिनीटांनी हात स्वच्छ पाण्याने धुवा. 

हातावर मध लावा –

त्वचेवर होणारा दाह कमी करण्याचा चांगला मार्ग म्हणजे हाताला पटकन मध लावणं. कारण मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. शिवाय मधामुळे हात मऊ आणि मुलायमही होतात. त्यामुळे स्वयंपाक करताना त्वचा भाजली अथवा मिरची चिरल्यावर हाताला आग झाली तर पटकन हातावर मध चोळा.

हातावर बर्फ चोळा –

स्वयंपाक करताना चिरणे, भाजणे अथवा मिरचीमुळे हाताची आग होणे यापैकी कोणताही त्रास झाला तर सर्वात आधी हात स्वच्छ धुवा आणि दाह होत असलेल्या त्वचेवर बर्फ फिरवा. पाण्याने धुतल्यामुळे त्वचेवरील मिरचीचा अर्क निघून जाईल आणि बर्फामुळे त्वचेला होणारी जळजळ कमी होईल. 

लिंबाचा रस लावा –

स्वयंपाक घरातील आणखी एक गोष्ट तुम्ही मिरची कापल्यामुळे हाताची होणारी आग कमी करण्यासाठी वापरू शकता ती म्हणजे लिंबू… स्वयंपाक करताना आपण लिंबाचा वापर करत असतो. अशावेळी कापलेले, पिळलेले लिंबू फेकून न देता ते त्वचेवर चोळावे. ज्यामुळे लिंबू पिळल्यानंतरही ते वाया जात नाही आणि त्वचेचा दाह पटकन कमी होतो. 

आम्ही सांगितलेले हे घरगुती उपाय तुम्ही केले का आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. यासोबतच स्वयंपाक करताना तुम्हाला कोणकोणत्या टिप्सबाबत आणखी माहिती हवी तेही आम्हाला कंमेट बॉक्समधून सांगा आम्ही तुम्हाला याबाबत नक्कीच योग्य माहिती पुरवण्याचा प्रयत्न करू. 

फोटोसौजन्य –

अधिक वाचा –

मुंगी चावल्यामुळे होणारी त्वचेची जळजळ थांबवण्यासाठी घरगुती उपाय

पायाच्या तळव्यांची होत असेल जळजळ तर करा हे घरगुती उपाय

मिरची चावल्यास झाली तोंडाची जळजळ, तर करा त्वरीत उपाय

Read More From खाणंपिण आणि नाइटलाईफ